Wednesday, 19 August 2026
वैनगंगा- नळगंगामुळे साकारणार हिरवे स्वप्न विदर्भाला नवसंजीवनीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प
वैनगंगा- नळगंगामुळे साकारणार हिरवे स्वप्न
विदर्भाला नवसंजीवनीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प
विदर्भ म्हणजे दुष्काळी प्रदेश, विदर्भ म्हणजे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा प्रदेश असे सारे नकारात्मक बोलले जात असताना आता हाच विदर्भ येत्या काळात सुजलाम- सुफलाम असा संपन्न प्रदेश होणार आहे. या प्रदेशावरील नकारात्मकतेचा हा डाग पुसून काढण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि जिद्दीने वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या दिशेने त्यांनी पावले उचलली. प्रामुख्याने कोरडवाहू शेती असलेल्या विदर्भात पावसाच्या अनियमिततेमुळे निसर्गावर अवलंबून असलेली शेती तोट्यात येते आणि बळीराजा संकटात सापडतो. गेले कित्येक वर्षे हे असेच सुरू आहे. त्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक होते. दोन टोकांवरील दोन नद्या जोडणे हा त्यावर उपाय होता मात्र हे आव्हान सोपे नव्हते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शिवधनुष्य उचलले. त्यामुळेच एक आधुनिक जलक्रांती या प्रकल्पामुळे होणार आहे. ९४ हजार ९६७.६६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी ३१ हजार ४९४ हेक्टर जमीन आवश्यक आहे. गोसीखुर्द प्रकल्पात पावासाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी नळगंगा नदीकडे वळविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात फक्त सत्तर दिवस गोसीखुर्द धरणामधून पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवून त्याद्वारे विदर्भाचे दुसरे टोक सुजलाम सुफलाम करण्याचा हा भगिरथ प्रयत्न आहे. यात गोसीखुर्दमधून ६३.७३ टीएमसी पाण्याची उचल करण्यात येईल व ते पाणी शेती, उद्योग तसेच पिण्यासाठी वापरता यावे म्हणून अंदाजे शंभर मीटर रुंद व ३८८ कि.मी. लांब मुख्य कालवा तयार करण्यात येईल. मुख्य कालव्याला जोडून ५० धरणांमध्ये साठवण, ३२ उपसा योजना आणि आठ जिल्ह्यांतील ३८ तालुक्यांमध्ये उपकालवे असतील. मुख्य कालव्यात १३ बोगदे असतील व त्यांची एकूण लांबी २० कि.मी.पेक्षा अधिक असेल.
गोसीखुर्द व नळगंगा यांच्यासह सैकी, मकरधोकडा, पांढराबोडी, जावली, लोअर वणा, बोर, धाम महाकाली, सुकळी, लोअर वर्धा, अपर वर्धा, बेंबळा, घोटा, हातोला, काटेपूर्णा, मन अशा सध्या अस्तित्वात असलेल्या अठरा धरणांचा वापर साठवणीसाठी होणार आहे. यापैकी दहा धरणांची उंची वाढवून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याची योजना आहे. याशिवाय ३२ नवीन धरणे बांधली जाणार आहेत. विदर्भाचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे ४ लक्ष ०४ हजार २८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. परिणामी या भागातील शेतकरी दुबार वा तिबार पिके घेऊ शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेलच शिवाय या प्रकल्पात १५१.२० दशलक्ष घ.मी. पाणी उद्योगांसाठी राखीव असल्याने उद्योग विकासालाही चालना मिळेल. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. या प्रकल्पात निम्न वर्धा, काटेपूर्णा, नळगंगा हे तीन प्रकल्प बॅलन्सिंग रिझरवायर म्हणून वापरण्यात येतील. त्यामुळे पाण्याचे वर्षभराचे नियोजन करता येईल.
या प्रकल्पामुळे ४ लक्ष ०४ हजार २८१ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येईल. त्यात गोसीखुर्द ते धारगाव ११८९० हे., गोसीखुर्द ते निम्न वर्धा १,६६,०४१ हे., निम्न वर्धा ते काटेपूर्णा १,४५,०३९ हे. व काटेपूर्णा ते नळगंगा ८१३११ हेक्टर असे क्षेत्र असेल. भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रामुख्याने लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील घरगुती व औद्योगिक पाणी वापराचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन विदर्भ एक संपन्न प्रदेश अशी ओळख निर्माण करण्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वप्न आहे. फक्त दोन नद्या जोडणे आणि इकडले पाणी तिकडे नेणे एव्हढ्यापुरताच हा प्रकल्प मर्यादित नाही, तर सिंचन क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प साऱ्या देशासाठीच आदर्श वाटावा असा आहे.
अविनाश महालक्ष्मे
नागपूर
जलसंधारणाचा नागपूर पॅटर्न ठरतो प्रभावी विदर्भात ५४ हजार ४१३ कामे पूर्ण गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत १३८.९३ लक्ष घन मीटर गाळ काढला
जलसंधारणाचा नागपूर पॅटर्न ठरतो प्रभावी
विदर्भात ५४ हजार ४१३ कामे पूर्ण
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत
१३८.९३ लक्ष घन मीटर गाळ काढला
नागपूर, दि. १९ : शेतीला शाश्वत सिंचनासोबत कृषी उत्पादन वाढविण्यासाठी मृद व जलसंधारणांतर्गत जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत विविध विभागाच्या अभिसरणासोबत पाणलोट विकासांतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तसेच माजी मालगुजारी तलावांच्या बळकटीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर व अमरावती विभागात जलसंधारणांतर्गत ६५ हजार १७३ कामे मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ५४ हजार ४१३ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच १० हजार ७६० कामे प्रगतीपथावर आहेत.
शेतामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या संवर्धानासोबतच जलसंधारणाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत प्रत्येक गावात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्याच्या विशेष कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागातील ७६९ गावांमध्ये २५ हजार १५९ उपाययोजना तर नागपूर विभागातील ७४२ गावांमध्ये १५ हजार १०२ कामांचे नियोजन करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पासाठी ९५३ कोटी ६७ लक्ष रूपये किमतीच्या कामाचे आराखडे तयार करण्यात आले आहे. त्यापैकी जुलै अखेर पर्यंत ३४ हजार १८४ कामे पूर्ण झाली असून, या कामांवर ६७२ कोटी १९ लक्ष रूपयांचा निधी खर्च झाला आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.० विशेष निधीअंतर्गत नागपूर-अमरावती विभागातील २०७० गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये १६ हजार २७८ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांवर ७९६ कोटी ९८ लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे. विशेष निधीअंतर्गत जुलै अखेर १३ हजार ६९२ कामे पूर्ण झाली असून या कामांद्वारे ५५५१ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी खर्च झाला आहे. विशेष निधीअंतर्गत अमरावती विभागातील ९६९ गावांत ९ हजार ८९ कामांची निवड करण्यात आली असून, या कामांवर ४९९ कोटी ८१ लक्ष रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ६ हजार ८३४ कामे पूर्ण झाली आहेत.
नागपूर विभागातील १ हजार १०१ गावांची जलसंधारणाच्या विशेष निधीअंतर्गत निवड करण्यात आली आहे. यातंर्गत ७ हजार १८९ कामे मंजूर करण्यात आली असून यावर २९७ कोटी १७ लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ६ हजार ८५८ कामे पूर्ण झाली आहेत.
मामा तलावांचे बळकटीकरण
विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या बळकटीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. विभागातील १ हजार ४९ मामा तलावांच्या बळकटीकरणासाठी २३१ लक्ष रूपये खर्च करण्यात येत असून ३९५ तलावांचे बळकटीकरण पूर्ण झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या बळकटीकरणांतर्गत २७ कामांना मंजुरी देण्यात आली असून १२ कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ३६० कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी, १७२ कामे पूर्ण झाली, १८६ कामे प्रगतीपथावर आहेत. भंडारा जिल्ह्यातील ९५ कामांपैकी ४८ कामे पूर्ण झाली आहेत. तर ४७ कामे प्रगतीपथावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ४६० कामांपैकी १०३ कामे पूर्ण झाली आहेत, तर १६७ कामे प्रगतीपथावर आहेत. ४१ कामांना कार्यरंभ आदेश देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १०७ कामांपैकी ६० कामे पूर्ण झाली आहेत.
अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील २८ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १९ कामे पूर्ण झाली आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियांतर्गत विभागातील जलसाठ्यातील १३५.७४ ल.घ.मी गाळ काढण्यात येणार आहे. त्यापैकी ८५.७९ लक्ष घ.मी गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. नाला खोलीकरण व रूंदीकरण यातंर्गत १२९.८७ लक्ष घ.मी गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाली असून त्यापैकी ५३.१४ ल.घ.मी नाला खोलीकरण व रुंदीकरणांतर्गत गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या योजनेंतर्गत अमरावती विभागातील २४ प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२१ कामे सुरू आहेत. त्यापैकी २ हजार ७८१ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ७५ कोटी ७९ लक्ष रूपये खर्च झाला आहे.
नागपूर विभागातील या योजनेंतर्गत २३ प्रकल्प मंजूर करण्यात आले असून, ४ हजार १३६ कामे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी आतापर्यंत ३ हजार ३४२ कामे पूर्ण झाली आहे. या कामांवर ७८ कोटी ७६ लक्ष रूपये खर्च झाला आहे. पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन २.० अंतर्गत नागपूर व अमरावती विभागात ४७ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ७ हजार ५५७ कामांपैकी ६ हजार १२३ कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर १५४ कोटी १५ लक्ष रुपये खर्च झाले आहेत.
नागपूर व अमरावती विभागात मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्रामध्ये जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असून, अपूर्ण कामे नियोजित वेळात पूर्ण करण्यात येणार असून शेतीला सिंचनासोबतच भूर्गभातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. या उपक्रमामुळे कृषी उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होणार आहे.
अनिल गडेकर
नागपूर
Tuesday, 18 August 2026
महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग
महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग
मुंबई, दि. १८ : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये
‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेते संजय दत्त यांना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी निमंत्रित केले असून, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.
जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा आणि हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करावा, या उद्देशाने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना ‘महा वॉकेथॉन’मध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमाल ३ किलोमीटर अंतराची महा वॉकेथॉन आयोजित केली आहे. या वॉकेथॉननंतर सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेतली जाणार आहे. सहभागी नागरिकांना
ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार आहे.
या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रथम १० विजेत्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय प्रायोजकांच्या माध्यमातून एकूण ७१ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सोडतीद्वारे सात सहभागींची निवड करून प्रत्येकी ३ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश घेऊन होणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते
२६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून २१ ऑगस्ट रोजी होणारा ‘महा वॉकेथॉन’ जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पेंच प्रकल्पामुळे १ लक्ष हेक्टरवर कृषी क्रांती
पेंच प्रकल्पामुळे १ लक्ष हेक्टरवर कृषी क्रांती
ग्रामीण भागातील जनतेच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत शेती आहे. शेतीला सिंचनाची जोड मिळाली तरच शेती किफायतशीर होऊ शकते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढविली तर प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येऊ शकते. शाश्वत सिंचनामुळे शेतकरी पारंपरिक पिकांव्यतिरिक्त नगदी आणि फळ पिके घेऊ लागले आहेत. ही किमया पेंच सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीमुळे सहज शक्य झाली आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील सुमारे १ लक्ष ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर पेंच सिंचन प्रकल्पामुळे कृषी क्रांती शक्य झाली आहे.
गोदावरी खोऱ्याच्या वैनगंगा उपखोऱ्यातील पेंच नदीवर तोतलाडोह व पेंच पाटबंधारे प्रकल्प नवेगाव खैरी पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाची साठवणूक क्षमता 230 दक्षलक्ष घनमिटर असून संकल्पीय उपयुक्त साठा 141.74 द.ल.घ.मी आहे. राज्यातील पूर्ण निर्मित सिंचन क्षमता करणारा हा पहिलाच प्रकल्प असून, उजव्या व डाव्या कालव्याद्वारे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लक्ष ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.
रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी व सावनेर या तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यात धान हे प्रमुख पीक आहे. धानासाठी आवश्यक असलेले मुबलक पाणी उपलब्ध नसल्यामुळे तसेच अनश्चित व अपुऱ्या पावसामुळे तसेच दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होत होता. पेंच सिंचन प्रकल्पामुळे रब्बी व खरीप हंगामातील सर्वच पिकांना या सिंचनाचा लाभ झाला आहे. सिंचनामुळे शेतीची उत्पादकता वाढत असून आर्थिक स्वंयपूर्णता निर्माण झाली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या राहणीमानात अमूलाग्र बदल झाला असून शेती ही जीवनदायनी ठरत आहे.
पेंच सिंचन प्रकल्पामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पारंपरिक पिकांसोबतच ऊस, धान, लांब धाग्याचा कापूस, रब्बी पिके, उन्हाळी पि तसेच फळबागासह रोख नगदी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे २७ हजार ३०० हेक्टर क्षेत्र, तर डाव्या कालव्याद्वारे ७३ हजार ९००० हेक्टर क्षेत्र तसेच दुबार पिकांतर्गत ३ हजार २७६ हेक्टर अशा १ लक्ष ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सिंचन प्रकल्पाची निर्मिती करतांना प्रस्तावित केलेल्या प्रकल्पीय सिंचन क्षमता पूर्ण करणारा हा प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पाची अद्यायवत किंमत १ हजार ६८५ कोटी ८८ लक्ष रू. असली तरी या प्रकल्पामुळे निर्माण झालेली सिंचन क्षमता ही प्रकल्पाच्या किमतीपेक्षा जास्तच आहे. मागील तीन दशकांपासून शेतकऱ्यांना या सिंचन प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.
2/-
.2.
सिंचनासोबतच जलविद्युत निर्मिती
पेंच नदीवर तोतलाडोह येथे मुख्य धरण असून या प्रकल्पाचे बांधकाम १९८९ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. तोतलाडोह येथे पेंच जलविद्युत मुख्य धरण असून या प्रकल्पात १ हजार २४१ द.ल.घ.मी. एवढी साठण क्षमता असून उपयुक्त १ हजार १६ द.ल.घ.मी जलसाठा आहे. या प्रकल्पातून विद्युत निर्मिती झाल्यानंतर ३३ कि.मी अंतरावर नवेगाव खैरी येथे दुसऱ्या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता २३० द.ल.घ.मी असून संकल्पीय उपयुक्त साठा १४१.७४ द.ल.घ.मी आहे. या व्यतिरिक्त रामटेक जवळील खिंडसी जलाशयाचा पेंच प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला असून येथे १०३ द.ल.घ.मी उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.
पेंच प्रकल्पाचा उजव्या मुख्य कालव्याची लांबी ४८.५० कि.मी. असून या कालव्यातून प्रती सेकंद २८.४० घ.मी. पाण्याची वहन क्षमता आहे. या कालव्यामुळे नागपूर जिल्ह्यातील ३० हजार ५०० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ झाला आहे. याव्यतिरिक्त नागपूर शहरास पिण्यासाठी पाणी, कोराडी औष्णिक विद्युत केंद्रास वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा होत आहे. पेंच डाव्या मुख्य कालव्याची लांबी ३२.८५ कि.मी असून वहन क्षमता ९० घ.मी आहे. या कालव्याद्वारे नागपूर जिल्ह्यातील ५२ हजार ५०० हेक्टर व भंडारा जिल्ह्यातील २१ हजार ४०० हेक्टर अशा ७३ हजार ९००० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होत आहे.
शेतीला सिंचनाची जोड मिळाल्यामुळे परिवर्तनाची सुरवात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीला शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवारसह विविध उपक्रम राबविले असून राज्यातील सिंचन प्रकल्पामुळे उपलब्ध असलेला जलसाठा सिंचनासाठी जास्तीत जास्त कसा वापरता येईल यासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या सिंचन प्रकल्पाच्या प्रकल्पीय सिंचन क्षमता व प्रत्यक्ष निर्मित सिंचन क्षमता पूर्ण करणारा हा प्रकल्प ठरला आहे. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील कृषी क्रांतीला चालना देणारा या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला सुद्धा चालना मिळून सर्वसामान्य जनेतत आमूलाग्र बदल घडत आहे.
अनिल गडेकर
नागपूर
००००
Subscribe to:
Posts (Atom)



