मुंबई, दि. 27 :
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक
नानाजी देशमुख, ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना 'भारतरत्न' हा देशातील सर्वोच्च पुरस्कार
मिळाल्याबद्दल विधानसभेमध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा ठराव आज एकमताने
संमत करण्यात आला. सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून या तिघांच्याही कार्याला
अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील ठराव मांडला.
त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाम व
आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख,
पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, बसवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत या तिघांच्याही कार्याचा गौरव केला.
विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कुशल प्रशासक
होते. राष्ट्रपतीपद भूषवताना त्यांनी देशाची शान आणि मान उंचावली. गेल्या
पन्नासहून अधिक वर्षांच्या कालावधीतील महत्त्वपूर्ण घटना देशाच्या वाटचालीवर
दूरगामी परिणाम करणाऱ्या ठरल्या त्यांचे
साक्षीदार प्रणव मुखर्जी होते. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव देशातील सर्वोच्च
पुरस्कार देऊन करण्यात आल्याची भावनाही श्री. बागडे यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्येष्ठ समाजसेवक
नानाजी देशमुख हे लोकनेते होते. जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेले नानाजी आदर्श
राजकारणी म्हणून सर्व परिचित होते. त्यांनी सदैव देशाच्या हिताचा आणि समाजाच्या
भल्याचा विचार केला. यावेळी श्री. बागडे यांनी नानाजी देशमुख यांच्या औरंगाबाद
दौऱ्यातील आठवणी सांगितल्या.
ईशान्य भारताचा
सांस्कृतिक चेहरा म्हणून भूपेन हजारिका ओळखले जायचे त्यांचे कार्य प्रेरणा देणारे
होते, असे गौरवोद्गार श्री. बागडे यांनी यावेळी काढले.
मुख्यमंत्री श्री.
फडणवीस यावेळी म्हणाले,
देशाच्या राजकारणात संकटमोचक म्हणून प्रणव मुखर्जी यांनी आपली
भूमिका सदैव पार पाडली. देशाचा ग्रामीण भाग समृद्ध करण्याचे काम प्रणवदांनी केले.
आजही वित्त आयोगामध्ये गाडगीळ-मुखर्जी फॉर्म्युल्याचा वापर केला जातो. भारतीय
अर्थव्यवस्था व राष्ट्रनिर्माण यावर त्यांनी केलेले लिखाण आजही प्रेरक असल्याचे
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रणव मुखर्जी वडीलधारी मार्गदर्शकाच्या
भूमिकेत असल्याचा असल्याची भावना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त
केल्याचे सांगत राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवन लोकाभिमुख करण्याचे
काम केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रणवदांच्या माध्यमातून एक उचित
व्यक्तिमत्व देशाला लाभले म्हणून त्यांना सर्वोच्च बहुमान बहाल केला गेला, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ समाजसेवक
नानाजी देशमुख यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय
राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून नानाजींची ओळख आहे. व्रतस्थपणे राजकारण,
समाजकारण करीत वेगळी संस्कृती त्यांनी निर्माण केली. आणीबाणीनंतर
देशामध्ये विरोधकांना एकत्रित करण्याचं काम नानाजींनी केलं. त्यांनी जयप्रकाश
नारायण व इतर समाजवादी नेत्यांना एकत्र आणलं. मोरारजी देसाई प्रधानमंत्री
झाल्यानंतर, त्यांनी नानाजी देशमुख यांना भारत सरकारमध्ये
मंत्री होण्यासाठी निमंत्रित केलं. मात्र, त्यास नानाजी
यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी दीनदयाळ शोध संस्थान ही संस्था स्थापन केली.
ग्रामविज्ञान आणि त्यातून ग्रामविकास या विषयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात संशोधन
केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्याचं मॉडेल बनविण्याचं काम सुरु केलं.
उत्तरप्रदेशमध्ये नानाजी यांच्या माध्यमातून मोठं कार्य उभं राहिलं. मध्य
प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध
प्रकल्पांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर मुख्य लक्ष केंद्रीत
केले. आजही अव्याहतपणे हे काम सुरु. चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील
पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन त्यांनी स्थापन केलं. महाराष्ट्रातील बीड जिह्यात
त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येकाच्या शेताला
पाणी हा त्यांनी चालवलेल्या उपक्रमांचा उद्देश होता, असेही
मुख्यमंत्री यावेळी सांगितले.
भूपेन हजारिका
यांच्या कार्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले,अभिजात संगीतासह ईशान्य भारताला
उर्वरित भारताशी सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्यासाठी
अथक प्रयत्न करणाऱ्या श्रेष्ठ संगीतकार भुपेन हजारीका या राष्ट्रभक्ताचा गौरव आहे.
भूपेंदानी आसामी, बंगाली,
हिंदी भाषेतील गीतांना संगीत देवून देशभर लोकप्रियता मिळवली.
त्यांनी गांधी अँड हिटलर, एक पल, रुदाली,
दमन यासारख्या अनेक चित्रपटात गायलेल्या गाणी आजही रसिकांच्या मनावर
अधिराज्य गाजवित आहेत. पूर्व भारताचा एक परिपूर्ण सांस्कृतिक चेहरा अशी त्यांची
सार्थ ओळख होती.
‘ओ गंगा बहती
हो क्यूँ’ हे त्यांचं गीत अतिशय सुंदर असून ते अजरामर मानलं
जातं. बदललेल्या संस्कृती, आचारविचार यांच्यावर या गीताच्या
माध्यमातून वेगळ्यारितीने त्यांनी प्रहार केले.
भूपेन हजारिका
यांच्या संगीत, कला, चित्रपट व गायन यामधील उल्लेखनीय कामगिरीमुळे
या क्षेत्राला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. त्यांचे हे कार्य सर्वांना प्रेरणा
देणारे आहे. त्यांच्या कार्याबद्दल देशातील सर्वोच्च असणारा भारतरत्न पुरस्कार
देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
आरोग्य व सार्वजनिक
बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, भारतीय राजकारणातील भीष्म पितामह
म्हणून प्रणव मुखर्जी यांची ओळख आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण, बांगलादेश
युद्ध, 1973 चा भीषण दुष्काळ, हरितक्रांती
आदी विविध घटनांचे सहप्रवासी ते आहेत. अंगभूत हुशारी आणि मेहनत करण्याची जबाबदारी
या जोरावर माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी ते बनले.
इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्ये प्रणवदांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. देशाचे
सर्वात तरुण अर्थमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले.
आदर्श राजकारणी
म्हणून नानाजी देशमुख यांचे नाव घेतले जाते सदैव देशाच्या आणि समाजाच्या हिताचा
विचार त्यांनी केला. गावांना केंद्रबिंदू ठेवून विकास साधायचा असेल तर त्यासाठी
काय करायला पाहिजे यासाठी नानाजींनी चित्रकूट येथे आपल्या प्रकल्पात अनेक प्रयोग
केले. देशातील एका खऱ्याखुऱ्या सेवाव्रतीच्या कार्याला या सर्वोच्च पुरस्काराने
सन्मानित केल्याबद्दल केंद्र शासनाचे मी आभार मानतो.
भूपेन हजारिका यांनी
गाण्यातून सदैव मानवतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. त्यांची गाणी आसामी
भाषेत असली तरी अनेक हिंदी आणि बंगाली गाणी देखील त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.
ईशान्य भारतातील संगीत हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात
पोहोचवण्याचं काम केलं अशा शब्दात श्री. शिंदे यांनी भूपेन हजारिका यांच्या
कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
यावेळी ज्येष्ठ सदस्य
गणपतराव देशमुख सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, बसवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
विधानपरिषदेत अभिनंदन
प्रस्ताव एकमताने संमत
भारताचे माजी
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी,
ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व सुप्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारिका
यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे औचित्य
साधून त्यांच्या कार्याचा गौरव विधानपरिषदेतही करण्यात आला. सभागृह नेते तथा महसूल
मंत्री चंद्रकात पाटील यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला.
या प्रस्तावास सभापती
रामराजे नाईक निंबाळकर,
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य डॉ. नीलम
गोऱ्हे, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, हेमंत
टकले यांनी आपल्या भावना व्यक्त करीत या प्रस्तावास पाठिंबा दिला. विधानपरिषदेत हा
प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला.
००००
No comments:
Post a Comment