Friday, 21 August 2026

विश्व छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन रामन विज्ञान केंद्रात २२ व २३ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय प्रदर्शन

विश्व छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन रामन विज्ञान केंद्रात २२ व २३ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय प्रदर्शन नागपूर, दि. २१ : विश्व छायाचित्रण दिन २०२६ निमित्त रामन विज्ञान केंद्र व तारांगण, नागपूर यांच्या वतीने पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI), नागपूर चॅप्टर आणि हिंदी पत्रकार संघ, नागपूर यांच्या सहकार्याने ‘Science through Lens’ या विषयावर विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय प्रदर्शन २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. प्रेस छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून विज्ञान, जिज्ञासा, संशोधन, शोध आणि वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित विविध विषयांना सर्जनशील स्वरूपात मांडले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे नागपूर अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रामन विज्ञान केंद्र व तारांगणाचे संचालक अमित मंडल, हिंदी पत्रकार संघाचे प्रमुख आनंद निर्बाण, नंदकिशोर पुरोहित, पीआरएसआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम) एस. पी. सिंह, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष यशवंत मोहिते, सचिव मनीष सोनी आणि कोषाध्यक्ष शरद मराठे यांच्यासह तिन्ही संस्थांचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. २२ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाल्यानंतर हे प्रदर्शन २३ ऑगस्ट रोजीही नागरिकांसाठी खुले राहणार आहे. विज्ञान आणि छायाचित्रणाची आवड असलेले विद्यार्थी, युवक, छायाचित्रप्रेमी तसेच सर्वसामान्य नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देऊन विविध छायाचित्रांचा आस्वाद घेता येणार आहे. ००००

एसआयआर प्रक्रियेतील कामे कालमर्यादेत पूर्ण करा -मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम-पूर्व विदर्भातील एसआयआर तयारीचा घेतला आढावा

एसआयआर प्रक्रियेतील कामे कालमर्यादेत पूर्ण करा -मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम पूर्व विदर्भातील एसआयआर तयारीचा घेतला आढावा नागपूर, दि. 21 : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-2026 प्रक्रियेतील टप्प्यातील सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी निवडणूक यंत्रणेला दिले. सदर येथील नियोजन भवनात आज पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूरसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. जिल्हानिहाय कामाची प्रगती, मतदारांशी संपर्क, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी, सुधारित कालावधी, दावे व हरकती दाखल करणे, नोटीस टप्पा/ दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच माहिती जाणून घेण्यात आली. SIR प्रक्रियेतील सर्वच टप्पे अत्यंत महत्वाचे असून या टप्प्यातील कामकाजात कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांनी दिल्या. बैठकीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश, नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकित, नागपूर विभागाचे अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामांचे सादरीकरण करण्यात आले. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील प्रत्येक टप्पा पारदर्शक, अचूक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आणि बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्री. चोकलिंगम यांनी दिले. पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील SIR प्रक्रियेच्या प्रगतीचा आढावा घेत, या प्रक्रियेतील सर्व टप्प्यातील कामाला आवश्यक ती गती देऊन निर्धारित कालमर्यादा पाळण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. 0000

Thursday, 20 August 2026

महा वॉकेथॉनमधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

महा वॉकेथॉनमधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई, दि. २१: माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कामाचा आदर्श घेत त्यांची जयंती २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार राज्यात सर्व जिल्ह्यात महा वॉकेथॉन आयोजित करण्यात आली. या 'महा वॉकेथॉन'च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडले आहे, अशी भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज व्यक्त केली. वरळी येथील सागर पॉईंट जवळ आयोजित राज्यस्तरीय महा वॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रम प्रसंगी मंत्री राठोड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषद उप सभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, गायक संजू राठोड आदी उपस्थित आहेत. मंत्री संजय राठोड म्हणाले, माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा, या संदेशातून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात सर्व जिल्ह्यात आयोजित या वॉकेथॉनमध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. माती आणि पाणी संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या विषयावर मंत्रालयात केवळ बैठक किंवा सभागृहातील कार्यक्रम घेण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. माती आणि पाणी हे राज्याच्या भवितव्याशी निगडित विषय असून, त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी या विषयाशी जोडले जाऊन जलसंधारणाच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाच्या कामांना संस्थात्मक स्वरूप देत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले. भविष्यातील महाराष्ट्रासाठी माती आणि पाण्याचे महत्त्व मंत्री राठोड यांनी यावेळी अधोरेखित केले. ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम - उपसभापती सचिन अहिर माती वाचवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवण्याची संकल्पना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. पाणी ही प्रत्येकाची गरज असून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद ही भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहण्याची आशादायी सुरुवात आहे, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले. जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे - मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक जलसंधारण दिनानिमित्त आयोजित महा वॉकेथॉनसारख्या उपक्रम कौतुकास्पद आहे. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते आणि पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले. स्व. सुधाकरराव नाईक यांनी दूरदृष्टीने मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती केली असून, त्यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचा शुभारंभ आरे दुग्ध वसाहत जवळ सागरी किनारा रस्त्यालगत प्रोमोनेट येथून करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तुळशी रोपाला जल अर्पित करुन जलपूजन करण्यात आले. यावेळी माती व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली. यानंतर महा वॉकेथॉनची झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अभिनेते पुष्कर श्रोत्री, क्रिकेटर इरफान पठाण, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संजीव-श्रवण, अनिल सिंग, झहीर शेख जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक, सांस्कतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्याने यावेळी उपस्थित होते. तीन किलोमीटर महा वॉकेथॉनमध्ये मान्यवरांचा सहभाग जलसंधारणाचे महत्व सांगणारी आणि महाराष्ट्राला जल सुरक्षेचा संदेश देणाऱ्या महा वॉकेथॉनमध्ये मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संपूर्ण अंतर सहभागींसमवेत पायी चालून पूर्ण केले. त्यांच्यासोबत विधान परिषद उप सभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, तसेच इतर विभागांचे सचिव सहभागी झाले होते. सर्वांनी सहभागीदारांसमवेत पायी चालत त्यांचा उत्साह वाढविला. क्षणचित्रे · आरे दुग्ध वसाहतीपासून ते मद्रासवाडी पर्यंत ३ किलोमीटरची महा वॉकेथॉन. · अभिनेते पुष्कर श्रोत्री, माजी क्रिकेटर इरफान पठाण, गायक संजू राठोड यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग. · जल सुरक्षेचे महत्व पटवून देणारे माती वाचवा, पाणी जपा संबोधन गीत. · तीन किलोमीटर महा वॉकेथॉनमध्ये अरबी समुद्राच्या साथीने विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. · ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून सहभागीदारांना बक्षीस वितरण

