Saturday, 1 August 2020

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठविणार - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

 
* ण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी समारोहाची सांगता

        नागपूर, दि. 01 :  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी परिवर्तनाच्या लढाईसाठी आयुष्य वाहून घेतले. सामाजिक, सांस्कृत, राजकीय आणि साहित्य क्षेत्रातही त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. साहित्य निर्मिती, शाहिरी, लोकनाट्य अशा विविध माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले. कामगारांना चळवळीसाठी प्रेरणा दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या शाहिरीने प्राण फुंकले. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी अढळ स्थान निर्माण केले. अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न मिळवा असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येईल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.   
            दीक्षाभूमी परिसरात आयोजित अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्षाच्या सांगता समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते.       
            अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उपस्थितांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. छोटेखानी कार्यक्रमात बोलताना नाना पटोले म्हणाले की, अण्णाभाऊंनी बहजन समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले. आपल्या साहित्यातून समाज प्रबोधन केले. अण्णाभाऊंचे साहित्य आजही दिशादर्शक असून या साहित्याचा शासन मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करणार आहे. अण्णाभाऊंचे कार्य व साहित्य दीर्घकाळ स्मरणात रहावे म्हणून अण्णा भाऊंना भारतरत्न द्यावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येईल असे   श्री. पटोले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दीक्षाभूमी चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील जागा ट्रस्टला देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.  
            या जागेत अण्णाभाऊ साठेंच्या नावे भव्य ग्रंथालय उभारण्यात यावे असे ते म्हणाले. योगायोगाने समोरच दीक्षाभूमी असून दीक्षाभूमीला येणाऱ्या भाविक व पर्यटकांना अण्णा भाऊंचे साहित्य प्रेरणा देणारे ठरेल असा विश्वास श्री. पटोले यांनी व्यक्त केला.           
            प्रबोधन करणे, समाजात जाणीव जागृती घडवणे, समता प्रस्थापित करणे अशा हेतूने अण्णाभाऊंनी विपूल लेखन केले. त्यांच्या समग्र शाहिरीचा विचार करता अण्णाभाऊ समतावादी होते, साम्यवादी होते, आंबेडकरवादी होते. पण या सर्वांपेक्षा ते मानवतावादी होते, अशा शब्दात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव केला. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी लहूजी सेनेचे प्रमुख संजय कठाळे, पवन मोरे, विनायक इंगोले, बुध्दाजी सरकार, नरेश कांबळे, मनीष वानखेडे, प्रदीप बोरकर, अशोक भावे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment