नागपूर दि. 29 :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला प्रबोधन करणारे आहे. त्यांच्या शिकवणीचा वसा अनुयायांनी अंगीकारावा. त्यांनी देशाला संविधानाच्या स्वरुपात अमूल्य देणगी दिली आहे. त्यायोगे मिळालेल्या धर्म स्वातंत्र्याचा अभिमान बाळगा. परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मापेक्षा देश मोठा मानला. या तत्त्वाला धरुन आपणही धर्मा पेक्षा देशाला प्राधान्य द्यावे, असे भावनिक आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 37 वे वार्षिक अधिवेशन आज खामला चौक येथील विजयश्री पराते सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, विचारवंत प्रा. डॉ. मधूकर कासारे, सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.पी. पाटील, उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲङ प्रभाकर मारपकवार, भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटपटू मोना मेश्राम, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष रविंद्र पालके, सत्यदेव रामटेके, डॉ. सोहन चवरे तसेच राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासीयांना गुलामगीरीच्या जोखडातून मुक्त केले. त्यामुळे देशात फार मोठी क्रांती झाली. त्यांच्या संघर्षामुळेच आज समाजातील चुकीच्या चालीरितींना तिलांजली मिळाली. त्यांचे विचार समाजाला आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी त्या काळी भविष्यात पाणीसाठ्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी नदीजोड प्रकल्प, सिंचन व्यवस्था, पाणी अडवणे आणि जिरविणे याबाबत उपयुक्त योजना सुचविल्या होत्या. आजही कालबाह्य झाल्या नाहीत.मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलतांना ते म्हणाले की, आरक्षण हा संविधानाने दिलेला हक्क आहे. तो हक्क कोणीही हिरावून घेणार नाही,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आज कित्येक मागासवर्गीय मुला-मुलींनी उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. डॉ. बाबासाहेबांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन आपण एकजुटीने राहायला हवे. धर्म संप्रदायामध्ये अडकून न राहता आपली प्रगती त्यायोगे राज्याची प्रगती कशी होईल यादृष्टीने विचार करायला हवा. ते पुढे म्हणाले की, कृष्णा इंगळे यांच्यामुळे कास्ट्राईब कर्मचारी संघ तयार झाला. संपूर्ण देशात कास्ट्राईब ही एकमेव मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करणारी संघटना असून शासनासोबत नियमित चर्चा करुन सर्व सामान्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने सोडवित असते.आरक्षणाबाबतच्या मुद्यावर येत्या हिवाळी अधिवेशन काळात चर्चा करण्यात येईल. याबाबतीत मागासवर्गीयांवर कोणावरही अन्याय होणार नाही.मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व फी माफीबाबत शासनस्तरावर हिवाळी अधिवेशन काळात चर्चा करुन त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटपटू मोना मेश्राम हिला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते 25 हजार रुपयांचा चेक देऊन गौरविण्यात आले. मोना मेश्राम यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी बोलून सरकारी कोटयातून घर मिळवून देण्याचे आश्वासन श्री. रामदास आठवले यांनी यावेळी दिले. उद्या दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मोना मेश्राम सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव कांबळे यांनी केले. संचालन बाळासाहेब थोरात तर आभार कार्याध्यक्ष रविंद्र पालवे यांनी मांडले.
No comments:
Post a Comment