Tuesday, 11 February 2025

'एआय’ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या 'स्टार्टअप्स'ना सर्वतोपरी सहकार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 



‘सायबर हॅक-2025’ या स्पर्धेचे बक्षीस वितरण

 नागपूर, दि. 9 : सायबर क्राईमचे जग वेगाने बदलत आहे. सायबर  गुन्हेगाराकडून एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सायबर युद्ध रोखायचे असल्यास तंत्रज्ञानानेच सक्षमपणे उत्तर देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत एआय क्षेत्रात स्टार्टअप निर्मितीची गरज आहे. एआय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात ‘सायबर हॅक-2025' या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट अमित दुबे आदी उपस्थित होते.

 देशभरात विविध प्रकारचे सायबर फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. येत्या काळात  विशेषतः सायबर क्राईमवर लक्ष द्यावे लागणार आहे. महाराष्ट्राने सायबर प्लॅटफॅार्म तयार केला आहे. केंद्र शासनानेही या प्लॅटफॅार्मचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

                                                                                                      

सायबर हॅक हा नागपूर शहर पोलिसांचा सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा यासंबंधीच्या आगामी आव्हानांवर उपाय शोधण्यासाठीचा एक आगळावेगळा उपक्रम होता. सायबर गुन्ह्यांशी संबंधित  समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा पाच विषयांवर 6 जानेवारी 2025 रोजी सुरु झाली. पहिल्या टप्प्यात (ऑनलाइन फेरी) आयोजित करण्यात आली. या पहिल्या फेरीत देशभरातून 600 संघांनी भाग घेतला आणि सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आपल्या समस्या सोडविण्याचे उपाय सादर केले. या 600 संघांमधून 20 संघांची अंतिम फेरीसाठी (ऑफलाइन फेरी) निवड करण्यात आली. अंतिम फेरी 7 आणि 8 जानेवारी 2025 दरम्यान आयआयएम नागपूर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील रामदेवबाबा महाविद्यालय (प्रथम), इन्फोसिस कॅार्पोरेट (द्वितीय) तर रायसोनी महाविद्यालय (तृतीय) या विजेत्या संघांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

0000



‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी 100 एकर जागा देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




* पर्यटनावर आधारित परिषदेचे आयोजन व्हावे

* खासदार औद्योगिक महोत्सवाचा समारोप

 

नागपूर,दि. 9 –विदर्भात विविध उद्योग समूह आकारास येत आहेत या उद्योग समूहांना आवश्यक असलेले तंत्र कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे भविष्यातील रोजगाराची ही संधी लक्षात घेता स्थानिक युवकांना विविध कौशल्य देणाऱ्या विद्यापीठाची आवश्यकता होती यासाठी साकारणाऱ्या विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी साठी शंभर एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या तीन दिवसीय समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल पटेल, आ. चित्रा वाघ, आ. चरणसिंग ठाकूर, आ. चैनसुख संचेती, माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, उद्योग सचिव पी. अनबलगन,  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मनोज सूर्यवंशी, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खासदार औद्योगिक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी एआयडीचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सामंजस्य करारातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली. आज विदर्भाच्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचे काम या महोत्सवात झाल्याचे ते म्हणाले. याशिवाय विदर्भाचा समग्र विकास हा उद्देश असून यासाठी नागपूर आणि अमरावती हे  मॅग्नेट क्षेत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. यामुळे नजीकच्या भागांचा विकास होईल. आगामी काळात पर्यटन आधारित परिषदेचे आयोजन व्हावे, असेही ते म्हणाले.

प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींची गुंतवणूक – नितीन गडकरी

अत्यंत यशस्वी अश्या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्ती मधून विविध प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात  जगात सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरु होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपूरच्या एमआरओमध्ये बोईंगचे काम सुरू असून नागपूर एव्हिएशन हब होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  

                                                                                                            

प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहील – पीयुष गोयल

विदर्भात नागपूर -बुटीबोरी दरम्यान स्कील युनिव्हर्सिटी तयार करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री श्री. गडकरींनी दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एआयडी अध्यक्ष आशीष काळे यांनी केले. आयोजन समिती अध्यक्ष अजय संचेती, खासदार प्रफुल पटेल यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रारंभी खासदार औद्योगिक महोत्सवावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. तत्पूर्वी विदर्भातील सुवर्णकार यांनी फडणवीस यांचा सत्कार केला महोत्सवाला सुमारे १ लाख २५ हजार नागरिकांनी भेट दिली.

