Friday, 7 September 2018

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शैक्षणिक सामंजस्य करार - सहसंचालक गुलाबराव ठाकरे









*शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचा 20 कंपन्यांशी करार



         नागपूर,दि.07 विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शैक्षणिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव देणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षण विभागात प्रात्यक्षिक ज्ञानातून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विविध कंपन्यांशी करण्यात आलेले शैक्षणिक सामंजस्य करार फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन नागपूर तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी केले.
शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित मिले सूर मेरा तुम्हारा या कार्यक्रमात बोलत ते होते. यावेळी व्हीएनआयटीचे विश्वस्त व्ही. आर. जामदार, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे आणि प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात आदी उपस्थित होते.
शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाने विदर्भातील 20 विविध औद्योगिक संस्थाशी शैक्षणिक उपक्रमांचे सामंजस्य करार केले. भारतातील अभियंते जगात सर्वोत्तम आहेत. अशा सामंजस्य करारांमुळे तंत्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उद्योगसमुहाशी थेट संबंध साधता येतो. काळानुसार गुणवत्तेची संकल्पना बदलत आहे. अशा बदलत्या संकल्पनेची डोळसपणे दखल घेऊन शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाने स्वयंस्फुर्तीने हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. त्यातून शैक्षणिक ज्ञानाला उद्योगसमुहातील प्रात्यक्षिक ज्ञानाची जोड मिळेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, असे गुलाबराव ठाकरे म्हणाले.

शैक्षणिक उपक्रमात उद्योगसमुहांच्या प्रकल्प भेटींचे अहवाल तयार करणे, तज्ञांची व्याखाने यातून विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाला यातून उद्योगाभिमुखतेची जोड मिळेल. विद्यापीठ व तंत्रशिक्षण संस्था यांच्यात असे करार करण्याची गरज असून, समाजाला हवा असलेला उद्योगाभिमुख अभियंता अशा करारांमधूनच मिळेल, असेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले.
                उद्योगसमुहांची भूमिका, त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ, तंत्रशिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा मेळ घालून संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात यांचे कौतुक केले.  
यावेळी व्हीएनआयटीचे विश्वस्त विश्वास जामदार यांनी तंत्रशिक्षण महाविद्यालयाने 20 विविध औद्योगिक कंपन्यांशी केलेल्या सामंजस्य कराराचे स्वागत करुन अशा करारांची आज गरज असल्याचे सांगितले. अशा करारांच्या माध्यमातून भावी अभियंत्यांचे कौशल्य वृध्दींगत होईल. पुस्तकी ज्ञानाचे दिवस आता संपले असून, प्रात्यक्षिक अनुभव असलेल्या कुशल मनुष्यबळाला आज मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. देशात खूप मोठ्या कंपन्या असून, अशा कंपन्यांना आयआयटीच्या माध्यमातून कुशल अभियंते मिळत आहे. मात्र सर्वजण आयआयटीमधून शिक्षण घेऊ शकत नाही. आपण काळानुसार आव्हान स्विकारत आहोत. त्यामुळे आपल्या आर्थिक कुवतीवर मात करुन तंत्रशिक्षण महाविद्यालयांसारख्या संस्था विविध औद्योगिक कंपन्याशी असे सामंजस्य करार करत आहेत. या करारातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जातील. उद्योगभिमुख नोकरी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. त्यामुळे अशा सामंजस्य कराराचे स्वागत असून, शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयासाठी हा सुवर्णक्षण असल्याचे श्री. जामदार यांनी यावेळी सांगितले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे यांनी शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाने विविध 20 कंपन्यांशी केलेल्या सामंजस्य कराराचे स्वागत करुन हा अभिमानाचा क्षण आहे. अशा महाविद्यालयांतून घडणाऱ्या कुशल मनुष्यबळावर औद्योगिक कंपन्यांचा प्रशिक्षणासाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचेल, असे त्यांनी सांगितले.  एकाच वेळी 20 कंपन्यांशी केलेले करार हे खूप मोठे काम असल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना आणि कौशल्याला वाव मिळवून देण्यासाठी सहज व्यासपीठ मिळवून देणे ही खरोखरीचे मोठी बाब असल्याचे अतुल पांडे यांनी सांगितले. हा सामंजस्य करार करण्यासाठी श्रीमती डॉ. राजेश्वरी वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
                यावेळी महावितरणच्या दीपाली माडीलकर, लेडी इंटरप्रेन्युअर विंगच्या रीता लांजेवार, कायनेटीक गिअर्स, हिट ट्रिट वेलचे प्रफुल्ल जामदार पाटणकर कन्सलटंट प्रा.लि.चे पी.एस.पाटणकर, आर्टिफेक्ट प्रोजक्ट लिमिटेडचे नंदकुमार, लार्स ईनव्हिरो प्रा.लि.चे रमेश दर्यापूरकर, निओ इन्फ्रास्ट्रक्चरचे डॉ.रमेश मेघराजानी, पी.टी. मसे असोशिएट्सचे  डॉ. दिलीप मसे, सामाजिक वनीकरणचे राजन तलमले, ग्रीनलाईफ सोलूशन्सचे  अमित देवतळे, होलांटीस हेल्थ केअरचे अभय संतोषवार, संदिप ड्वेलर्सचे राहूल अग्रवाल, अल्ट्राटेक सिमेंटचे अवधेश उपाध्याय, सन इन्व्हिवो टेक्नालॉजीचे जगदिश लांजेवार, विस्बो टेकचे  अभिष डोकरस, एमसीइडीचे प्रदिप इंगळे, टेक्नोबेस आयटी सोलूशन्सचे वैभव देशपांडे, सिग्नेट टेक्नालॉजीचे चैतन्य घाटे आणि सोलर सोलूशनचे के.पी.धवड, यांच्याशी यावेळी शैक्षणिक उपक्रम सामंजस्य करार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनिया राऊत यांनी केले तर संचालन व आभार डॉ. राजेश्वरी वानखेडे यांनी मानले.  
*****


No comments:

Post a Comment