Monday, 24 August 2026
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) सोमवार, दि. २४ ऑगस्ट, २०२६. मंत्रिमंडळ निर्णय (एकूण - ४)
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
सोमवार, दि. २४ ऑगस्ट, २०२६.
मंत्रिमंडळ निर्णय (एकूण - ४)
(क्रीडा विभाग)
नॅशनल गेम्स, खेलो इंडिया स्पर्धेसह, दिव्यांगांच्या आणखी सहा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याच्या योजनेत नॅशनल गेम्सह, खेलो इंडिया तसेच दिव्यांगाच्या आणखी सहा स्पर्धांचा समावेश करण्यास तसेच रोख पारितोषिक योजनेत सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कठोर मेहनत, समर्पण आणि त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या दृष्टीने ही पारितोषिक योजना सुधारीत करण्यात आली आहे. यात आता केंद्र शासन आणि इतर क्रीडा-प्रगत राज्यांच्या धर्तीवर रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठीच्या रोख पारितोषिकात भरीव वाढ करण्यात आली असून सुवर्ण पदकासाठी सात लाख (पूर्वी 5 लाख), रौप्यसाठी पाच लाख (पूर्वी 3 लाख) तर कांस्यसाठी तीन लाख (पूर्वी दीड लाख) अशी वाढ करण्यात आली आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी अनुक्रमे १० लाख, ७ लाख, ५ लाख रुपये तर नॅशनल गेम्ससाठी अनुक्रम ७ लाख,५ लाख, ३ लाख रुपये आणि खेलो इंडियातील पदकासाठी अनुक्रम ३ लाख,२ लाख,१लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.
युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदासाठी २२.५० वरून ५० लाख, रौप्यसाठी १५ वरून ३० लाख तर कांस्य पदासाठी ७.५ वरून २० अशी वाढ करण्यात आली आहे.
टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकी संदर्भातील स्पर्धांचाही यात समावेश करण्यात आला. टेनिसच्या चार वेगवेगळ्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला तीन कोटी रुपये तर उपविजेत्यास दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
बॅडमिंटन स्पर्धेतील थॉमस कप, उबर कप, सदीरमन कप या स्पर्धांतील विजयी खेळाडूला ४० लाख तर उपविजेत्यास २० लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. हॉकी स्पर्धांत अझलन शाह कप (वरिष्ठ) आणि चॅम्पीयन ट्रॉफीसाठी विजेत्यास ४० लाख तर उपविजेत्यास २० लाख आणि सुलतान जोहर कप (कनिष्ठ) विजेत्यास २० लाख तर उपविजेत्यास १० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.
खेळाडूंना यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांचाही यथोचित सन्मानाची तरतूद यात करण्यात आली. क्रीडा मार्गदर्शकास खेळाडूच्या रोख पारितोषिक रकमेच्या १० टक्के रक्कम बक्षिस म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. खेळाडूने प्रमाणित केलेल्या मार्गदर्शकांना हे पारितोषिक दिले जाणार आहे. जास्तीत जास्त तीन क्रीडा मार्गदर्शकांना हे पारितोषिक विभागून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक प्रशिक्षण देणाऱ्यास ३० टक्के, कौशल्य विकास करणाऱ्यास ३० टक्के तर अंतिम व प्रगत प्रशिक्षण देणाऱ्यास ४० टक्के असे पारितोषिक सूत्र ठरवण्यात आले आहे.
बदलत्या काळानुसार आणि क्रीडा क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेनुसार, या योजनेचा पुनर्विचार करून ती अधिक सर्वसमावेशक, तर्कसंगत आणि खेळाडू-केंद्रित बनवता त्यात अनेक क्रीडा स्पर्धांचाही समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स, नॅशनल गेम्स आणि खेलो इंडिया (सर्व प्रकार) स्पर्धेचा यात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्णबधीर (डेफ), अंध आणि विशेष ऑलिम्पिकसाठी नव्याने स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कर्णबधीर (डेफ) ऑलिम्पिक, आयबीएसए वडर्ल् चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप,वर्ल्ड गेम्स, अंध क्रिकेट वर्ल्ड कप, विशेष ऑलिंम्पिक, वर्ल्ड गेम्स फॉर मेंटली चॅलेन्जड, डेफ वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप (वरिष्ठ गट) या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सध्याच्या आठ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांची अट शिथिल करून देशांच्या सहभागानुसार पारितोषिकाची रक्कम ठरवली जाणार आहे. सांघिक प्रकारात १२ देशांचा तर वैयक्तिक प्रकारात १६ देशांचा समावेश असणाऱ्या स्पर्धेतील विजयासाठी १०० टक्के पूर्ण रक्कम, सांघिक ६ ते १२ देशांचा आणि वैयक्तीक ८ ते १२ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांसाठी ५० टक्के रक्कम तर सांघिक ४ ते ५ देशांचा समावेश आणि वैयक्तिकमध्ये ४ ते ७ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांसाठी २५ टक्के रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना याचा लाभ होणार आहे. याबाबतचा शासन निर्णयही लवकरच काढण्यात येणार आहे.
