नागपूर, दि. 22 : माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘ॲपद्वारे’ भेटणार आहेत.
या ॲपचे उदघाटन आज नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान नागपूर येथे कार्यरत असणारे 'जय महाराष्ट्र' या वृत्त वाहिनीचे ज्येष्ठ कॅमेरामन दिनेश सातपुते यांच्या हस्ते झाले. हे ॲप ड्रीमवेअर्झ कंपनीचे रोनीत वाघ व पुष्कर गायकवाड यांनी तयार केले आहे. यावेळी मंत्री श्री. गिरीश बापट यांच्या तीन वर्षाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या‘तीन वर्षाचा सार्थक प्रवास: सर्वांगीण विकास’ या अहवालाचे प्रकाशनही जगन्नाथ बाजीराव बोरकुटे रा. गडचिरोली तसेच नानाजी माधवराव बेले( रा.अंबाडा, ता.नरखेड, नागपूर) या दोन सर्वसामान्य ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते करून एक वेगळा आदर्श मंत्री श्री बापट यांनी समाजापुढे मांडला.
मंत्री श्री. बापट हे आमदार असल्यापासूनच त्यांची मुंबई व पुणे येथील कार्यालये सीसीटीव्ही ने जोडली आहेत. या द्वारे त्यांच्या भेटीसाठी येणारे लोक तसेच कार्यालयातील कामकाजावर ते लक्ष ठेवतात. मात्र आता या ॲपमुळे श्री बापट यांना आपल्या मतदारांशी व जनतेशी कायम ‘कनेक्ट’ राहता येईल तसेच नागरिकांनाही आता मंत्र्यांना भेटण्याची वेळ घेणे सोपे जाईल पर्यायाने, त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.
याविषयी अधिक माहिती देताना वाघ यांनी सांगितले की, या ॲपच्या माध्यमातून संबंधित नागरिकाला मंत्री बापट यांना भेटीसाठी वेळ घेता येईल. वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीस याबाबत 'एसएमएस' द्वारे माहिती दिली जाईल. काही कारणास्तव भेट रद्द झाल्यास त्याबद्दल ही त्या व्यक्तीला कळविण्यात येईल. एखाद्या विषयावर अधिकाऱ्यांची बैठक नियोजित केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती कळवली जाईल. कार्यक्रमाला अथवा बैठकीला जाणे मंत्री बापट यांना शक्य होत नसल्यास त्याबाबत संबंधितांना कळविण्यात येईल. एकंदरीतच कार्यालयीन तसेच दैनंदिन कामकाजातही सुसूत्रता आणण्यासाठी या ॲपचा प्रचंड फायदा होईल.
हे ॲप ‘Girish Bapat’ या नावाने प्ले स्टोरवर उपलब्ध असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया उपक्रमाचा हा एक भाग आहे. नागरिकांशी संवाद वाढविण्याबरोबरच आपल्या खात्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणे, हा देखील ॲप सुरू करण्यामागील मंत्री बापट यांचा उद्देश असल्याचेही वाघ यांनी सांगितले.
ॲप प्रमाणेच गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची सविस्तर माहिती जनतेला ‘‘तीन वर्षाचा सार्थक प्रवास: सर्वांगीण विकास’ या अहवालाच्या माध्यमातून पालकमंत्री गिरीश बापट जनतेला देणार आहेत.
या अहवालात प्रामुख्याने पुण्याच्या विकासासाठी केलेली कामे तसेच अन्न, औषध, प्रशासन व नागरी पुरवठा खात्यात झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यामध्ये पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंगरोड, पुणे मेट्रो, यासारखे निर्णय, इंडस्ट्रीयल हब हिंजवडी येथील समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, आंतरराष्ट्रीय विमानतळ,पीएमआरडीए, जलव्यवस्थाप न, विकास आराखडा ,घनकचरा व्यवस्थापन, आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मृतिस्थळ करणे, देहू- आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकास,पुणे आणि पिंपरी चिंचवड 'स्मार्ट सिटी' करण्याबाबत केलेले प्रयत्न आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.अन्न व नागरी पुरवठा तसेच अन्न व औषध प्रशासन आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून त्यांनी हृदय शस्त्रक्रिया साठी लागणारे स्टेंट स्वस्त करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, तीन वर्षात सुमारे 64 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करून गुटखा बंदी आणखी प्रखर करण्यासाठी करण्यासाठी केलेले प्रयत्न, स्टेट स्पेसिफिक चार्ज कमी करून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्याकडे पाठपुरावा, केरोसीन मुक्त जिल्हे करण्यासाठी केलेले प्रयत्न, रेशनचा भ्रष्टाचार कमी करण्याबाबत केलेल्या उपाययोजना, रेशन दुकानदारांचे मानधन वाढवण्याबाबत घेतलेले निर्णय तसेच संसदीय कार्यमंत्री म्हणून या तीन वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा या अहवालाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
००००
No comments:
Post a Comment