Tuesday, 12 December 2017

अकोला जिल्ह्यात 1 लक्ष 25 हजार 498 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र..!

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

अकोला, दि. 12 :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थातच ऐतिहासिक कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 1 लक्ष 25 हजार 498 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर प्राप्त याद्यांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या बँकांना पाठविण्यात आल्या. या ग्रीन यादीत जिल्ह्यामध्ये 1 लक्ष 25 हजार 498 शेतकरी पात्र असून  यामधील 94  हजार 345 शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच (ओटीएस) एकरकमी योजनेतंर्गत 12 हजार 207 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. अशाप्रकारे एकरकमी व सरसकट कर्जमाफी याप्रमाणे जिल्ह्यात 1 लक्ष 6 हजार 552  शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 18 हजार 946 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात आले आहे.
     या योजनेतंर्गत आतापर्यंत राज्यात साधारणत: 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी 77 लाख अर्ज राज्यभरातून प्राप्त झाले.  प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर  डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी  हस्तांतरित करण्यात आला आहे.
दीड लक्ष रूपयांपर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आले, तर दीड लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट अंतर्गत दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिल्या जात आहे.  शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शेतजमिनीची अट न ठेवता कर्जमाफी योजना जाहीर केली. जिल्ह्यातील दीड लाख पर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे खाते निल करण्यात आलेले आहे.  
 याविषयी प्रतिक्रिया देताना अकोट तालुकयातील पोपटखेड येथील योगेश मोहन तायडे म्हणतात, की एक अल्पभुधारक शेतकरी आहे. माझ्यावर 63 हजार 85 रुपयांचे कर्ज थकीत होते. मात्र या शासनाने कर्जमाफी दिली. माझे संपुर्ण कर्ज माफ झाले असून या योजनेमुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. याबद्दल राज्य शासनाचा मी आभारी आहे. तर याच गावातील शेतकरी चेतन श्रीराम भास्कर यांनी सांगितले, माझ्याकडे बँकेचे 46 हजार 445 रुपयांचे कर्ज थकीत होते. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहिर केली आणि आम्हाला कर्जमाफी मिळाली  माझे संपूर्ण  कर्ज माफ झाले असून मी पुन्हा नव्या उमेदीने शेती करण्यासाठी सज्ज आहे. शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे आम्हा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा लाभ मिळाला आहे. 

                                                            ******

No comments:

Post a Comment