नागपूर, दि. 9 :अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम देशपातळीवर समान असावेत या
धोरणानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एचएससी) तसेच
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला
आहे. दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी तपासणीच्या दृष्टीने
शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. दिवाळीपूर्वी ही समिती या संदर्भात
अहवाल सादर करेल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान सभेत लक्षवेधी
सूचनेला उत्तर देताना सांगितले.
सदस्य सुनील प्रभू यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना
मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. तावडे म्हणाले,महाराष्ट्रामध्ये एचएससी
बोर्डाबरोबरच सीबीएसई, आयसीएसई, आयबी या अभ्यासक्रमाचेही मंडळ आहे.
या मंडळामध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी शिक्षण घेतात. या दोन्ही मंडळाच्या
काठिण्य पातळीमध्ये फारसी तफावत नाही. सीबीएसई आदी मंडळाच्या विद्यार्थ्यांना 500
तर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 650 गुण असतात. तरीही दोन्ही मंडळाच्या काठिण्य
पातळीची समानता तपासण्याच्यादृष्टीने शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल,
समितीच्या अहवालावर घेण्यात येणारा निर्णय हा गुणवत्तेच्या आधारावर
घेण्यात यईल, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान
होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही
श्री. तावडे यांनी सांगितले.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना
त्यांच्या घराजवळ प्रवेश न मिळता तो अतिशय दूर मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते,
तरीही विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश देताना हे प्रवेश
विद्यार्थ्यांच्या घराजवळ मिळावेत, यासाठी नेबर हूड स्कूलींग ही संकल्पना राज्य
शासनाच्याविचाराधीन आहे. त्यादृष्टीने या संदर्भात अभ्यास करण्याच्यादृष्टीने एक
समिती स्थापन करण्यात येईल. शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव,शालेय शिक्षण, प्रधान सचिव, विधी
व न्याय विभागाचे, शिक्षण आयुक्त त्याचप्रमाणे विधिमंडळ
सदस्य यांची एक समिती स्थापन करण्यात येईल,असेही श्री. तावडे
यांनी यावेळी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment