मुंबई, दि. 30 : विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या आश्रमशाळा सुव्यवस्थित चालल्या पाहिजेत ही शासनाची भूमिका असून आश्रमशाळांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज येथे दिली.
राज्यातील आश्रमशाळांच्या प्रतिनिधींच्या समस्यांबाबत श्री. येरावार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस आमदार हरिभाऊ राठोड, आमदार तुषार राठोड, विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता यांच्यासह आश्रमशाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आश्रमशाळांच्या व्यवस्थापनासाठी लागू केलेल्या आश्रमशाळा संहितेतील तरतुदी केंद्र शासनाच्या शिक्षण हक्क कायद्याशी सुसंगत करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल. आश्रमशाळातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शासनाकडून संस्थांना सहकार्य करण्यात येईल, असे श्री. येरावार यावेळी म्हणाले.
आश्रमशाळांना संच मान्यता, पदांना वैयक्तिक मान्यता, विद्यार्थी संख्येचे निकष, कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, कर्मचारी व संस्था यांच्यासाठी तक्रार निवारण पद्धती, शालेय प्रशासन, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य, वसतिगृह व्यवस्थापन, सुरक्षेच्या उपाययोजना आदींबाबत या बैठकीत चर्चा झाली.
0000
No comments:
Post a Comment