--००—
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ
दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांना मंजूरी
नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ तर अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ अशी दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
नागपूर येथे व्ही.एस.पी.एम अँकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेने खासगी आरोग्य विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. संस्थेकडे १ हजार १३८ खाटांचे सूसज्ज रुग्णालय आहे.
तर अहिल्यानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन या संस्थेने असे विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठाकडे वैद्यक विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था आहे. तसेच सर्व सुविधांनी युक्त असे ८३० खाटांचे रुग्णालय देखील आहे.
या दोन्ही संस्थाच्या विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार निरीक्षण समितीने पडताळणी करण्यात आली. समितीच्या शिफारसीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली.
--००—
(महसूल व वन विभाग)
जत नगरपरिषदेस प्रशासकीय इमारतीसाठी जमीन
सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेस प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
मौजे जत येथील सर्व्हे क्रमांक ५१०/२३/१ मधील एकूण ६६०० चौ.मी. क्षेत्रापैकी २५८५ चौ.मी. शासकीय जमीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी जत नगरपरिषदेस देण्यात येणार आहे. ही जमीन नगर विकास विभागामार्फत कब्जेहक्काने, भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने, भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने प्रदान करण्यास देण्यात आली आहे.
या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करणे बंधनकारक राहणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन हस्तांतरित, गहाण अथवा तारण ठेवता येणार नाही. तसेच जमिनीवर अन्य व्यक्ती, संस्था किंवा कंपनीचे हक्क निर्माण होतील अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत आणि पूर्वमान्यतेशिवाय जमिनीचे पोटविभाजन करता येणार नाही.
जमीन प्रदानाच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाच्या संबंधित शासन निर्णयातील तरतुदींनुसार जिल्हाधिकाऱ्यांसोबत करारनामा करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असेल. मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर बंद झाल्यास ती जमीन महाराष्ट्र शासनास विनामोबदला परत करावी लागेल.
जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची किंवा त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याची तसेच मंजूर जमिनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची राहणार आहे. या जमिनीच्या संदर्भात कोणताही न्यायालयीन अथवा अन्य प्रकारचा वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारीही जत नगरपरिषदेची राहील.
--००—
(विधि व न्याय विभाग)
पिंपळगाव बसवंत येथे होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे पिंपळगाव बसवंत व परिसरातील नागरिकांना न्यायालयीन सेवा अधिक सुलभ आणि जलद उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या न्यायालयासाठी मंजूर न्यायिक अधिकाऱ्यांच्या नियमित पदांमधून तसेच सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांमधून आवश्यक पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरासाठी एक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, एक अधीक्षक, दोन सहाय्यक अधीक्षक, एक लघुलेखक ग्रेड-२, दोन वरिष्ठ लिपिक आणि आठ कनिष्ठ लिपिक, अशी एकूण १५ नियमित पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय न्यायालयाच्या कामकाजासाठी बाह्ययंत्रणेद्वारे चार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये दोन शिपाई, एक पहारेकरी आणि एक सफाईगार यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे पिंपळगाव बसवंत आणि परिसरातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होऊन स्थानिक पातळीवर न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
००००
Friday, 21 August 2026
विश्व छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन रामन विज्ञान केंद्रात २२ व २३ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय प्रदर्शन
विश्व छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
रामन विज्ञान केंद्रात २२ व २३ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय प्रदर्शन
नागपूर, दि. २१ : विश्व छायाचित्रण दिन २०२६ निमित्त रामन विज्ञान केंद्र व तारांगण, नागपूर यांच्या वतीने पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI), नागपूर चॅप्टर आणि हिंदी पत्रकार संघ, नागपूर यांच्या सहकार्याने ‘Science through Lens’ या विषयावर विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय प्रदर्शन २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
प्रेस छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून विज्ञान, जिज्ञासा, संशोधन, शोध आणि वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित विविध विषयांना सर्जनशील स्वरूपात मांडले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे नागपूर अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रामन विज्ञान केंद्र व तारांगणाचे संचालक अमित मंडल, हिंदी पत्रकार संघाचे प्रमुख आनंद निर्बाण, नंदकिशोर पुरोहित, पीआरएसआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम) एस. पी. सिंह, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष यशवंत मोहिते, सचिव मनीष सोनी आणि कोषाध्यक्ष शरद मराठे यांच्यासह तिन्ही संस्थांचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२२ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाल्यानंतर हे प्रदर्शन २३ ऑगस्ट रोजीही नागरिकांसाठी खुले राहणार आहे. विज्ञान आणि छायाचित्रणाची आवड असलेले विद्यार्थी, युवक, छायाचित्रप्रेमी तसेच सर्वसामान्य नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देऊन विविध छायाचित्रांचा आस्वाद घेता येणार आहे.
