Tuesday, 1 October 2024
हरित महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मनरेगाची कामे प्राधान्याने पूर्ण करा -मिशन महासंचालक नंदकुमार वर्मा
नागपूर विभागाचा घेतला आढावा
नागपूर, दि.1 : हरित महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) प्रभावी अंमलबजावणीद्वारे नागपूर विभागात सिंचित बांबू, फळझाडे व इतर झाडे, फूलपीके, तूती आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीसह कुरण विकास आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश, महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी आज संबंधीत यंत्रणांना दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘हरित महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृद्धीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविण्याबाबत’ श्री. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मनरेगा आयुक्त अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पर्यावरण व वातावरणीय बदल सेलचे संचालक अभिजीत घोरपडे, रोहयोच्या उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांच्यासह नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील वने व पर्यावरण, आदिवासी विकास , महसूल, जलसंधारण, पाटबंधारे, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मनरेगा अंतर्गत कामे गुणवत्तापूर्ण व अधिक उत्पादक होण्यासाठी टिकाऊ व उत्पादक मत्ता तयार करुन बांबू तसेच इतर हरित आच्छादित पीक सिंचीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चांगले उत्पादन देणाऱ्या पिकांचे अभिरक्षण करत अशा लागवडीतून शाश्वत व पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी हरित महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करुन अल्प व अत्यल्प भुधारक कुटुंबास लाभ देण्यात येत असल्याने हा कार्यक्रम समता वाढीस पूरक ठरणार असल्याचे यावेळी श्री. वर्मा यांनी सांगितले.
वैयक्तिक जमीन हरित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता टप्प्या-टप्प्याने हरित आच्छादन तयार करण्याबाबत तसेच दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा, वातावरणीय बदलाचा सामना करणे आणि जैवविविधतेचे जतन करण्याचे उद्दिष्ट साध्य करुन हरित महाराष्ट्र कार्यक्रमाद्वारे शाश्वत विकास करण्याबाबत शासनाच्या धोरणाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
मनरेगांतर्गत राज्यात चालू आर्थिक वर्षात १.१४ लाख हेक्टर बांबू लागवडीच्या उद्दिष्टासह येत्या ५ वर्षात एकूण ११ लाख हेक्टर जमीनीवर बांबू लागवड करण्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच नागपूर विभागात चालू आर्थिक वर्षात ठेवण्यात आलेल्या ३५ हजार १०० हेक्टरवरील बांबू लागवडीचा जिल्हा निहाय आढावा यावेळी घेण्यात आला. उद्दिष्टपूर्तीसाठी कामांना गती देण्याच्या सुचनांसह अवलंबायच्या विविध कार्यपद्धतींबाबत, शासन निर्णयांबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीत अभिजीत घोरपडे यांनी हवामान बदलाच्या जागतिक स्तरावरील आवाहनाविषयी मार्गदर्शन करतांना जागतिक स्तरावरील घटना, भारतात व महाराष्ट्रात घडलेल्या घटनांचे दाखले दिले.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment