Wednesday, 1 August 2018

उजनी धरणातून कॅनॉल, बोगद्यात पाणी सोडणार लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा -पालकमंत्री विजय देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. 1 : उजनी  लाभक्षेत्र परिसरात पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांसाठी धरणातून आजपासून (बुधवार दि. 1 ऑगस्ट 2018) पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय देशमुख यांनी दिली.
उजनी प्रकल्पात सद्य:स्थितीत 33 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे. मात्र सध्या उजनी  लाभक्षेत्र परिसरात पावसाचा खंड पडल्यामुळे पिके कोमेजू लागली असून या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्यांकडून पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. त्यानुसार पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक होवून निर्णय होण्यास काही अवधी लागणार होता, तथापि, जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती व गांभीर्य पाहून पालकमंत्री श्री. देशमुख यांनी तातडीने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचेशी संपर्क साधून त्यांना सविस्तर परिस्थिती सांगितली. उजनी धरणातून तात्काळ पाणी सोडण्याची विनंती केली. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीष महाजन  यांनी उजनी धरणातून खरीप हंगामासाठी कॅनॉल व बोगद्यात आवर्तन सोडण्याबाबत अधिक्षक अभियंता, सोलापूर यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आज बुधवार दि. 1 ऑगस्ट रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे, असे पालकमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
            जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी उजनी परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने निर्णय घेतल्याबाबत पालकमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
                                                                                 ००००

No comments:

Post a Comment