मुंबई, दि. 5: यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक जिल्ह्यात कापूस
पिकावर बोंडअळीचा आणि धान पिकावर तुडतुड्याचा प्रादूर्भाव झाल्याच्या तक्रारी असून
याबाबत झालेल्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश राज्य मंत्रिमंडळाने आज
दिले.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाला यासंदर्भात
तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यंदाच्या खरीप हंगामात राज्यातल्या
अनेक जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळींचा आणि धान पिकावर तुडतुड्याचा प्रादूर्भाव
झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणीही
करण्यात येत आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे
आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतचे सविस्तर प्रस्ताव
शासनाकडे दाखल झाल्यानंतर त्यापुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. नैसर्गिक
आपत्तीमध्ये रोग आणि किडींचा प्रादूर्भावही समाविष्ट असल्याने राज्य आणि राष्ट्रीय
आपत्ती निवारण निधीतून देण्यात येणाऱ्या मदतीस शेतकरी पात्र ठरू शकतात.
-----०-----
No comments:
Post a Comment