Monday, 9 July 2018

भारत-चीन औद्योगिक संबंधात विश्वास महत्वाचा - अमित वायकर


मुंबई, दि. 9 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चीन भेटीनंतर भारत आणि चीन मधील संबंध अधिक दृढ होत आहेत. उद्योग क्षेत्रात चीनसोबत बरोबरी करण्यासाठी भारताने याआधीच मेक इन इंडियाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. उद्योग आणि रोजगार वाढीसाठी भारत आणि चीन या दोन्ही देशातील व्यवहारांमध्ये विश्वास संपादन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन चीनमधील भारतीय उद्योगपती अमित वायकर यांनी केले.
विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज इंडो-चायना संबंधया विषयावर श्री. वायकर बोलत होते. यावेळी आमदार विनायक मेटे, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, अपर्णा वायकर यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठातील अधिव्याख्याते, विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. वायकर म्हणाले, चीनने अमेरिकेचे 1990 चे धोरण अवलंबले आहे. मेड इन चायना-2025 हा चीनचा दहा वर्षांचा व्हिजन प्लॅन आहे. या संकलनेच्या माध्यमातून पुढील 10 वर्षे चीनचे लक्ष नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट वर्क, इ-व्हेईकल आदी क्षेत्रात राहणार आहे. त्यामुळे इतर देशांना लागणाऱ्या छोट्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण करण्याची उत्तम संधी भारताला मिळणार आहे. जगभरात पुढील 10 वर्षात आयटी कंपन्यांना उज्ज्वल भविष्य आहे. न्युमेरिक कॅलक्युलेटर, रोबोटिक्स, ऐरोस्पेस, रेल्वे उपकरण, वैद्यकीय उपकरणे आणि आधुनिक कृषी अवजारे यांच्या निर्मितीतून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत.
भारतीय उद्योजकांनी चीनमध्येही गुंतवणूक करून उद्योग उभा करावेत, त्यामुळे तेथील भारतीय नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. वायकर यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
प्रास्ताविक अवर सचिव सुनील झोरे यांनी केले तर आभार सोलापूर विद्यापीठाच्या वर्षा गायकवाड यांनी मानले.
००००



No comments:

Post a Comment