००००
एसआयआर प्रक्रियेतील कामे कालमर्यादेत पूर्ण करा -मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम-पूर्व विदर्भातील एसआयआर तयारीचा घेतला आढावा
एसआयआर प्रक्रियेतील कामे कालमर्यादेत पूर्ण करा
-मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम
पूर्व विदर्भातील एसआयआर तयारीचा घेतला आढावा
नागपूर, दि. 21 : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-2026 प्रक्रियेतील टप्प्यातील सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी निवडणूक यंत्रणेला दिले.
सदर येथील नियोजन भवनात आज पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूरसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. जिल्हानिहाय कामाची प्रगती, मतदारांशी संपर्क, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी, सुधारित कालावधी, दावे व हरकती दाखल करणे, नोटीस टप्पा/ दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच माहिती जाणून घेण्यात आली.
SIR प्रक्रियेतील सर्वच टप्पे अत्यंत महत्वाचे असून या टप्प्यातील कामकाजात कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांनी दिल्या. बैठकीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश, नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकित, नागपूर विभागाचे अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामांचे सादरीकरण करण्यात आले.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील प्रत्येक टप्पा पारदर्शक, अचूक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आणि बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्री. चोकलिंगम यांनी दिले.
पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील SIR प्रक्रियेच्या प्रगतीचा आढावा घेत, या प्रक्रियेतील सर्व टप्प्यातील कामाला आवश्यक ती गती देऊन निर्धारित कालमर्यादा पाळण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
0000
Thursday, 20 August 2026
महा वॉकेथॉनमधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
महा वॉकेथॉनमधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी
-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. २१: माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कामाचा आदर्श घेत त्यांची जयंती २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार राज्यात सर्व जिल्ह्यात महा वॉकेथॉन आयोजित करण्यात आली. या 'महा वॉकेथॉन'च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडले आहे, अशी भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज व्यक्त केली.
वरळी येथील सागर पॉईंट जवळ आयोजित राज्यस्तरीय महा वॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रम प्रसंगी मंत्री राठोड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषद उप सभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, गायक संजू राठोड आदी उपस्थित आहेत.
मंत्री संजय राठोड म्हणाले, माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा, या संदेशातून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात सर्व जिल्ह्यात आयोजित या वॉकेथॉनमध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. माती आणि पाणी संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या विषयावर मंत्रालयात केवळ बैठक किंवा सभागृहातील कार्यक्रम घेण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. माती आणि पाणी हे राज्याच्या भवितव्याशी निगडित विषय असून, त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी या विषयाशी जोडले जाऊन जलसंधारणाच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाच्या कामांना संस्थात्मक स्वरूप देत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले. भविष्यातील महाराष्ट्रासाठी माती आणि पाण्याचे महत्त्व मंत्री राठोड यांनी यावेळी अधोरेखित केले.
‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम
- उपसभापती सचिन अहिर
माती वाचवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवण्याची संकल्पना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. पाणी ही प्रत्येकाची गरज असून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद ही भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहण्याची आशादायी सुरुवात आहे, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.
जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे
- मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक
जलसंधारण दिनानिमित्त आयोजित महा वॉकेथॉनसारख्या उपक्रम कौतुकास्पद आहे. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते आणि पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले. स्व. सुधाकरराव नाईक यांनी दूरदृष्टीने मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती केली असून, त्यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचा शुभारंभ आरे दुग्ध वसाहत जवळ सागरी किनारा रस्त्यालगत प्रोमोनेट येथून करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तुळशी रोपाला जल अर्पित करुन जलपूजन करण्यात आले. यावेळी माती व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली. यानंतर महा वॉकेथॉनची झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अभिनेते पुष्कर श्रोत्री, क्रिकेटर इरफान पठाण, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संजीव-श्रवण, अनिल सिंग, झहीर शेख जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक, सांस्कतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्याने यावेळी उपस्थित होते.
तीन किलोमीटर महा वॉकेथॉनमध्ये मान्यवरांचा सहभाग
जलसंधारणाचे महत्व सांगणारी आणि महाराष्ट्राला जल सुरक्षेचा संदेश देणाऱ्या महा वॉकेथॉनमध्ये मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संपूर्ण अंतर सहभागींसमवेत पायी चालून पूर्ण केले. त्यांच्यासोबत विधान परिषद उप सभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, तसेच इतर विभागांचे सचिव सहभागी झाले होते. सर्वांनी सहभागीदारांसमवेत पायी चालत त्यांचा उत्साह वाढविला.
क्षणचित्रे
· आरे दुग्ध वसाहतीपासून ते मद्रासवाडी पर्यंत ३ किलोमीटरची महा वॉकेथॉन.
· अभिनेते पुष्कर श्रोत्री, माजी क्रिकेटर इरफान पठाण, गायक संजू राठोड यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग.
· जल सुरक्षेचे महत्व पटवून देणारे माती वाचवा, पाणी जपा संबोधन गीत.
· तीन किलोमीटर महा वॉकेथॉनमध्ये अरबी समुद्राच्या साथीने विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
· ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून सहभागीदारांना बक्षीस वितरण
Subscribe to:
Posts (Atom)


