मुंबई, दि. 26 : राज्यातील साथरोग नियंत्रण करण्यासाठी नियमित शासनामार्फत सर्वेक्षण करण्यात येते या सर्वेक्षणात साथरोग बाधित रुग्ण आढळल्यास अशा रुग्णांवर राज्यातील ग्रामीण व शहरी रुग्णालयात उपचार करण्यात येतात. स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यूचे रुग्ण प्रामुख्याने पावसाळ्यात आढळतात. परंतु या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सदर रुग्ण आढळल्याचे दिसतात. अशा रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले असून येत्या काळात स्वाईन फ्ल्यू व डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी अभ्यास गटाची नेमणूक करुन संशोधन व उपाययोजना अंमलात आणण्यात येतील असे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
सर्वश्री सदस्य पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे, हर्षवर्धन सपकाळ, आमीन पटेल आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली. लक्षवेधीवर उत्तर देताना डॉ. सावंत यांनी विधानसभेत निवेदन केले.
डास नियंत्रणासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापनाअंतर्गंत कीटक नाशके, अळीनाशकांचा वापर, गप्पी मासे, मच्छरदाण्या, अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत असून मलेरियासाठी संवेदनशील भागात कीटकनाशक औषधाच्या दोन फेऱ्या दरवर्षी करण्यात येतात. साथरोग निदान व उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये सुविधा उपलब्ध असून स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती, गरोदर माता आणि आरोग्य कर्मचारी यांना ऐच्छिक व मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या लसीकरणाच्या माध्यमातून 1 लाख 28 हजार 26 व्यक्तींना लस देण्यात आली आहे. स्वाईन फ्लू प्रभावित क्षेत्रामध्ये शासकीय तसेच खासगी डॉक्टरांसाठी नियमित कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डासोत्पत्ती रोखणे आवश्यक आहे याकरिता लोकसहभाग तसेच शालेय विद्यार्थी, पंचायतराज समिती सदस्य अशा अनेक समाज घटकांना प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच राज्यातील सर्व भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात येतो. मुंबई सारख्या शहरात डासोत्पत्ती नियंत्रण समित्या कार्यरत असून त्यांच्यामार्फत देखील जनतेचे प्रबोधन करण्यात येते, असे श्री. सावंत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.
००००
No comments:
Post a Comment