Friday, 13 February 2026

रब्बी हंगाम २०२४ पीक स्पर्धेच्या नागपूर विभागातील ११५ विजेत्या शेतकऱ्यांना मिळणार ७ लाखांची बक्षिसे


 

रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धा योजनेंतर्गत नागपूर विभागातील एकूण ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांच्या बक्षीसे लवकरच वितरीत होणार आहेत. विभागातून तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय, ३८ शेतकऱ्यांना जिल्हा तर ७४ शेतकऱ्यांना तालुका स्तरीय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील १ हजार ७ शेतकऱ्यांना बक्षिस वितरीत करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे व त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात भर पाडण्याच्या उद्देशाने  शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धांचे आयोजन करते. राज्यातंर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पीकस्पर्धा घेण्यात येते.

सन २०२५-२६ साठी विविध कृषि पुरस्कार व पीकस्पर्धा योजनेअंतर्गत ८ कोटींची अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे. तर रब्बी हंगाम २०२४ मधील, एकूण १००७ पीकस्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस रक्कम अदा करण्याकरिता कृषी,पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या १३ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार  कृषी आयुक्तालयास ५७ लाख २० हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

               नागपूर विभागातील ११५ शेतकऱ्यांना ७ लाखांची बक्षिसे

रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धेत भाग घेणाऱ्या नागपूर विभागातील शेतकऱ्यांपैकी ११५ शेतकऱ्यांची निवड तीन स्तरांवरील पुरस्कारांसाठी करण्यात आली. यानुसार तीन शेतकऱ्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असून बक्षिसापोटी १ लाख २० हजारांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.

 जिल्हा स्तरीय पुरस्कारासाठी ३८ शेतकऱ्यांची  निवड करण्यात आली असून बक्षिसापोटी २ लाख ८९ हजारांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. तर ७४ शेतकऱ्यांची तालुकास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असून बक्षिसापोटी २ लाख ९१ हजारांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.

रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धेंतर्गत राज्यातील एकूण १ हजार ७ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना ५७ लाख २० हजारांची बक्षिस वितरीत करण्यात येणार आहे. २६ शेतकऱ्यांची राज्यस्तरीय,२८० शेतकऱ्यांची जिल्हा तर ७०१ शेतकऱ्यांची तालुका स्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

                                             ००००

Thursday, 12 February 2026

विभागीय आयुक्त कार्यालयात 'मराठी भाषा पंधरवडा' साजरा विविध स्पर्धांचे आयोजन आणि उत्स्फूर्त सहभाग




 विभागीय आयुक्त कार्यालयात आज विविध स्पर्धांचे आयोजन करून मराठी भाषा पंधरवडा साजरा झाला. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अपरआयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार यांच्या हस्ते झाले. महसूल अपर आयुक्त राजेश खवले, रो.ह.यो. सहआयुक्त अविनाश हदगल, मागासवर्ग कक्षाच्या उपायुक्त डॉ. हंसा मोहने उपस्थित होत्या.
मराठी भाषा अधिकारी, कार्यक्रमाच्या संयोजक तथा सहायक आयुक्त भूसुधार शिल्पा सोनाले ,स्पर्धेचे परीक्षक अध्यापक महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शैलेश गायकवाड, बाया कर्वे होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापक अश्विनी बुजोणे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी चे प्रा.डॉ.प्रवीण गेडाम यावेळी उपस्थित होते.
श्री. राठोड आणि श्री. खवले यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठीतील विविध भाषा व्यवहार आणि मराठीच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत विचार मांडले.
मराठी भाषेच्या महत्वावर आधारित निबंध लेखन स्पर्धा, शासनस्तराहून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांवर आधारित चारोळी व घोषवाक्य स्पर्धा, शब्दकोडे आणि कविता वाचन स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. विभागीय आयुक्तालयातील विविध विभाग, संचालक माहिती व जनसंपर्कम महासंचालनालय, लेखा व कोषागारे,नागरी हक्क संरक्षण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस,वने,सार्वजनिक बांधकाम आदी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. शिल्पा सोनाले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. लवकरच स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असून बक्षीस वितरण होईल.

Tuesday, 10 February 2026

अंधारवाडीत विकासाचा उजेड मधाच्या गावामुळे मिळाली नवी ओळख




 

विशेष लेख

अंधारवाडीत विकासाचा उजेड

मधाच्या गावामुळे मिळाली नवी ओळख

.

महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील अंधारवाडी या चिमुकल्या

आदिवासी गावाने मध संकलातून विकासाचा मार्ग साधला आहे.

राज्य सरकारने या गावाच्या हातात हात घालून त्याला ‘मधाचे गाव

ही नवी ओळख मिळवून दिली.

या गावाच्या ‘विकास वाटेवरील प्रवासाविषयी..

 

विदर्भाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर केवळ शहरं नाही तर गावपातळीवर देखील लहान- मोठे उद्योग उभे राहावे, राज्यातील प्रत्येक छोट्या- छोट्या गावांचा विकास होऊन ती स्वावलंबी व्हावी, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असलेले स्वप्न अंधारवाडीत पूर्ण होताना दिसत आहे. गतवर्षी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने विदर्भात सुरू झालेला अंधारवाडी ‘मधाचे गाव प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. गावात रोजगार निर्माण करून पर्यटनाला हातभार लावण्याचे असे लहान – मोठे प्रयोग लक्षणीय ठरतात. हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत टिपेश्वरच्या जंगलाला लागून असलेल्या या गावात गोंड आणि कोलाम या आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. मधमाशांचा मुक्त संचार असलेल्या या परिसरातील झाडांवरच्या मधाच्या पोळ्यातील मध काढून ते 20 किमीवरील पांढरकवड्याला 50 रुपये किलो दराने विकायचे. मात्र येथील मधाची उपलब्धता पाहून राज्य शासनाने मधाचे गाव म्हणून अंधारवाडी विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि या गावाची वाटचाल स्वावलंबनातून समृद्धीकड़े सुरू झाली. दीड वर्षांपूर्वी पांढरकवडा येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुहास गाडे यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन मधामुळे त्यांचे आयुष्य कसे बदलू शकते, हे समजावून सांगितले. गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आता विद्यमान उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांच्या नेतृत्वात अंधारवाडीची वाटचाल उजेडाकडे सुरू आहे.

येथे पूर्वी पारंपरिक पद्धतीने मध गोळा केले जायचे. मात्र शासनाने त्यांना शास्त्रीय पद्धतीने मध गोळा करण्याच्या पद्धत शकविली. त्यासाठी दहा दिवसांच्या प्रशिक्षणासहच पुणे, महाबळेश्वर येथे त्यांचा अभ्यास दौराही केला. त्यामुळे मध संकलनात अन्यत्र काय सुरू आहे हे पाहून, मध आपले भाग्य बदलवू शकते, याची त्यांना खात्री पटली. आजवर 50 रुपये किलोने 20 किमी दूर जाऊन विकाव्या लागणाऱ्या मधाला आता गावातच 1000 रुपये  किलोचा दर मिळू लागण्याचा चमत्कार यामुळे घडला आहे.

त्यासाठी शासनाने येथे 200 मधुमक्षिका पालन पेट्या दिल्या. घराच्या परिसरात किंवा लगतच्या जंगलात या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मधमाशांचे पोळे या पेट्यांमध्ये तयार होते आणि पोळे पूर्ण झाले की, त्यातून मध काढण्यात येते. एका पेटीतून साधारण एक ते दोन किले मध निघते, अशी माहिती येथील व्यंकटेश दळांजे यांनी दिली.

पूर्वी झाडावरील पोळ्यातून मध काढायचे म्हणजे झाडावर चढावे लागायचे. त्यातही कधी वन्यप्राणी तर  कधी मधमाशांच्या हल्ल्याची भीती, पण आता त्यातून सुटका झाली आणि या सुरक्षित शास्त्रीय पद्धतीने गावातील महिलाही मध संकलित करू लागल्या आहेत. मध उत्पादन वाढण्यासाठी लवकरच येथे मधुबनची निर्मिती केली जाणार असून, त्यासाठी 12 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. आता फक्त मधावर आपला उदरनिर्वाह होऊ शकतो, याची खात्री गावकऱ्यांना पटली आहे. आजवर मध विकण्यासाठी फिरावे लागायचे, ती वणवण शासनाच्या प्रयत्नांनी थांबली आहे. या मधाला हक्काची बाजारपेठ नव्हती, मात्र आता टिपेश्वर अभयारण्यात येणारे पर्यटकच अंधारवाडीत येऊन मध खरेदी करतात, असे येथील विकास क्षीरसागर यांनी सांगितले.

मधाचे गाव ही ओळख मिळाल्यामुळे पर्यटकांचा ओघ येथे वाढला. गावात पोहचण्यासाठी पूर्वी

रस्ता नव्हता, तो राज्य शासनाने प्राधान्याने केला. अंगणवाडीची नवीन इमारत, नवीन घरकुले, गावकऱ्यांना बसण्यासाठी परंपरा जपत बांधलेला पार, घरांच्या भिंतीवरची मधमाशांची रंगीत चित्रे येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.

मधामुळे उत्पन्न वाढून राहणीमान बदलले. आर्थिक स्थिती आता आधीसारखी राहिली नाही, अशी प्रतिक्रिया येथील पोलीस पाटील कविता दळांजे यांनी व्यक्त केली, तर प्रत्येक गोष्टीसाठी मोठ्या गावात जावे लागायचे. अडचणी यायच्या पण सरकारच्या या योजनेमुळे ते चित्र राहिले नसल्याचे लक्ष्मी टेकाम सांगतात.

येथील सरपंच लक्ष्मी भूजंग मेश्राम म्हणाल्या की, मधमाशांनी आमचे नशीबच बदलले. मधाला भाव तर मिळायला लागलाच पण अनेक सुविधा गावात आल्या. आधी रस्ता नसल्याने कोणतेही वाहन गावात येऊ शकत नव्हते. रुग्णाला खाटेवर दवाखान्यात न्यावे लागायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. टिपेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना येथे मध तर मिळतेच पण गावकरी त्यांना बैलबंडीची सफारी घडवितात. बैलबंडीचे अप्रुप असलेले पर्यटक त्यात बसून गावात चक्कर मारतात. त्याचे पाचशे रुपये मिळतात. याशिवाय पर्यटकांसाठी पारंपरिक गोंडी नृत्यही सादर करण्यात येते. त्याकरिता शासनाने एक खुले सभागृह बांधून दिले आहे.

मधाचे गाव प्रकल्पामुळे या गावात विकासगंगा पोहचली आणि येथील अर्थकारण लक्षणीय बदलले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत या उपक्रमाला साह्य करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शबरी आदिवासी अर्थ विकास महामंडळाच्या शबरी नॅचरल्समध्ये या मधाचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे देशात कुठूनही या मधाची खरेदी करता येईल. लवकरच गावात मध विक्रीचे केंद्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांनी दिली.

मधाच्या गावाची ही सुरुवात आहे. कायमस्वरूपी मधुबन, मार्केटिंग, पॅकेजिंग आणि अन्य बाजारपेठ, प्रसिद्धी असे अनेक टप्पे बाकी आहेत. हे जरी खरी असले तरी सुरुवात होणे ही बाब देखील तेव्हढीच महत्त्वाची आहे. स्थानिक संसाधनांचा उपयोग करून गाव कसे समृद्धीकडे नेता येऊ शकते, याचा आदर्श अंधारवाडीने घालून दिला आहे हे निश्चित.

                                                                            -   अविनाश महालक्ष्मे

विभागीय आयुक्त कार्यालयात 'मराठी भाषा पंधरवडा' साजरा विविध स्पर्धांचे आयोजन आणि उत्स्फूर्त सहभाग




 

 

        : विभागीय आयुक्त कार्यालयात आज  विविध स्पर्धांचे आयोजन करून मराठी भाषा पंधरवडा  साजरा झाला. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

 

         आयुक्तालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अपरआयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार यांच्या हस्ते  झाले. महसूल अपर आयुक्त राजेश खवले, रो.ह.यो. सहआयुक्त अविनाश हदगल, मागासवर्ग कक्षाच्या उपायुक्त डॉ. हंसा मोहने उपस्थित होत्या.

 

      मराठी भाषा अधिकारी, कार्यक्रमाच्या संयोजक तथा सहायक आयुक्त भूसुधार शिल्पा सोनाले, स्पर्धेचे परीक्षक अध्यापक महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शैलेश गायकवाड, बाया कर्वे होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापक अश्विनी बुजोणे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी चे प्रा.डॉ.प्रवीण गेडाम यावेळी उपस्थित होते.

 

    श्री. राठोड आणि श्री. खवले यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठीतील विविध भाषा व्यवहार आणि मराठीच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत विचार मांडले.

 

       मराठी भाषेच्या महत्वावर आधारित निबंध लेखन स्पर्धा, शासनस्तराहून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांवर आधारित चारोळी व घोषवाक्य स्पर्धा, शब्दकोडे आणि कविता वाचन स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. विभागीय आयुक्तालयातील  विविध विभाग, संचालक माहिती व जनसंपर्कम महासंचालनालय, लेखा व कोषागारे,नागरी हक्क संरक्षण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस,वने,सार्वजनिक बांधकाम आदी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. शिल्पा सोनाले यांनी सूत्रसंचालन केले व आभार  मानले. लवकरच स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असून बक्षीस वितरण होईल.

०००००