मुंबई, दि. 30 : राज्य शासनामार्फत यापुढे शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ या पोर्टलचा वापर करण्यात येणार आहे. ऑनलाईनरित्या पारदर्शक पद्धतीने शिक्षकभरती होणार असल्याने शिक्षणाच्या दर्जातही वाढ होणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्यांची मान्यता रद्द करण्याच्या अनुषंगाने सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते. श्री. तावडे म्हणाले, उच्च न्यायालयाने ‘पवित्र’ प्रणालीला मान्यता दिली आहे. या प्रणातीलअंतर्गत शिक्षकभरती प्रक्रियेत राज्य शासन उमेदवारांना गुणवत्ता क्रमांकानुसार शाळांकडे शिफारस करेल. राज्य शासनाकडून रिक्त जागांच्या प्रमाणात शिफारस झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन नियुक्तीचे अधिकार शाळांना असणार आहेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळणार असल्याने शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे.
राज्यभरात 2012 नंतर शाळांमध्ये 4 हजार 11 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता देताना अनियमितता झाल्याचे आढळून आले. त्यापैकी 3 हजार शिक्षकांची चौकशी पूर्ण झाली असून 600 हून अधिक शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या. उर्वरित 1 हजार 11 नियुक्त्यांच्या बाबत सुनावनी घेऊन निर्णय देण्याची कार्यवाही सुरू आहे.
श्री. तावडे म्हणाले, राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीमार्फत आकृतिबंध तयार करण्यात आला असून लवकरच भरतीप्रकिया सुरु करण्यात येईल. कालच विधीमंडळात संमत झालेल्या विधेयकानुसार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी या भरतीमध्ये राखीव जागांची अंमलबजावणी करण्यात येईल.
या चर्चेदरम्यान सदस्य सर्वश्री योगेश सागर, डॉ. सुनील देशमुख, एकनाथ खडसे, ॲड. आशिष शेलार, वैभव पिचड, सुभाष पाटील यांनी सहभाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment