Wednesday, 13 September 2017

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन


            मुंबई, दि. 13 राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (एन.सी.व्ही.टी) मार्फत घेण्यात येणारी शिकाऊ उमेदवारांची अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा नोव्हेंबर 2017 मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून बसणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
          महाराष्ट्रातून या परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी शिकाऊ उमेदवारांचे सविंदा करारपत्र ज्या मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रात सादर केलेले आहे त्याच मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रामध्ये 3 आणि  3-ए या विहित नमुन्यात उमेदवाराची माहिती आस्थापनेच्या पत्रासह दिनांक 26 सप्टेंबर 2017 पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. आस्थापनांनी शिकाऊ उमेदवारांचे पात्रता प्रमाणपत्र विहित केलेल्या फॉर्म-4 मध्ये अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सुरु होण्यापूर्वी 15 दिवस अगोदर परीक्षा केंद्रास पाठविणे अपेक्षित आहे.
           परीक्षेस बसण्यास पात्र असणाऱ्या सर्व नियमित शिकाऊ उमेदवारांनी विहित नमून्यात अर्ज परीक्षा शुल्क 550/- सह 18 सप्टेंबर 2017 पर्यंत करावे. तसेच माजी खाजगी उमेदवारांनी विहित नमुन्यात ते ज्या परीक्षा केंद्रामधून अनुत्तीर्ण झाले असतील त्या परीक्षा केंद्रामध्ये 18 सप्टेंबर 2017 पर्यंत परीक्षेचे अर्ज विहित शुल्कासह सादर करावेत.
         परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पुढील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे जसे उमेदवार शिल्पकारागिर प्रशिक्षण योजनेअंतर्गत संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच एन.टी.सी.नंतर 1 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 4 वर्ष आणि 2 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच उमेदवार कार्यरत असलेली आस्थापना शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत अथवा शासकीय/निमशासकीय उपक्रमाअंतर्गत कार्यरत असावी. शिकाऊ उमेदवार आणि नवीन खाजगी उमेदवारांनी अर्जाच्या विहीत नमुन्यासाठी आणि सविस्तर माहिती पत्रकांसाठी संबंधित जिल्हयातील जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांशी संपर्क साधून 28 सप्टेंबर 2017 पूर्वी अर्ज करावेत असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी केले आहे.
००००

No comments:

Post a Comment