नागपूर, दि. 1: “13 कोटी वृक्षलागवड” वन आंदोलनामध्ये राज्यातील प्रत्येक विभागाला उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यासंदर्भात नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्याने अत्यंत कल्पकतेने वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. वृक्षारोपण, वृक्षसवंर्धन तसेच संगोपनाचे काम केवळ शासनाचे नसून या वृक्षारोपण मोहिमेत सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्यानुसार ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी एकत्र येवून येत्या एक महिन्यात दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर विभागाला 2 कोटी 62 लक्ष 65 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्याला 43 लाख 44 हजार, वर्धा 33लाख 07 हजार, भंडारा 24 लाख 59 हजार, गोंदिया 34 लाख 60 हजार, चंद्रपूर 77 लाख 21 हजार तर गडचिरोली जिल्ह्याला 50 लाख 74 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्षलागवडीसाठी 19 हजार 731 जागा निवडण्यात आल्या असून त्यावर 1 कोटी 54 लाख 85 हजार खड्डे खोदण्यात आले आहे. वृक्षलागवड मोहिमेसाठी 3 कोटी 62 लाख 71हजार वृक्ष उपलब्ध असल्याचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
उपजीविकेवर आधारित वृक्ष लागवडीला महत्त्व
नागपूर विभागात वृक्ष लागवड मोहिमेत गेल्या दोन वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून विभागाने 93 टक्के रोपट्यांचे संगोपन आजवर केले आहे. यावर्षी विभागास 2 कोटी 62 लक्ष 65 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. विभागात उद्दिष्ट पूर्तीसाठी 3 कोटी 62 लक्ष 71 हजार रोपटे उपलब्ध आहेत. याशिवाय विभागात 5 लक्ष82 हजार हरित सेना सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य करण्यात आले आहे. नागपूर विभागात राबविण्यात येणाऱ्या महावृक्षलागवड मोहिमेमध्ये उपजीविकेचे साधन म्हणून उपयोगात येणाऱ्या वृक्षांचा समावेश करण्यात यावा यासाठी विभागीय आयुक्त यांचा भर आहे.
नागपूर विभागात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवड योजनेच्या प्रभावी अमंल बजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जनजागृतीसह 15 जून पासून ‘एक विद्यार्थी एक झाड’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘एक कर्मचारी तीन रोपटे’ तसेच वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘ऑक्सिजन पार्क’ची संकल्पना राबिवण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक संस्थेच्या मदतीने वर्धा जिल्ह्यात ‘झाडांचे गाव’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात ‘माझी कन्या भाग्यश्री बालोद्यान’ तसेच गोंदिया जिल्ह्यात मामा तलावाच्या सभोवताल वड, पिंपळ व उंबराच्या झाडाचे रोपण करण्यात येणार आहे.
*****
No comments:
Post a Comment