Monday, 2 April 2018

मुख्यमंत्र्यांकडून सामान्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय 1459 पैकी 1456 प्रकरणे निकाली


लोकशाही दिन
मुंबई, दि.2:दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात होणाऱ्या ऑनलाईन लोकशाही दिनात सामान्य नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेळोवेळी न्याय मिळवून दिला जातो.आज झालेल्या 106 व्या लोकशाही दिनात सोलापूर येथील गरीब शेतकऱ्याला ठिबक सिंचनाचे अनुदान देण्याचे निर्देश देतानाच पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती दोन महिन्यात करण्याचे सांगून सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आहे.
यावेळी जळगाव, भांड, सातारा, सोलापूर, पुणे, अंमळनेर येथील नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या. गेल्या तीन महिन्यात लोकशाही दिनात 21 अर्ज प्राप्त झाले असून त्या

पैकी 18 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. आतापर्यंत लोकशाही दिनात एकूण 1 हजार 459 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1 हजार 456 निकाली काढण्यात आले आहेत.
वेल्हे जिल्हा सातारा येथील मंगल पाटील यांच्या स्वमालकीच्या प्लॉटवर अन्य व्यक्तीची बोगस नावे लावल्याबाबत तक्रार केली होती. त्यावर 7 एप्रिल पर्यंत या प्लॉटवर मंगल पाटील यांचेच नाव लावण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले. टाकळी सिकंदर जिल्हा सोलापूर येथील झुंबर गायकवाड यांना ठिबक सिंचनाचे शासकीय अनुदान न मिळल्याबाबत तक्रार केली होती. या प्रकरणाची फेर चौकशी करून अर्जदाराला लाभ मिळवून देण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. कांताराम काळे, घोडेगाव जिल्हा पुणे यांनी सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याने विहिरीचे नुकसान झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांची कैफियत ऐकल्यानंतर या बंधाऱ्याची दोन महिन्यात दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बैठकीस सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
००००


No comments:

Post a Comment