सामंजस्य करार:

आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स इंटेलिजंट मटेरियल लिमिटेड हे नागपुरात इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर क्षेत्रात नागपुरात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य शासनाकडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला. श्रेम ग्रुप ऑफ कंपनीज बायोइंधन क्षेत्रात विदर्भात ८०० कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातुन १०० रोजगार निर्माण होणार आहे.  राज्य शासनाकडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला. ओलेक्ट्रा इव्हीचे चेयरमन के. व्ही. प्रदीप यांनी नागपुरातील आगामी गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. हा सामंजस्य करार दावोस मध्ये झाला होता.

 

****

   

 


कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा

                    -  उद्योग मंत्री उदय सामंत

 

नागपूर, दि. 9 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कार्यरत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मुलांनाही भविष्यात आपल्या उद्योगाची पायाभरणी करता आली पाहिजे. विविध उद्योग व्यवसायांना सकारून देण्याचे कसब अंगी असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना हे बाळकडू घरूनच असल्याने ते यात कमी पडणार नाहीत. यादृष्टीने विचार करून गुणवत्ताधारक पाल्यांना आयपॅड व इतर साहित्य देऊन प्रोत्साहन देण्याची भूमिका उद्योग विभागाने घेतली असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

नियोजन भवन येथील सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी कर्मचारी यांच्या आठवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या गुणवत्ताधारक पाल्यांना टॅब व शैक्षणिक आज्ञावलीच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. 

कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय जेव्हा विभाग प्रमुख म्हणून, या विभागाचे मंत्री म्हणून आम्ही घेतो तेव्हा नकळत या यशामागे या विभागातील कर्मचाऱ्यांचेही हात व मेहनत आहे, याची जाणीव उद्योग मंत्री म्हणून मी प्रत्येक वेळेस ठेवली आहे. या जाणिवेतूनच आपल्या आरोग्य विमाबाबत, आपल्याला लागणाऱ्या सेफ्टी साहित्य  याचबरोबर दुचाकी वाहनासाठी पूर्वी असलेली मर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडच्या वर्षात महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेऊन यासाठी लागणारी कामे अतिशय अल्प कालावधीत पूर्ण करून दाखवले. अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क साठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन हे केवळ 45 दिवसात आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी करून दाखवले याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नागपूर व अमरावती विभागातील 51 पाल्यांना टॅब देण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य राजेश झंजाड, अधीक्षक अभियंता सुनील अकुलवार, प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे व मान्यवर उपस्थित होते.

00000



                                          क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतून दैनंदिन ताणतणाव दूर होऊन सांघिक भावना वाढीस

                                                                    - अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे

 लेखा व कोषागारे विभागाच्या राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचा समारोप

 

नागपूर, दि. 9 : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत. अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांत सांघिक भावना निर्माण होते. स्पर्धाच्या आयोजनातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रशासकीय कामाचा तणाव दूर सारल्या जाऊन नवचैतन्याने लोकाभिमुख प्रशासन राबविण्यास सहाय्य होत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आज येथे केले.

लेखा व कोषागारे संचालनालय तसेच स्थानिक निधी लेखापरीक्षा कर्मचारी कल्याण समिती यांच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या मैदानावर करण्यात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते. समारोपप्रसंगी लेखा व कोषागार संचालक दिपाली देशपांडे, स्थानिक निधी लेखा परीक्षा मुंबईचे संचालक निलेश राजुरकर, संचालक वनामती सुवर्णा पांडे, नागपूर येथील लेखा व कोषागार विभागाच्या सहसंचालक ज्योती भोंडे,  स्थानिक निधी लेखापरीक्षा नागपूर येथील सहसंचालक गौरी ठाकूर, यांच्यासह लेखा व कोषागार विभागाचे राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे. सर्वांनी विविध माध्यमातून आपले छंद पूर्ण करावे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. त्यासोबत मनालादेखील निरोगी करण्यामध्ये खेळाची खूप मोठी भूमिका असते. सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून सहभागाचे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यभरातील लेखा व कोषागारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

