मुंबई, दि. 29 : स्वामी विवेकानंदांचे
विचार आजही समर्पक आहेत. त्यांनी सांगितलेल्या तत्वांची अंमलबजावणी होण्यासाठी
शाळा, कॉलेजमधून त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे असे, राज्यपाल चे.
विद्यासागर राव यांनी आज सांगितले. शिकागो येथील धार्मिक संसदेत स्वामी विवेकानंद
यांच्या ऐतिहासिक भाषणाच्या 125 व्या वर्धापन दिना निमित्ताने रामकृष्ण मिशनद्वारे
आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यपाल पुढे
म्हणाले,
आज एकशे
पंचवीस वर्षांनंतरही स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक समर्पक आहेत. देशाच्या काही
भागांमध्ये जाती, पंथ, प्रदेश आणि धर्माच्या
मार्गावर भारताला विभाजीत करू इच्छिणाऱ्या काही प्रवृत्ती तसेच नक्षलवादी आपले
कुरूप डोके वर काढत आहेत. वैयक्तिक आणि समाजिक पातळीवर असहिष्णुता वाढत आहे.
देशाची भावनात्मक ऐक्य आणि अखंडता राखण्यासाठी विवेकानंदांच्या कल्पनांना समजावून
घ्यावे लागेल.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा अवलंब करून
भारतातीलच नव्हे तर जागतिक समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते, असा विश्वास
राज्यपालांनी व्यक्त केला. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात यावी यासाठी रामकृष्ण मिशनने
पुढाकर घ्यावा. तसेच शिक्षण, आरोग्य आणि आदिवासी कल्याण क्षेत्रातील रामकृष्ण मिशन
मुंबईच्या विविध उपक्रमांविषयीही त्यांनी गौरोवोद्गार काढले. आयआयटी आणि आयआयएम
सारख्या प्रमुख संस्थांमधील तरुणांना यात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
स्वामी विवेकानंदांच्या विचारावर बोलताना
राज्यपालांनी सांगितले, स्वामी विवेकानंदानी
युवा सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण या दोन गोष्टींवर भर दिला होता. आज
भारत जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. 2020 पर्यंत, भारतीय सरासरी वय 29 वर्षे होईल, अमेरिकन किंवा
चीनीपेक्षा जवळजवळ 8
वर्षे लहान असेल. या युवा पिढीवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. युवकांना
शिक्षण व कौशल्यासह सशक्त बनविण्यासाठी, रामकृष्ण मिशन सारख्या संस्थांनी युवकांमध्ये समाजाची
आणि देशाची सेवा करण्याची भावना निर्माण करणे आवश्यक आहे.
महिलांची स्थिती सुधारल्याशिवाय जगाच्या
कल्याणाची शक्यता नाही असा विश्वास विवेकानंदांनी व्यक्त केला होता. ज्या
देशांमध्ये स्त्रियांचा आदर नाही, ते कधीही मोठे झाले नाहीत आणि भविष्यात कधीही होणार
नाहीत,
असेही
विवेकानंद म्हणत. आपण आपल्या समाजातील महिलांची परिस्थितीत सुधारण्यासाठी समर्पित
भावनेने कार्य केले पाहिजे. यासाठी सर्व स्तरांवरून जागरूक प्रयत्न झाले पाहिजेत, असे
राज्यपालांनी आवर्जून सांगितले.
मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित
या कार्यक्रमाला रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन, बेलूर मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवनंद, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण
मिशन,
मुंबईचे
सचिव स्वामी कृष्णनंदजी महाराज यांचीही भाषणे झाली. यावेळी रामकृष्ण मठ आणि मिशनचे स्वामीजी, विविध धर्मांचे
प्रतिनिधित्व करणारे धार्मिक नेते स्वामी रामकृष्ण यांचे भक्त मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment