मुंबई
दि. 18 : ऑटोचालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावास राज्य
मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे विधानसभा
अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. आज यासंदर्भात त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात
आली होती त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस
माजी विधानपरिषद सदस्य मोहन जोशी, परिवहन
विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, कामगार आयुक्त श्री. कल्याणकर यांच्यासह विदर्भ
ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ऑटोरिक्षाची
आयुष्यमान सर्वत्र एकसारखे राहावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता श्री.
पटोले यांनी व्यक्त केली तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित पर्यावरणस्नेही वाहने बाजारात
येत असून त्यांची आयुष्यमर्यादा अधिक आहे. वाहनांची वयोमर्यादा लक्षात घेतांना ही
बाबही विचारात घेतली गेली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ऑटोरिक्षाच्या
विम्यासंदर्भात हा विषय विमा विनियामक व विकास प्राधिकरण यांच्याशी संबंधित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
विमा कंपन्यांनी वाहनास जारी केलेला विमा पॉलीसीचा डेटा दैनंदिनरित्या आय.आर.डी.ए
कडून तपासला जातो व ही माहिती म्हणजे वाहनाचा विमा ऑनलाईन पद्धतीने पाहण्याची सुविधा
प्रणालीवर उपलब्ध असल्याचे बैठकीत
सांगण्यात आले.
खाजगी
रिक्षातून होणाऱ्या बेकायदा वाहतूकीस बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. त्यावर
राज्यात वायुवेग पथकाद्वारे नियमितपणे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर
कारवाई करण्यात येत असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीत ऑनलाईन
परवाने बंद करणे, शालेय विद्यार्थ्यांची
ऑटोरिक्षातून वाहतूक यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
००००

No comments:
Post a Comment