Friday, 8 September 2017

पुस्तकांच्या गावात ‘स्मरण विंदांचे’


मुंबई दि. ८ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पुस्तकांच्या गावात (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) स्मरण विंदांचेहा कार्यक्रम शनिवार, दि. १६ सप्टेंबर रोजी योजण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज दिली.
भारतातील पहिलं पुस्तकांचं गावम्हणून संपूर्ण देशाने गौरवलेल्या महाराष्ट्र शासनाच्या या अभिनव प्रकल्पात आता साहित्यिक जाणिवा समृद्ध करणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात वाचनसंस्कृतीचं सुरु झालेलं हे नवं पर्व पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे. सन २०१७-१८ हे वर्ष कविवर्य विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.  या निमित्ताने, मराठी साहित्याचा मानबिंदू असलेल्या विंदांना अभिवादन करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांच्या गावी स्मरण विंदांचेया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवाद, कविसंमेलन व अभिवाचन असे या कार्यक्रमाचे स्वरुप असून सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत ४ सत्रांत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. डॉ. अरुणा ढेरे, अभिराम भडकमकर, प्रदीप निफाडकर, ऐश्वर्य पाटेकर, डॉ. अविनाश सप्रे, श्रीधर नांदेडकर, सौरभ गोखले, संगीता बर्वे, प्रमिती नरके आदी मान्यवर साहित्यिक, कलाकार व अभ्यासक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच कविवर्य विंदा करंदीकरांच्या परिवारातील श्रीमती जयश्री काळे, आनंद करंदीकर आदी सदस्यही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री. तावडे यांनी दिली.
स्मरण विंदांचेया कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि पुस्तकांच्या गावाचा अनुभव घेण्यासाठी वाचक-रसिकांनी शनिवार, दि. १६ सप्टेंबर, २०१७ रोजी पुस्तकांच्या गावाला (भिलारला) आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही श्री. तावडे यांनी केले आहे.
तसेच इच्छूक सहभागींनी pustakanchgaav.rmvs@gmail.comया ई-पत्त्यावर आपली नावनोंदणी करावी.
००००


No comments:

Post a Comment