Friday, 8 September 2017

मुंबईच्या महापुरावर उपाययोजनेसाठी ब्रिमस्टोवॅडसहअन्य प्रकल्पांना गती देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, दि. 8 : मुंबईच्या महापुरावर उपाययोजना करण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, वाहतूक गतिमान करण्यासाठी मेट्रो, उपनगरीय रेल्वे, कोस्टल रोड, सांडपाणी प्रकल्प आदी उपाययोजनांना गती दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
            ‘मुंबईच्या महापुरावर उपाय काय?’ या टीव्ही 9 वाहिनीवर आयोजित थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमात चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
            यावेळी प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईच्या वाढीला आता वाव नाही. मुंबईमध्ये मोठ्या पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास आधी त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. रस्ते बंद होतात, उपनगरीय रेल्वेचे वाहतुकीचे डिझाईन जुने असल्याने रेल्वे मार्गावर पाणी येते व रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे प्राधान्याने वाहतूकव्यवस्थेवर उपाययोजना कराव्या लागतील. तसेच साठलेले पाणी वाहून जाण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतील. ब्रीमस्टोवॅड सारख्या प्रकल्पाला गती द्यावी लागेल. पंपींगची व्यवस्था करावी लागेल. कारण भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी पावसाच्या पाण्याला परत ढकलते. पंपींगची कनेक्टिव्हीटी वेगाने पूर्ण करावी लागेल. त्यामुळे बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर डिस्पोजल सिस्टीम (ब्रीमस्टोवॅड) प्रकल्प पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
            ते पुढे म्हणाले, सांडपाणी व मैला कोणत्याही प्रक्रियेशिवाय समुद्रात सोडले जाते. त्याचा गटारव्यवस्थेतून समुद्राकडे जाण्याचा वेग कमी असतो. मात्र त्यावर प्रक्रिया करुन समुद्रात सोडल्यास वेगाने समुद्राकडे वाहून जाईल. यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना केंद्र सरकारकडून आवश्यक त्या मंजुरी आणण्याचे काम शासनाने केले आहे. सध्या 2100 एमलडी मैला समुद्रात टाकल्यामुळे समुद्रही खराब होतोय. येत्या 4 वर्षात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाल्याने हे प्रक्रिया झालेले सांडपाणी वेगाने समुद्रात जाईल. मिठी नदीचे अतिक्रमण जवळपास निघाले असून काही न्यायालयीन स्थगितीचे प्रश्न आहेत. त्याबाबत जो निकाल येईल त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही केली जाईल.
            पावसामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी 170 कि.मी. च्या मेट्रोला मान्यता दिली. 120 कि.मी.च्या मेट्रोमार्गाचे काम सुरु झाले आहे. आता उपनगरीय रेल्वेच्या चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या दोन महत्त्वाच्या मार्गावर इलेव्हेटेड कॉरिडॉर करत आहोत. त्यामुळे पूरस्थितीमध्ये उपनगरीय रेल्वेही थांबणार नाही. डिसेंबरपर्यंत 220 कि.मी. च्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल त्यामुळे मुंबईच्या वेगात वाढ होईल.
            पंपींग स्टेशन्स पूर्ण होण्यासाठी गती देण्यात येणार आहे. कोस्टल रिजन झोन (सीआरझेड) मध्ये पंपींग स्टेशन्सना परवानगी देता येणार नाही, असा अभिप्राय दहा वर्षांपूर्वी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. गेल्या दहा वर्षात सीआरझेड मध्ये या प्रकल्पांवर काम झाले नाही. आपण मात्र तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा करुन पंपींग स्टेशन सुरु करण्यासाठी परवानगी आणली आहे.
            कोस्टल रोड हा प्रकल्पही मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त असणार आहेच, मात्र समुद्राच्या भरतीच्या मोठ्या लाटा किनाऱ्यावर येण्यास अडथळा (बॅरीयर) म्हणूनही उपयुक्त ठरणार आहे. हवामानाचा अंदाज व्यक्त करण्याच्या पद्धतीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपण विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे गेलो असल्याने हवामान विभागाची अंदाज व्यक्त करण्याची क्षमता आहे. मात्र, हवामानाचे मॉडेल तपासून पाहण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
            या चर्चेदरम्यान ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, मृणालिनी नानिवडेकर तसेच सूत्रसंचालक वैभव कुलकर्णी आणि निखीला म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले.

००००

No comments:

Post a Comment