मुंबई, दि.4: आजच्या काळात इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज आहे. पण मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेतले तर
ज्ञानात अधिक भर पडते. कृतीयुक्त, उपयोजनात्मक (अॅप्लिकेशन बेस)
असा दहावीचा नवीन अभ्यासक्रम असेल, त्याचा फायदा दहावीच्या
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी निश्चित होईल, असे
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
शिवाजी मंदिर येथे आज इयत्ता दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासंबंधी चर्चासत्र
आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी श्री.तावडे यांनी यावर्षीपासून बदलण्यात आलेल्या दहावीच्या अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी
बालभारतीचे संचालक सुनील मगर यांच्यासह भाषातज्ज्ञ उपस्थित होते.
बालभारतीचा अभ्यासक्रम शिकत असलेले विदयार्थी
सीबीएससी आणि आयसीएससीच्या विदयार्थ्यांना टक्कर देऊ शकतील याची खात्री वाटते.या
पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येक पाठाला क्यूआर कोड देण्यात आला असून डिजिटल
अभ्यासक्रमाकडे ही कुच आहे असे म्हणता येईल. क्यूआर कोडच्या सहाय्याने सर्व गाव खेड्यातील
विद्यार्थीही इंटरनेटमुळे जोडले जाणार आहेत. नवीन
अभ्यासक्रमामध्ये अध्ययन निश्चिती (Learning outcome)याचाही समावेश आहे.
श्री.
तावडे यावेळी म्हणाले, पूर्वी दहावीच्या निकालांमध्ये पास किंवा नापास असे असायचे
पण आता नापास असा शिक्का गुणपत्रिकेवर नसतो. उत्तीर्ण आणि कौशल्य सेतू असे यामध्ये
नमूद असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे
सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. अशा प्रकारे राज्यातील सर्व समाजातील विदयार्थ्यांना
गुणात्मक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आणि हे करताना यामध्ये गुणात्मक बदल
करणे गरजेचे आहे.स्वविकास आणि संरक्षणशास्त्र या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थी खूप काही शिकतील असा विश्वास वाटतो.
गेल्या वर्षापासून सुरु असलेली इयत्ता सातवी ते दहावीच्या वर्गांसाठी
अभ्यासक्रमाच्या बदलाची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. इयत्ता सातवी, आठवी,
नववी आणि दहावीच्या वर्गांसाठीच्या अभ्यासक्रमात बदल
करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमात शब्दसंपत्तीचा विकास, नवीन
तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण,
निर्णयक्षमता, जबाबदार नागरिकत्वाचे भान, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आल्याचेही श्री. तावडे यांनी
यावेळी सांगितले.
यंदाच्या 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यामुळे
नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्याची नवीन पुस्तके उपलब्ध होणार आहेत. सुधारित बदलाच्या
अभ्यासक्रमानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमाची
पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या हातात
नव्या अभ्यासक्रमाची नवी पुस्तके येणार आहेत. याआधी इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम 2013-14 या शैक्षणिक वर्षात बदलण्यात आला
होता पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सातवी ते
दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता सातवी, आठवी,
नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी अभ्यासक्रमाचे नवीन आराखडे, त्यांची उद्दिष्टे आणि अभ्यासक्रम बदल अशी विविध माहिती बालभारतीच्या
संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मराठी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र
या प्रमुख विषयांसह द्वितीय आणि तृतीय भाषा विषयांच्या अभ्यासक्रमाचे आराखडेही
बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य पाठ्युपस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ (बालभारती) निर्मित इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री श्री. तावडे यांच्या प्रमुख
उपस्थितीत आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध
झाली आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने
अभ्यासमंडळातील विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या दहावीच्या
सर्व माध्यमांच्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन आज दादर येथील शिवाजी मंदिरात झालेल्या
कार्यक्रमात झाले. याप्रसंगी अभ्यासक्रमाच्या अभ्यासमंडळाचे विषय तज्ज्ञ यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याचर्चासत्रात
विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभ्यासमंडळाच्या सर्व विषय
तज्ञांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे तसेच बालभारतीने वेळेचे नियोजन करित दहावीच्या सर्व माध्यमांची नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेत
बाजारात उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री.तावडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
००००
No comments:
Post a Comment