स्पर्धानिहाय विजेते

 राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या कलावंत व खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी पारितोषिक देण्यात आले. त्यामध्ये सांस्कृतिक स्पर्धेत गायन क्षेत्रात सहभाग घेणाऱ्या महिला (एकल) श्रृती वेपेकर ह्या विजेता तर पुनम कदम ह्या उपविजेता ठरल्या. तसेच पुरूष (एकल) सुमेध खानवीस हे विजेता तर सतीश पारधी उपविजेता ठरले. युगल गायनामध्ये सुमेध कांबळे व संध्या ढोणे ही जोडी विजेता आणि अर्चना पुरणिक व अंकूश नलावडे ही जोडी उपविजेता ठरली. समुह नृत्यमध्ये कोकण विभाग विजेता तर अमरावती विभाग उपविजेता ठरला. सुत्रसंचालनामध्ये स्वरांजली पिंगळे व अक्षय कडळक ही जोडी विजेता तर अश्विनी कुलकर्णी व अनय संघरक्षित ही जोडी उपविजेता ठरली. कार्यक्रमाच्या दिग्दर्शनासाठी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई या विभागाला विजेता घोषित करण्यात आले तर कोकण भवन हा उपविजेता ठरला. रांगोळी स्पर्धा एकलमध्ये यामिनी खरड या विजेता ठरल्या तर नम्रता चव्हाण ह्या उपविजेता ठरल्या. युगलमध्ये अरविंद जाधव, सीमा सावंत,  नितिश कदम,  सुषमा देशमुख, प्रिया सुर्याजी हे विजेता तर भाग्यश्री बरांगे, वैशाली गंगावणे, रेखा मोहीते, संध्या हाते, स्वाती तारे हे उपविजेता ठरले.

                                                                                                                                                .2.

 

.2.

