Saturday, 6 January 2018

माध्यमांनी जनतेचे व्यासपीठ म्हणून काम करावे - पी. आर. पाटील

जिल्हा माहिती  कार्यालयात पत्रकार दिन
  नागपूर, दि. 6  :  समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी माध्यमांनी जनतेचे व्यासपीठ म्हणून काम करतांना सामाजिक जबाबदारी स्वीकारतांना जनतेच्या न्याय हक्काचे  काम करावे, असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रादेशिक अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले.  जिल्हा माहिती कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  पी. आर. पाटील यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. 
यावेळी विभागीय भाषा संचालक एच. एम. सूर्यवंशी, पत्रकार उन्मेश पवार, कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे, विभागीय सचिव योगेश कोरडे, ॲन्टी करप्शन विभागाचे उप पोलिस अधीक्षक विजय  माहुलकर, मिलींद तोतरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, सहाय्यक संचालक जगन्नाथ पाटील  उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना  पी. आर. पाटील म्हणाले, धकाधकीच्या जीवनातही वृत्तपत्रांनी  आपले स्थान कायम  ठेवले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळतात. यामुळे चालू घडामोडीची माहिती मिळणे सुलभ होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले की, वृत्तपत्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविल्या जातात. यामुळे जनतेला शासनाचा विविध योजनेचा लाभ घेणे सुलभ होते.  स्वातंत्र्य पूर्वीची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याचे महत्त्व त्यांनी सांगितले.
ग्रामीण पत्रकार दिलीप हिवरकर म्हणाले की, ग्रामीण भागात काम करताना ग्रामीण पत्रकारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. कठीण प्रसंगीही ग्रामीण पत्रकार निरंतर काम करीत असतो.
यावेळी ग्रामीण विभागातील पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पत्रकार दिलीप हिवरकर, श्रीमती शोभा जयपूरकर, विलास मनोहर,  श्रीमती अंजली त्रिवेदी  यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती अपर्णा यावलकर यांनी तर प्रास्ताविक अनिल गडेकर यांनी केले. आभार केशव करंदीकर यांनी मानले.

**** 

No comments:

Post a Comment