स्वच्छ, शुद्ध शिवभोजन
मुंबई, दि. 24 : 26
जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या शिवभोजन योजनेचा लाभ देताना स्वच्छ व शुद्ध जेवणाकडे
लक्ष ठेवा. जनतेच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून गरीब व गरजू लोकांनाच
शिवभोजनाचा लाभ देण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व
ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
मंत्रालयात
आज सर्व पुरवठा उपायुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समवेत
शिवभोजन योजनेच्या तयारीचा आढावा व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे घेण्यात आला त्यावेळी
श्री. भुजबळ बोलत होते.
श्री.
भुजबळ म्हणाले, शिवभोजन योजनेचा लाभ प्रामाणिक गरीब व गरजू लोकांना पोहोचला पाहिजे.
यासाठी जिल्हा यंत्रणांनी सतर्कतेने काम केले पाहिजे. चांगल्या व प्रामाणिक
सार्वजनिक संस्था आणि महिला बचत गट यांना शिवभोजन केंद्र सुरु करण्यास प्राधान्य
द्यावे. भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल, भोजनालये दुपारी 12
ते 2 या कालावधीत कार्यरत राहतील. त्यामुळे यावेळेस गर्दी होण्याची शक्यता
असल्याने आवश्यकता भासेल तेथे पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी. शिवभोजन केंद्र
चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोबाईल ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे.
शिवभोजन
योजनेची जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांना माहिती होण्यासाठी होर्डींग, बॅनर्स,
पोस्टर्स, फ्लेक्स, माहिती
फलक योग्य त्या ठिकाणी लावण्याची काळजी घ्यावी. शिवभोजन केंद्रात स्वतंत्र किचनची
व्यवस्था असावी. किचनमध्ये अन्न पदार्थ तयार करताना स्वच्छतेचे सर्व निकष पाळणे
बंधनकारक असेल. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्टेन्लेस
स्टीलची असावी. अन्न पदार्थ तयार करताना फिल्टर पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
स्वच्छ टेबल, पोषक पदार्थ आणि गुणवत्ता राखुन भोजन तयार करुन
घ्यावे, यासाठी जिल्हा यंत्रणांनी यावर नियंत्रण ठेवावे
असेही श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव श्री.एम.एम.सुर्यवंशी,
सतीश सुपे, श्रीमती चारशिला तांबेकर उपस्थित
होते.
000


No comments:
Post a Comment