 क्रीडा स्पर्धांमध्ये संदिप बाबर हे 200 मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम तर निलेश जाधव यांना द्वितीय व शिवाजी पांढरे यांना तृतीय पारितोषीक मिळाले. महिलांमध्ये कलावती गिऱ्हे यांनी प्रथम पारितोषीक पटकावले तसेच  विश्रांती पाटील या द्वितीय व दिपाली थोरात या तृतीया स्थानी राहील्या. लांब उडी पुरुषांमध्ये अर्जुन सिरसाट हे प्रथम तर राहुल भोयर यांनी द्वितीय व संकेत दिवटे यांनी तृतीय स्थान पटकावले. महिलांमध्ये विश्रांती पाटील (प्रथम), दिपाली थोरात (द्वितीय) व  प्रियंका हरड (तृतीय). थाळीफेक मध्ये महिला  रिंकल माळवी (प्रथम), नयना सोलव (द्वितीय) व  प्राजक्ता वाकोडे (तृतीय). पुरुषांमध्ये  प्रविण बोरकर (प्रथम), विनोद काळे (द्वितीय), पलाश कोहळे (तृतीय). गोळाफेक मध्ये महिला सोनू राठोड (प्रथम),  कल्पिता शेंडी (द्वितीय), रूपाली भोसले (तृतीय). पुरुषांमध्ये अनिल राऊत (प्रथम), निलेश लाड (द्वितीय), विनोद काळे (तृतीय). पाच कि.मी चालणे यास्पर्धेत पुरुषांमध्ये  मंदार जोशी (प्रथम), संदिप अहिरे (द्वितीय),  बळीराम पाटील (तृतीय). तीन कि.मी चालणे या स्पर्धेत महिलांमध्ये वर्षा मानकर (प्रथम),  शिल्पा सहारे (द्वितीय), राजश्री मेहेर (तृतीय). 50 मी. पोहणे (फ्री स्टाईल) यामध्ये जयदेव देशपांडे (प्रथम), संतोश पाटील (द्वितीय), अरविंद वाघमोडे (तृतीय). 100 मी पोहणे (फ्री स्टाईल) यामध्ये. जयदेव देशपांडे (प्रथम), अमोल कवडे (द्वितीय), संतोष पाटील (तृतीय). कॅरम या स्पर्धेत महिलांमध्ये भाग्यश्री देशपांडे (विजेता) व पूजा होतकर (उपविजेता) ठरल्या. याच स्पर्धेत महिला युगलसाठी  वैशाली सोनवाने व कविता देशपांडे (विजेता),  श्रीमती मनस्वी काळे व श्रीमती क्षितीजा काळे (उपविजेता) ठरल्या. याच स्पर्धेत पुरूषांमध्ये श्री शैलेंद्र भोसले विजेता तर श्री हुकुमचंद बोरूडे उपविजेता ठरले. युगल पुरूषांमध्ये श्री प्रविण पवार व श्री संदिप सावंत हे विजेता तर श्री रोहित मस्के व प्रशांत मते हे उपविजेता ठरले. टेबल टेनिस या स्पर्धेत महिलांमध्ये (सिंगल) श्रीमती चैताली जाधव विजेता तर श्रीमती दिप्ती देशमुख उपविजेता ठरल्या. युगल महिलांमध्ये श्रीमती दिप्ती देशमुख व श्रीमती संध्या मनवर विजेता तर श्रीमती चैताली जाधव व श्रीमती योगिता पवार उपविजेता ठरल्या. याच स्पर्धेत पुरूषांमध्ये (सिंगल) श्री प्रितम रामटेक विजेता तर श्री शेखर सुतार उपविजेता ठरले तसेच युगल पुरूषांमध्ये श्री प्रितम रामटेक व प्रशांत सावंत विजेता आणि श्री निलेश बारकुर व श्री सर्फराज हे दोघे उपविजेता ठरले. बॅटमिंटन स्पर्धेत महिला (सिंगल) मध्ये श्रीमती दिशा ताकतोडे ह्या विजेता ठरल्या तर श्रीमती ज्योती गायकवाड ह्या उपविजेता राहिल्या. युगल महिलांमध्ये श्रीमती दिशा ताकतोडे व श्रीमती सुलोचना चव्हाण या दोघी विजेता तर श्रीमती स्वराली पिंगळे व श्रीमती ज्योती गायकवाड उपविजेता ठरल्या. याच स्पर्धेत पुरुषांमध्ये मयंत केळकर विजेता तर संतोष चाळके उपविजेता ठरले तसेच युगल पुरूषांमध्ये मयंक केळकर, योगेश कुमावत ही जोडी विजेता तर मंगेश चहारे व साधनकर ही जोडी उपविजेता ठरली. बुध्दिबळ या स्पर्धेत मंदार पाटील हे विजेता तर किशोर माढास हे उपविजेता ठरले. थ्रो बॉलमध्ये  महिला शिल्पा वाकडे उत्कृष्ट खेळाडू तर नागपूर विभाग विजेता संघ ठरला तसेच पुणे विभाग उपविजेता संघ ठरला. शुटींग बॉलमध्ये आबासाहेब घायाळ हे उत्कृष्ट खेळाडू, छत्रपती संभाजी नगर हा संघ विजेता तसेच कोकण विभाग उपविजेता ठरला. खोखो खेळामध्ये संघमित्रा कांबळे हा खेळाडू उत्कृष्ठ ठरला. तर अधिदान व लेखा कार्यालय विजेता ठरले तसेच पुणे विभाग उपविजेता ठरला. क्रिकेट स्पर्धेत कोकण विभाग विजेता ठरला.

0000

               ‘एआय’ क्षेत्रात स्टार्टअप निर्मितीची गरज

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘सायबर हॅक-2025’ या स्पर्धेचे बक्षीस वितरण

 

नागपूर, दि. 9 : सायबर क्राईमचे जग वेगाने बदलत आहे. सायबर  गुन्हेगार एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सायबर युद्ध रोखायचे असल्यास तंत्रज्ञानानेच उत्तर देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत एआय क्षेत्रात स्टार्टअप निर्मितीची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात ‘सायबर हॅक-2025 या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट अमित दुबे आदी उपस्थित होते.

 

            सायबरहॅक हा नागपूर शहर पोलिसांचा सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा यासंबंधीच्या आगामी आव्हानांवर उपाय शोधण्यासाठीचा एक आगळावेगळा उपक्रम होता. सायबर गुन्ह्यांशी संबंधित  समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा पाच विषयांवर ६ जानेवारी २०२५ रोजी सुरु झाली. पहिल्या टप्प्यात (ऑनलाइन फेरी) आयोजित करण्यात आली. या पहिल्या फेरीत देशभरातून ६०० संघांनी भाग घेतला आणि सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आपल्या समस्या सोडविण्याचे उपाय सादर केले. या ६०० संघांमधून २० संघांची अंतिम फेरीसाठी (ऑफलाइन फेरी) निवड करण्यात आली. अंतिम फेरी ७ आणि ८ जानेवारी २०२५ दरम्यान आयआयएम नागपूर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या रामदेवबाबा महाविद्यालय (प्रथम), इन्फोसिस कॅार्पोरेट (द्वितीय) तर रायसोनी महाविद्यालय (तृतीय) या विजेत्या संघांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

देशभरात विविध प्रकारचे सायबर फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. येत्या काळात स्ट्रीट क्राईम कमी होऊन विशेषतः सायबर क्राईवर लक्ष द्यावे लागणार आहे. महाराष्ट्राने सायबर प्लॅटफॅार्म तयार केला आहे. केंद्र शासनानेही या प्लॅटफॅार्मचे कौतुक केले. महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

******

 

 

                                   नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाईन द्या

- पालक सचिव असिम गुप्ता

 

शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत विविध विभागांचा घेतला आढावा

 

नागपूर, दि.08 : विविध विभागांसाठी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कृती कार्यक्रमाची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यासाठी शासनाच्या सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवित यातील अधिकाधिक सेवा या विहित कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन करण्याचे निर्देश नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव असिम गुप्ता यांनी आज दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॅा. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अजय चारठाणकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

100 दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण नागरिकस्नेही करणे, गुंतवणुकीस प्रोत्साहन, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निराकरण करणे आवश्यक आहे. अधिका-यांनी कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याची गरज आहे. शासनाच्या मैत्री पोर्टलवर नागपूर जिल्ह्याचे उद्योग विभागाचे प्रलंबित प्रस्ताव, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे केंद्रीकृत पोर्टल, माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात येणा-या सर्व विभागांच्या सेवा संकेतस्थळावर टाकणे, कार्यालये विशेषतः प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.

 

जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ, स्वच्छता व अभिलेख, ई नझुल अर्ज, पाणंद रस्ते मोजणी, दाखल्यांसाठी विशेष शिबिरे, पारधी समाजातील बांधवांना गृहचौकशीच्या आधारावर जातीच्या दाखल्यांचे वितरण, फेरफार निर्गती, क्षेत्र भेटी या विषयांची माहिती देत सादरीकरण केले.

 

मनपा आयुक्त डॅा. अभिजित चौधरी यांनी शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेने केलेल्या कार्यवाहीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यात महानगरपालिकेचे संकेतस्थळ, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोईसुविधा या विषयांचे सादरीकरण केले.

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी जिल्हा परिषदेतील विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली तसेच शंभर दिवसाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने माहिती दिली. यात ग्रामीण भागातील घर कर आणि पाणी कर वसुली शिबिरांचे आयोजन, दवाखाना आपल्या दारी अंतर्गत पारधी समाजासाठी आरोग्य तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिबिरे, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या विषयांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

00000

 

Friday, 7 February 2025

अ‍ॅडव्हांटेज विदर्भ महोत्सवामुळे विदर्भ क्षेत्र उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 





 

Ø  ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025- खासदार औद्योगिक महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

 

Ø  मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भ विकासाला गती - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

नागपूर, दि. 7 : गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग पुरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत आहे. पर्यटन, उद्योग व दळण-वळण अशा एकानेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ हे महत्वपूर्ण आयोजन येत्या काळात विदर्भातील उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उद्योग, रोजगार निर्मिती आदींच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला गती मिळाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025-खासदार औद्योगिक महोत्सवा’ चे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पुणे ही राज्यात निर्मिती क्षेत्राची राजधानी म्हणून आकाराला येत आहे. राज्यातील अन्य भागातही उद्योग वाढीस लागत आहेत. नुकत्याच दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. राज्याच्या सर्वच भागात उद्योग वाढीसाठी गुंतवणूक आणण्यात आली आहे. यात विदर्भासाठी 5 लाख कोटींच्या करारांचा समावेश असून गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यु उद्योग समुहाने 3 लाख कोटींची गुंतवणूक करार केले आहेत. गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे बॅटरी निर्माण, सौरऊर्जा आदी प्रकल्प उभे राहणार आहेत. हे सर्व सामंजस्य करार प्रत्यक्षात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

     

गडचिरोलीत गुंतवणूक होत असल्याने नक्षलप्रभावीत जिल्हा म्हणून ओळख पुसून आशिया खंडातील सर्वात मोठे स्टिलहब येथे उभारले जाणार आहे. लगतच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही गडचिरोलीतील गुंतवणुकीचा फायदा होणार आहे.  गडचिरोलीत येत्या काळात विमानतळ उभारण्यात येणार आहे.  अमरावती येथील टेक्सटाइल झोनमध्ये लवकरच उद्योजकांनी जागा व्यापली आहे व आता तिथे अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार आहोत.  पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून येथे वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक सक्षम करण्यात येईल. विदर्भात होणारे कपाशीचे उत्पादन व कपाशीचा आयुध निर्माण क्षेत्रात होणारा उपयोग लक्षात घेता या भागात उद्योग उभारण्यासंदर्भात पुरक वातावरण निर्माण करण्यात येईल. अमरावती येथे आशिया खंडातील सर्वात मोठे  विमानचालक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येवून यातून दरवर्षी 25 हजार विमानचालक प्रशिक्षीत करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यात ड्रायपोर्ट निर्मितीसोबतच इलेक्ट्रॉनिक बस हब निर्माण करण्यात येईल, येत्या 4 वर्षात चंद्रपूर येथे कोल गॅसिफीकेशन व्यवस्था निर्माण करण्यात येईल, नाशिकहून थेट वाढवन बंदरावर माल पोचविण्याचे नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. विदर्भातून काकिनाडा पर्यंत दळण-वळणाची संपर्क व्यवस्था आंध्रप्रदेश व तेलंगन राज्यांच्या सहकार्याने करण्याचे नियोजन सुरू आहे. दुबई विमानतळ हबच्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळ हब करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यास समांतर व्यवस्था नागपूर विमानतळावर निर्माण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

                                                                                                                                                             

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, राज्याच्या एकूण खनिज संपत्तीच्या 75 टक्के खनिज विदर्भात आहे. एकूण वनक्षेत्राच्या 80 टक्के वन विदर्भात आहे. ही जमेची बाब असून येथे पर्यटन व उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर व्हावे यासाठी दोन दशकांपासून कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेत या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले. येथे उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक ओढून आणत येथील नक्षलवाद, गरिबी, बेरोजगारी दूर करण्याच्या दिशेने कामाला सुरूवात झाली आहे. ॲडव्हांटेज विदर्भच्या आयोजनातून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग वाढीसाठी पुरक वातावरण निर्माण करण्याचे उद्दीष्ट असून येत्या 4 वर्षात यास गती देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, दावोसमध्ये राज्यातील समतोल औद्योगिक विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आले. राज्य शासन उद्योगपुरक सोयी सुविधा व वातावरण निर्माण करीत आहे. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. यास अधिक गती देवून भविष्यात हा आलेख वाढविण्यात येईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या स्थानी घेवून जाण्याच्या उद्दीष्टपुर्तीसाठी महाराष्ट्र महत्वाचे योगदान देईल यासाठी ॲडव्हांटेज विदर्भ सारखे आयोजन महत्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यभर असे आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.    

 

जे.एस.डब्ल्यू उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल म्हणाले, गडचिरोलीसह विदर्भात 3 लाख कोटींची गुंतवणूक होत आहे. याचा फायदा स्थानिकांना होवून विदर्भ जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल. एचसीएल कंपनीच्या प्रमुख रोषणी मल्होत्रा म्हणाल्या, नागपूरातील मिहानमध्ये 2018 पासून एचसीएल कार्यरत असून 5 हजार 500 बेरोजगारांना रोजगार देण्यात आला आहे.  यात 40 टक्के महिलांचा समावेश आहे. लॉईड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्णन प्रभाकरण यांनी गडचिरोली जिल्ह्यात आम्ही दोन वर्षात 10 हजार रोजगार निर्माण करणार असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्हांटेज विदर्भ महोत्सवाचे संयोजक तथा असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी केले.

 

या औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहु-क्षेत्रीय उद्योगांचे 320 हून अधिक दालन उभारण्यात आली आहेत. यात सार्वजनिक उपक्रम, स्टील आणि खाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सेबी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, जीएसटी विभाग, पोस्ट विभाग, इत्यादिंचे दालनही आहेत. येत्या 9 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत  हा महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे.

00000


Thursday, 6 February 2025

नागपूर विभागात ग्रामीण भागातील घरकुलांचे उद्दिष्ट गतीने पूर्ण करा -ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

 




नागपूर विभागात ग्रामीण भागातील घरकुलांचे उद्दिष्ट गतीने पूर्ण करा

     -ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

Ø  विभागाला देण्यात आलेले 100 दिवसांचे उद्दिष्ट विना तडजोड पूर्ण करा

Ø  नागपूर विभागाचा घेतला आढावा

 

नागपूर, दि. 6 : विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून द्या, या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी शासनास कळवून सोडवून घ्या, नियोजन करा व ग्रामीण भागातील घरकुलांचे उद्दिष्ट गतीने पूर्ण करा, अशा सूचना आज ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण विकास विभागाला दिलेले 100 दिवसांचे उद्दिष्ट विना तडजोड पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

        विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे,  विभागातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री विनायक महामुनी (नागपूर),समीर कुर्तकोटी (भंडारा), मुरुगानंथम एम. (गोंदिया), विवेक जॉनसन (चंद्रपूर), जितीन रहमान (वर्धा), सुहास गाडे (गडचिरोली) यांच्या सह विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विकास आस्थापना शाखेचे उपायुक्त विवेक इलमे आदी उपस्थित होते.

 

मंत्री श्री. गोरे यांनी प्रधानमंत्री आवास योजनासह (ग्रामीण-टप्पा 1 व 2) राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व मोदी आवास योजनांमध्ये विभागातील उद्दिष्ट, पूर्ण झालेली कामे व अडचणीच्या कामांची माहिती घेतली. मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेली मजुरी लाभार्थ्यांना कटाक्षाने देण्याबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना विविध मार्गांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध काम करा व तांत्रिक अडचणी  शासनाकडून सोडवून घेण्याच्या व लाभार्थ्यांना वेळेत लाभाचे हप्ते देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यांना लखपतीदीदी बनविण्याचे राज्याने ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने गतीने कामे करा, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गुणात्मक शिक्षण देत येथील परिसर स्वच्छ व नेटका ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यात उमेद मॉल उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगत वर्षभरात 15 मॉल उभारण्यात येईल व दोन वर्षात सर्व जिल्ह्यांमध्ये मॉल उभारण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

मुख्यमंत्री यांनी विविध विभागांना 100 दिवसांचे उद्दिष्ट दिले असून ग्रामविकास व पंचायतराज विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट कुठलीही तडजोड न करता पूर्ण करा. या कालावधीत जास्तीत-जास्त प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास विभागाच्या योजना व आस्थापना शाखांद्वारे  विभागातील कामकाजाबाबत सादरीकरण करण्यात आले व जिल्हा परिषदेकडील विविध योजना, अभियाने, प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विभागातील अपील प्रकरणे तसेच 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्हा परिषदांकडून सादरीकरण करण्यात आले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांचाही आढावा घेण्यात आला.

 

बैठकीपूर्वी, नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वनहक्क पट्टयांचे प्रातिनिधिक 10 लाभार्थ्यांना यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेश मासोदकर यांनी तर विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी आभार मानले.

 

00000

Monday, 3 February 2025

  



 विभागासाठी 1 हजार 763 कोटीचा

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण आराखडा सादर

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक

 

नागपूर, दि. 3 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक उमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) सन 2025-26 साठी शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत नागपूर विभागाचा 1 हजार 763 कोटी 70 लक्ष रूपयांचा आराखडा सादर करण्यात आला.

याबैठकीस उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्हानिहाय सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचा दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील विविध विकास योजनावरही याबैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी पालकमंत्र्यांसह वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार, आमदार जिल्ह्यांचे पालकसचिव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अतिरीक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त नियोजन अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागातील जिल्ह्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या प्रारूप आरखड्यास जिल्हा नियोजन समितीची शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत मान्यता घेतली आहे. यानुसार नागपूर जिल्ह्यासाठी 509.6 कोटी, वर्धा 207.22 कोटी, भंडारा 173.27 कोटी, गोंदिया 198.51 कोटी, चंद्रपूर 340.88 कोटी तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 334.76 कोटी रूपयांच्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक आराखडा सादर करण्यात आला आहे.

