नागपूर, दि. 20 : राज्यातील साखर कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व या स्थितीतून या क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करणार असल्याचे सहकार मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.
विधानपरिषदेत सदस्य श्री. सदाशिव खोत यांनी साखर कारखान्यांच्या एफआरपी संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर श्री. पाटील बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना थकित एफआरपीची रक्कम देण्यासंदर्भात साखर आयुक्तांकडून प्रयत्न करण्यात येत असून सन 2018-19 या पूर्वीच्या गळीत हंगामातील थकित 1557.59 कोटी रक्कमेपैकी 84 टक्के म्हणजेच 1305.44 कोटी रक्कम वसूल करण्यात आली आहे. उर्वरित थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. साखर कारखान्यांच्या आर्थिक अवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कारखान्यांना यातून बाहेर काढून साखर उद्योगाला पुनरुज्जीवीत करण्यासाठी कार्यक्षम कारखान्यांना मदत करण्याचे काम राज्यशासन करणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या कारखान्यांचे पुनर्रचना करण्याचा विचार सुरू आहे. तसेच नाबार्डच्या सुचनांमुळे एनडीआर चांगला नसेल तर बँका कारखान्यांना कर्ज देत नाहीत. याविषयावरही ‘नाबर्ड’शी बोलून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले
यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री रामराव पाटील, सुरजितसिंह ठाकूर आदींनी सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment