जागतिक एड्स
दिनानिमित्त आयोजित
माहिती प्रदर्शनाचे
आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व ‘समाधान ॲप’चे
अनावरण
मुंबई, दि. 1 : राज्यातील एड्स रुग्णांच्या संख्येचे प्रमाण 0.7 टक्क्यांपर्यंत कमी झाले. पुढील काळात झिरो मिशनच्या माध्यमातून हे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्यात येईल. याकरिता राज्यातील प्रत्येक एड्स रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी आज येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सभागृह, पार्सल बिल्डिंग येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि आरोग्य विभाग व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एचआयव्ही एड्सविषयी माहिती देणारे ‘समाधान ॲप’चे अनावरण तसेच माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रदर्शनाची पाहणी करुन माहिती घेतली व येथील एड्स तपासणी व रक्तदान शिबिरालाही डॉ.सावंत यांनी भेट दिली.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिपकुमार व्यास, संचालक आरोग्य सेवा डॉ.संजीव कांबळे, मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.श्यामसुंदर, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक विशाल अग्रवाल तसेच एड्स नियंत्रण समितीचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, एड्सग्रस्त रुग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहिजे. या रुग्णांकरिता राज्यात उपचार पध्दती सुरु झाल्या असून यासाठी लागणारा औषध पुरवठा उपलब्ध झाला आहे. यामुळे एड्स रुग्णांच्या मनात जी अपराधाची भावना होती ती कमी झाली आहे. जागतिक वर्ल्ड एड्स संस्थेने यावर्षी एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी ‘Know Your Status’ हे ब्रिदवाक्य ठेवले असून एड्सबाबत आपले स्टेटस काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. याबाबतची माहिती गोपनीय राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
एड्स रोगाचे आईपासून मुलाला होणारे संक्रमन याकरिता कंट्रोल एक्झीबिशन मध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला बक्षिस मिळाल्याबद्दल त्यांनी आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अशासकीय संस्था व अधिकारी वर्गाचे चांगले काम केल्याबदल अभिनंदन केले.
डॉ.सावंत म्हणाले, राज्यातील प्रत्येक रुग्णाला नॅक टेस्ट असलेले रक्त मिळाले पाहिजे. यावर काही मर्यादा आहेत, मात्र आर्थिकदृष्ट्या संक्षम करुन यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. नॅक टेस्ट असलेले रक्त राज्याच्या सर्व रक्त पेढ्यात पोहचले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेवून जायचे आहे. प्रत्येक एड्सग्रस्त रुग्णांना उपचार मिळाले पाहिजे याकरिता राज्यात अनेक ठिकाणी उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. एड्स दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सर्व तालुक्यात पोहोचण्याचा उद्देश आहे. या दिनानिमित्त नव्या उमेदाने एड्सचा मुकाबला करायचा असून राज्याला एड्समुक्त करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एड्सच्या रुग्णांच्या संख्येत 50 टक्के घट - डॉ. अनुप कुमार
डॉ. अनुप कुमार म्हणाले, राज्यातील एड्स नियंत्रण संस्था कार्यरत असून याच्यामार्फत एड्सच्या उपचाराकरिता जवळपास चार हजार उपचार केंद्र राज्यात उपलब्ध आहेत. या माध्यमातून एड्सग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येतात. मोबाईलवरील स्टेटस पाहण्यापेक्षा आपले स्टेटस आहे ते स्वत: जाणून घेण्याची वेळ आली आहे. ‘Know Your Status’असे ब्रिदवाक्य यावर्षीच्या एड्सदिनाचे आहे. एड्स आजाराचा जो संसर्ग आहे तो 50 टक्क्यापेक्षा कमी करण्याचा उद्देश असून यावर उपाय करण्यासाठी पूर्ण राज्यात 3 हजार 957 केंद्र आहेत. आई ते मुलामध्ये होणारे एड्स रोगाचे संक्रमण कमीत कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील 2011 च्या तुलनेत एड्सच्या रुग्णांच्या संख्येत 2017 मध्ये 50 टक्के घट झाली असल्याचेही डॉ. अनुप कुमार यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment