वृ.वि. 245
मुंबई, दि. 30 : पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींच्या उन्नतीसाठी श्री. वनगा गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत होते. विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांनी आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला होता. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या वनगा यांच्या निधनाने एक निस्पृह आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.
००००
No comments:
Post a Comment