मुंबई, दि. 27 : ज्या बँकांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज खाते आहे, त्या बँकेला सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ आधार क्रमांक नोंद करावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
श्री. देशमुख म्हणाले, सर्व कर्जदार शेतकऱ्यांची माहिती बँकेकडून मागविण्यात आली आहे, मात्र काही बँकांनी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नोंद नसल्यामुळे ही माहिती देण्यास विलंब होत असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये कर्जखाते आहे, त्या बँकेत तत्काळ आपला आधार क्रमांक नोंद करावा आणि बँकेनेसुद्धा शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकांची नोंद घेऊन कर्जमाफीसाठी लागणारी सर्व कर्जखात्यांची अचूक माहिती शासनाला वेळेत द्यावी, अशा सूचना बँकांना केल्या.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबई येथे राष्ट्रीयकृत बँका व खासगी बँकाची कर्जमाफीसंदर्भात शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती संकलनाबाबत सहकार विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, वरील सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत बँकांकडून येणाऱ्या माहितीच्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. एकूण 33 बँकांपैकी 27 बँकांनी 50 टक्यांपेक्षा जास्त माहिती बँकस्थरावर भरण्यात आल्याचे सांगितले. मात्र काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्यामुळे संपूर्ण माहिती देण्यास विलंब होत असल्याचे बँकांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक संबधित सर्व बँका/विकास संस्था यांच्याकडे तत्काळ नोंद करावा.
००००
No comments:
Post a Comment