दीक्षाभूमी येथील सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा
नागपूर, दि. 3 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुरस्कार प्राप्त संस्था व समाजसेवकांनी शासन व वंचित घटकातील दुवा म्हणून कार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन 2017-18 करीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार 62 व्यक्ती व 6 संस्था, तसेच पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार 1 व्यक्ती व 1 संस्था आणि संत रविदास पुरस्कार 4 व्यक्ती व 1 संस्था असे एकूण 67 व्यक्ती व 8 संस्थांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, भाई गिरकर, डॉ. मिलींद माने, सुधीर पारवे, केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या सुलेखा कुंभारे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, सुभाष पारधी प्रामुख्याने उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाने विविध योजना राबवून समाजातील गरीब व वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून श्री. बडोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले लंडन येथील घर, आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मुंबई येथील इंदु मिल जागेचे हस्तांतरण, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, युपीएससी मार्गदर्शन केंद्र,वसतिगृह, तसेच नोकरी करणा-या मागासवर्गीय महिलांसाठी पुणे, मुंबई आणि नागपूर येथे वसतिगृह आदी विविध क्षेत्रात शासनाने आजपर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्यात आली असून वैधता प्रमाणपत्र वितरणासाठी यशस्वी प्रणाली अमलात आणून नागरीकांना होणारा त्रास कमी करण्यात आला आहे. बौध्द विवाह कायद्याचे काम लवकरच पुर्णत्वास येणार आहे. आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबध्द आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी बार्टीच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शासनाच्या या सर्व योजना मागासवर्गीय लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुरस्कार प्राप्त समाजसेवक व संस्थांनी यापुढेही अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दिलीप कांबळे म्हणाले, शासनाच्या योजनाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य सामाजिक संस्था व समाजसेवक सातत्याने करीत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव पुरस्कार देऊन करण्यात येत आहे. पुरस्कारामुळे समाजातील इतर घटकांना समाजकार्याची प्रेरणा मिळत असते. मागासवर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाद्वारे विविध योजनांच्या माध्यमातून कार्य सुरू आहेत. या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अशा सामाजिक संस्था व समाजसेवकांनी शासनाला सदैव सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी इतर मान्यवरांचेही मार्गदर्शन झाले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार 62 व्यक्तींना देण्यात आला असून प्रत्येकी 15 हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच 6 संस्थांना प्रत्येकी 25 हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संत रविदास पुरस्कार 4 व्यक्ती व 1 संस्था यांना देण्यात आला. प्रत्येक व्यक्तीला 21 हजार रूपये रोख व संस्थेला 30 हजार रूपये रोख, तसेच प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार एका व्यक्तीला 21 हजार रूपये रोख व एका संस्थेला 30 हजार रूपये रोख, तसेच प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त संस्था व व्यक्तींची यादी खालीलप्रमाणे आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार –
संस्थांची नावे- जनसेवा फाऊंडेशन, पुणे, आरोग्य प्रबोधनी, गडचिरोली, इंदिराबाई गायकवाड चॅरीटेबल ट्रस्ट, नवी मुंबई, विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, सोलापूर,कोल्हापूरी लेदर चप्पल उत्पादक व विक्रेचा संस्था, कोल्हापूर, परिवर्तन विद्या प्रसारक संस्था, धुळे
व्यक्तींची नावे – माजी न्यायमुर्ती चंद्रभान लहानुजी थुल (राज्य अनुसुचित जाती, जमाती आयोगाचे सदस्य ), अरूण भालेकर, प्रकाश जाधव, ॲड. डॉ. प्रल्हाद खंदारे, दयानंद काटे, चंद्रकांत बानाटे, श्रीमती सुचित्रा इंगळे (सर्व मुंबई), साकीब गोरे, भरत खरे, सौ. विद्या धारप, डॉ. रेखा बहलवाल (सर्व ठाणे), चंद्रकांत जाधव (सिंधुदुर्ग), काशीराम कदम (रत्नागिरी), बच्चुसिंग टाक,श्रीकांत मंत्री, प्रभाकर फुलसुंदर, सिध्देश्वर जाधव, डॉ. जनार्दन मुनेश्वर, बापुसाहेब सरोद (सर्व पुणे), विश्वनाथ शिंदे (सातारा) भिमराव बंडगर (सोलापूर), सदाशिव आंबी (कोल्हापूर),राजाराम गरूड (सांगली), राजेश सोदे (नाशिक), शिवाजी पाटील (जळगाव), दिपक गायकवाड (अहमदनगर), सुधाकर पोकळे, रामेश्वर अभ्यंकर (अमरावती), यादव तामगाडगे (नांदेड),वसंत भगत, विजय भोयर, प्रकाश कुंभे, हंसराज मेश्राम, शरद अवथरे, भैय्यालाल बिघाणे, कृष्णराव चव्हाण, भाऊराव गुजर, विलास गजघाटे, करूणा चिमणकर, रमेश कुमार नेहरूलिया,उमा पिंपळकर, हभप रामकृष्ण महाराज पौनीकर, भिमराव इंगळे, परिणीता माथुरकर, दिलीप गोईकर, सांबाजी वाघमारे (सर्व नागपूर), डॉ. सविता बेदरकर, रतन वासनिक (गोंदिया), सुचिता बनसोड (अकोला), हेमंतकुमार भालेराव (यवतमाळ), राजेश अहिव (वर्धा), प्रा. विनोद मेश्राम (भंडारा), डॉ. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद), पंडितराव सुर्यवंशी, केशव कांबळे, मोमीन गफुरसाब (लातुर), भिमराव हत्तीअंबीरे (परभणी), सुरजीसिंह वाघमारे, साहेबराव कांबळे (हिंगोली), शंकर विटकर (बीड)
संत रवीदास पुरस्कार
संस्थेचे नाव - रविदासा विश्वभारती प्रतिष्ठान, अमरावती
व्यक्तींची नावे – पंढरीनाथ पवार, डॉ. रोहिदास वाघमारे (मुंबई), डॉ. आनंद गवळी (पुणे), दगडू माळी (बुलढाणा)
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
संस्थेचे नाव – जागर प्रतिष्ठान (बीड)
व्यक्तीचे नाव – श्रीमती मीरा भट (भंडारा)
******
No comments:
Post a Comment