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्षिततेच्या दिशेने सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सातत्याने कार्यरत असून जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे. जलयुक्त शिवारातून गावांच्या जलसमृद्धीकडे जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये जलसाठे वाढले, विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा झाली आणि संरक्षित सिंचनाला चालना मिळाली. ज्या शेतकऱ्यांना पूर्वी वर्षातून एकच पीक घेता येत होते, अशा अनेक भागांत दुबार पिकांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. जलसंधारणामुळे निर्माण होणारे संरक्षित सिंचन केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण बाजारपेठ, रोजगार, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांनाही चालना देते. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत राज्यातील ५,८५८ गावांमध्ये सुमारे १.४३ लाखांहून अधिक कामे प्रस्तावित झाली आहेत. त्यापैकी १.२४ लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. जुलै २०२६ अखेर या अभियानावर २,३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार-पाण्यासोबत मातीलाही नवजीवन ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना पर्यावरण आणि शेती यांचा सुंदर समन्वय साधणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढते, तर तोच सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होते. २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३,३०५ जलाशयांमधून ९८०.५० लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, तो सुमारे १ लाख ९३ हजार एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ८१,११४ स.घ.मी. पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. म्हणजेच जलसंधारण हे शेतीला केवळ पाणी देत नाही, तर जमिनीलाही नवजीवन देते. भूजल पुनर्भरण-भविष्याच्या जलसुरक्षेची गुरुकिल्ली भूजल पुनर्भरण हा जलसंधारणाचा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक फायदा आहे. गेल्या काही दशकांत भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यामुळे अनेक भागांत विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलची खोली वाढणे आणि उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा शेतीसोबतच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो. पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जमिनीत मुरविले, तर भूजल पातळी सुधारण्यास मदत होते. ही प्रक्रिया केवळ शेतीसाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन उपलब्धतेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. भविष्यातील गंभीर पाणीटंचाईचे संकट टाळायचे असेल, तर भूजल संवर्धन आणि पुनर्भरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. जलसंधारण म्हणजे पर्यावरणाचेही संवर्धन जलसंधारणाचा पर्यावरणावरही अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. एखाद्या भागात पाणी टिकून राहिले, तर तेथील जैवविविधतेला आधार मिळतो. वृक्षसंवर्धनाला चालना मिळते, जमिनीतील ओलावा टिकतो आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत होण्यास मदत होते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनंतर स्थानिक जैवविविधता आणि जलचरांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची उदाहरणे दिसून येतात. त्यामुळे जलसंधारण ही केवळ विकासाची योजना नसून निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची प्रक्रिया आहे. हवामान बदलाच्या आव्हानाला जलसंधारणाचे उत्तर आज हवामान बदल हे जगासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे. पावसाचे स्वरूप बदलत आहे. काही दिवसांत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ काळ पावसाचा खंड असे चित्र अनेक भागांत दिसून येते. अशा परिस्थितीत केवळ मोठी धरणे किंवा पारंपरिक सिंचन व्यवस्था पुरेशी ठरणार नाही. गाव पातळीवर पाणी अडवणे, पाणलोट विकास करणे, नैसर्गिक जलमार्ग जिवंत ठेवणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणे हा शाश्वत मार्ग आहे. हवामान बदल आणि पर्जन्यमानातील अनिश्चिततेचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली आहे. आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे. गुणवत्तापूर्ण कामे आणि कालबद्ध अंमलबजावणी या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका आहे. विभागाच्या नव्या प्रशासकीय आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळाली आहे. मंजूर कामे मूळ आराखड्यानुसार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांनाही प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून जलसंधारण अधिक परिणामकारक करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर कामे केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये १४० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून सुमारे ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला चालना देणारी विविध कामे सुरू आहेत. या योजनेचे एकूण प्रकल्पमूल्य १,२५१.११ कोटी रुपये असून, जुलै २०२६ अखेर सुमारे १,००३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिमेंट बंधारे, पाणलोट विकास, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंवर्धन उपक्रमांची प्रभावी सांगड घालत महाराष्ट्र जलसुरक्षिततेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत आहे. नाला खोलीकरणाबरोबरच बांबू लागवडीसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा दृष्टिकोन केवळ पाणी साठविण्यापुरता मर्यादित नसून जलस्रोतांचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करणारा आहे. जलसंधारण दिनातून राज्यव्यापी लोकचळवळ महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा महत्वाचा भाग म्हणून आज २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६ — वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. “माती वाचवा , पाणी जपा , सुरक्षित भविष्य घडवा” हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे. सर्व जिल्ह्यांत ३ कि.मी. ‘वॉक फॉर वॉटर’ आणि सामूहिक मृद व जलसंधारण शपथ आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, युवक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना या उपक्रमातून जलसंधारणाच्या लोकचळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आहे. युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देत त्यांना या लोकचळवळीशी डिजिटल माध्यमातून जोडण्यासाठी ‘रील चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण कल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक थेंब जपूया, महाराष्ट्र जलसमृद्ध करूया जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शासन योजना आखू शकते, निधी उपलब्ध करून देऊ शकते, जलसंधारणाची कामे उभी करू शकते; पण त्या जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. शासनाचे दूरदृष्टीचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होत आहे. जलसंधारण दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव ठरू नये. तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील संकल्प बनला पाहिजे. घरातील पाणी असो, शेतातील पाणी असो किंवा गावातील जलस्रोत-प्रत्येक थेंब जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया— पाणी अडवूया… पाणी जिरवूया… माती वाचवूया… पाणी जपूया… आणि जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया! 0000