पुणे दि. 8: महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहे. सामान्य माणसाला संत परंपरेच्या विचारानेच कायम प्रेरित केले. संत विचार हे कालसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
श्री गंधर्व वेद प्रकाशनच्या ‘संतदर्शन चरित्र ग्रंथ’ चे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले, संत परंपरेचे अभ्यासक तथा ग्रंथाचे संपादक डॉ. सदानंद मोरे,आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.
संत विचार हे कालसापेक्ष आहेत, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रत्येक काळात त्यांच्या विचारांना महत्व आहे. महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे. संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिली. संत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याण चिंतण्याची परंपरा सुरू केली तर संत तुकारामांनी अध्यात्म आणि संसार यांची सुयोग्य सांगड घालून दिली.
ते पुढे म्हणाले की, संत विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी काळानुसार संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे. ‘संत दर्शन’ या चरित्र लेखनाने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सामान्य लोकांपर्यंत संत विचार पोहोचावेत यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो.
चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, महाराष्ट्र ही संतभूमी आहे. नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. सकल समाजाच्या उत्थानासाठी संतांचा जन्म झाला. समाजाच्या बदलत्या मानसिकतेमुळे संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे. तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा आहे. संतांनी महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवली. महाराष्ट्राचा सामाजिक पोत सांभाळण्याचे काम संतांनी केले. संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या संत चरित्राची निर्मिती करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आस्था आहे. ती त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ग्रंथाच्या सर्व लेखकांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून घेतला व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक दीपक खाडिलकर यांनी केले. सूत्रसंचलन दीपक खाडिलकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
*****


No comments:
Post a Comment