Friday, 3 July 2026
'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' या उपक्रमांतर्गत 'चरण सेवा' सुरू
आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम
#वारकरी
#आषाढीवारी
#चरणसेवा
#भक्तीविठोबाचीसेवाआरोग्याची
#मुख्यमंत्रीसहायतानिधी
#आरोग्यसेवा
#PandharpurWari
विशेष वृत्त :
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 4 कोटींचा निधी मंजूर
नागपूर, दि. 03 : आर्थिक वर्ष 2026-27 करिता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीरकण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने 4 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे.
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे, यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी औजारे, यंत्रे बॅकांना अनुदान देवून त्याची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपभियानाच्या मार्गदर्शक सूचनानूसार करण्यात येते. या योजनेसाठी आर्थिक वर्ष 2026-27 करिता 20 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे व त्यास प्रशासकीय मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. याअंतर्गत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या 2 जुलै 2026 च्या शासन निर्णयानुसार राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 4 कोटींचा निधीस मंजूरी दिली आहे.
या योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांनांच हा निधी वितरीत करणे बंधनकारक असल्याचे शासन निर्णयात नमुद आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड महाडिबीटी पोर्टलवरील विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा करावी, असेही शासन निर्णयात म्हटले आहे. या योजनेच्या क्षेत्रीयस्तरावर अंमलबजावणीसाठी कृषी संचालक, कृषी अभियांत्रिकी संचालनालय, कृषी आयुक्तालय पुणे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानूसार उद्दीष्टनिहाय अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
0000
विशेष वृत्त :
‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2’ साठी 221 कोटींचा निधी मंजूर
विभागातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ
नागपूर, दि. 03 : आर्थिक वर्ष 2026-27 करिता ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2’ साठी राज्य शासनाने 221 कोटी 28 लाख 14 हजार 800 च्या निधीस मंजुरी दिली आहे. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांसह राज्यातील 21 जिल्ह्यातील निवड केलेल्या 7 हजार 201 गावांना याचा लाभ मिळणार आहे.
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या राज्यातील 7 हजार 201 गावांमध्ये ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ वर्ष 2025-26 पासून पुढील 6 वर्षाच्या कालावधीकरिता राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या टप्पा-2 च्या अंमलबजावणीसाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या 2 जुलै 2026 च्या शासन निर्णयानूसार 221 कोटी 28 लाख 14 हजार 800 च्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
सदर प्रकल्पाकरिता वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एकूण 442 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या शासन निर्णयाद्वारे नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांतील गावांमध्ये ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2’ ची अंमलबजावणी करणे सोयीचे होणार असून या जिल्ह्यांतील निवड झालेल्या गावांना त्याचा लाभ होणार आहे.
000
Subscribe to:
Posts (Atom)



