महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या राज्याने देशाला दिशा दिली. याच भूमीत नकारात्मक विचार त्यागून सकारात्मकतेची कास धरत आंतरिक शांती, परस्पसौहार्दतेतून ब्रह्मकुमारीच्या एकता आणि विश्वासाची मोहीम प्रभावीपणे कार्य करेल व महाराष्ट्रासह देशात सुवर्णयुग अवतरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केला.
एकमेकांप्रती विश्वास-सौहार्दता-एकता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी ‘एकता व विश्वासाच्या माध्यमातून स्वर्णिम महाराष्ट्राची निर्मिती ’ या ब्रह्माकुमारीजच्या अभियानाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जामठातील विश्वशांती सरोवर येथे आयोजित कार्यक्रमात शुभारंभ झाला. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होत्या.राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माऊंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदी, नागपूर प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, महाराष्ट्राच्या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्य वीर सावरकर आदी महान रत्नांनी देश व जगाला सामाजिक समरसता व राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही राज्याने देशाच्या विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. याच महाराष्ट्रात ब्रह्माकुमारीजच्या एकता व विश्वासआधारित राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ होत आहे. यातून आत्मशांती, परस्पर सौहार्द, सकारात्मक विचार आदी जीवनमूल्यांचा समाजात प्रसार होऊन समृद्ध राज्य घडण्यासाठी प्रेरणा मिळेल.हाच मार्ग पुढे देशभर प्रशस्त होऊन परस्परातील भेदभाव सोडून करुणा,परस्पर प्रेम व समन्वयातून विकसित भारतासाठी सर्व जनता एकतेच्या धाग्यात गुंफली जाईल,असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

.jpeg)
.jpeg)


No comments:
Post a Comment