नागपूर, दि. 20 : मुंबई शहर, उपनगरातील झोपडपट्टी पुनर्विकास धोरणानुसार (एसआरए) पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण व्हावेत, ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विधीमंडळ सदस्य व या क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती नेमणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जंयत पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली.
सदस्य सर्वश्री किरण पावसकर, हेमंत टकले, आनंद ठाकूर, ख्वाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण यांनी एसआरए संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर मंत्री श्री. पाटील बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, एसआरएनुसार अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली जाते. मात्र पुढे अडचणी येतात व विकासक ते प्रकल्प पूर्ण करत नाही. प्रकल्प सुरू करताना विकासकाने मान्य केलेल्या अनेक गोष्टी इमारतीमध्ये केल्या जात नाहीत. त्यामुळे तो प्रकल्प रखडला जातो. अशा प्रकल्पांची छाननी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी झोपडपट्टी प्राधिकरणाकडे पाठविण्यासाठी ही समिती काम करेल. तसेच इमारती दर्जासंदर्भातही ही समिती सूचना करेल.
पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना देण्यात येणाऱ्या थकित भाड्यासंदर्भातही तातडीने पुढील आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल. तसेच एसआरए धोरणानुसार राबविण्यात येणारे प्रकल्प सुरळीतपणे होण्यासाठी व सामान्य मुंबईकरांच्या हितासाठी राज्यशासन योग्य ती कार्यवाही करेल, असेही त्यांनी सांगितले.
या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री किरण पावसकर, सुरेश धस, विद्या चव्हाण, भाई गिरकर, जोगेंद्र कवाडे यांनी भाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment