मुंबई, दि. 25 : ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाने आपल्या साहित्यातून समकालिन राजकीय-सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवून मराठी साहित्याला वास्तववादी वळण देणारा लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या श्री. साधू यांनी अनेक सामाजिक प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी केली. विशेषत: महानगरी जीवनातील व्यथा त्यांनी अचूकपणे मांडल्या. त्यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्या तर वाचकांच्या कायम स्मरणात राहतील. मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांनी पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला. त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा गौरव प्राप्त झालेल्या श्री.साधू यांचे व्यापक लिखाण पत्रकारिता आणि साहित्य विश्वात येऊ पाहणाऱ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला आहे.
-----०-----
No comments:
Post a Comment