नागपूर विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीचा बैठकीस नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईक, गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर (नागपूर), वान्मती शी (वर्धा), संजय कोलते (भंडारा), प्रदिप नायर (गोंदिया), अविशांत पंडा (गडचिरोली) आणि विनय गौडा (चंद्रपूर) आदी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

*****

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




 

Ø  विकसित भारताच्या घोडदौडीत  महाराष्ट्रही अग्रेसर राहील

Ø  अमृतकाळ विकसित भारत-२०४७ परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

नागपूर, दि. 1 : गरीब, युवक, शेतकरी, महिला या चार घटकांना समर्पित आणि शेती विकास आणि उत्पादकता,ग्रामीण समृद्धी आणि शाश्वतता, रोजगार आधारित विकास, मनुष्यबळ तयार करणे, नाविन्यपूर्ण गुंतवणूक, ऊर्जेची उपलब्धता आदी १० क्षेत्रांना व्यापत अमृतकाळात भारताला सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम तयार करणारा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. राज्यांसाठीही यात महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून याचा लाभ घेत महाराष्ट्रही विकासित भारत देशाच्या घोड दौडीत अग्रेसर होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

 

     मनी बी इन्स्टिट्यूटच्यावतीने येथील लक्ष्मीनगर परिसरातील सायंटिफिक सोसायटीच्या लॉनवर आयोजित 'अमृतकाळ विकसित भारत -२०४७  परिषदे' चे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. संसदेत आज सादर झालेल्या वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करतांना ते बोलत होते. केडिया सिक्युरिटीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विजय केडिया आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवसाय विकास व्यवस्थापक श्रीराम कृष्णन आणि मनी बी संस्थेच्या संचालक शिवानी दाणी- वखरे यावेळी उपस्थित होत्या.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिने बियाणे, सिंचनाच्या सोयी, वीजेची उपलब्धता आदी एकात्मिक कार्यक्रम देशातील १०० जिल्ह्यांमध्ये राबविण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून याद्वारे १ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. डाळी, तेलबियांचे उत्पादन वाढवून देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सहा वर्षांचा विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. देशातील कापसाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिने येत्या पाच वर्षासाठी कापूस मिशन हाती घेण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील कपाशी पिकाखालील ५० लाख हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येणाऱ्या कपाशी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी याचा लाभ होईल. किसान केड्रीट कार्डची मर्यादा ३ लाखांवरुन ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणे आदी महत्वाच्या तरतूदी अर्थसंकल्पात असल्याचे त्यांनी सांगितले.

सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्राचा भारताच्या  एकूण उत्पादन क्षेत्रात ३६ टक्के वाटा आहे. यावर लक्ष केंद्रीत करुन अर्थसंकल्पात या क्षेत्रात उत्पादन वाढ व रोजगार निर्मीतीसाठी १.५लाख कोटींच्या योजना आणल्या आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) विद्यार्थी क्षमता वाढविण्यासह वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात (एमबीबीएस) १० हजार जागा वाढविण्यात येणार आहे. देशात सरकारी रुग्णालयांमध्ये २०० कर्करोग केंद्र स्थापीत करण्यात येणार आहे. भगवान गौतम बुद्धांशी संबंधीत स्थळांच्या विकासासह देशात ५० आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्यांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.

    मध्यम वर्गाला केंद्र स्थानी ठेवून देशाच्या अर्थसंकल्पाच्या इतिहासात प्रथमच आयकर मर्यादा १२ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे मध्यम वर्गीयांची क्रयशक्ती वाढेल व त्याने रोजगार निर्मिती, उत्पादनालाही चालना‍ मिळेल. देशातील आयकर व्यवस्था अधिक सुटसुटित करण्यासाठी नवीन आयकर कायदा आणण्याची घोषणाही आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. यातून देशात सकारात्मक परिवर्तन घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

            मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्मीतीसाठीही अर्थसंकल्पात तरतूदी करण्यात आल्या आहेत. राज्यांना ५० वर्षांसाठी १.५ लाख कोटी बिनव्याजी कर्ज देण्याची महत्वपूर्ण बाब या अर्थसंकल्पात आहे. पीपीपीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देण्याची बाबही अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे.  राज्यांच्या विकासासाठी मोठ्या तरतूदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या असून मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, एमयुटिपी, एमएमआर करिता एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा आदी प्रथमदर्शनी महाराष्ट्रासाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद दिसून येते. या सर्व संधींचा उपयोग करुन विकसित भारताच्या घोडदौडीत महाराष्ट्र महत्वाचे योगदान देत अग्रेसर होईल असेही त्यांनी सांगितले.

 

   प्रास्ताविक शिवानी दाणी-अखरे यांनी केले तर विजय केडिया आणि श्रीराम कृष्णन यांनीही अर्थसंकल्पाबाबत आपली मत मांडली.

     

0000