Monday, 25 February 2019

अर्थसंकल्पीय अधिवेशनास ‘वंदे मातरम्’ने सुरुवात


मुंबई, दि. २५ : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सुरू झाले. विधानसभेच्या कामकाजास राष्ट्रीय गान वंदे मातरमने सुरुवात झाली.
विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना शोक प्रस्तावद्वारे आदरांजली वाहिली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख, माजी सदस्य डॉ. गुणवंतराव सरोदे, सर्वश्री संजय बंड, विठ्ठलराव घारे, बापूराव आष्टीकर, कृष्णराव जगदाळे, सूर्यकांत खेडेकर यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला त्यास सभागृह सदस्यांनी पाठिंबा दिला.
तालिका अध्यक्षांची निवड
यावेळी अध्यक्ष श्री. बागडे यांनी विधानसभा सदस्य सर्वश्री योगेश सागर, शंभूराज देसाई, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, हर्षवर्धन सकपाळ, सुधाकर देशमुख यांची नामनिर्देशनाद्वारे तालिका अध्यक्ष म्हणून निवड केली.
०००

No comments:

Post a Comment