नागपूर, दि. 26 : नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ‘कालिदास महोत्सवा’चे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात उद्या मंगळवार, दिनांक 27 नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.
‘परंपरेचा आविष्कार’ हे ब्रीदवाक्य घेऊन नवीन संकल्पनासह कालिदास महोत्सव पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे. केवळ नागपूर व रामटेकच नव्हे तर कालिदास महोत्सवाची ओळख महाराष्ट्राला व्हावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान आयोजित महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन, रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, महापौर श्रीमती नंदा जिचकार यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.
कालिदास महोत्सव आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलावंत हजेरी लावून कलाविष्कार सादर करतील. वर्ष 2015 मध्ये ‘मेघदू तम्’, वर्ष 2016मध्ये ‘कुमारसं भव’ वर्ष 2017 मध्ये ‘ऋतुसंहार’ आणि यंदा 2018 मध्ये ‘शकुंतला- भारतीय स्त्रीचे सूर’ अशा कवि कालिदास यांच्या कालजयी ग्रंथांचा आधार घेऊन भारतीय शास्त्रीय संगीत परंपरातील गायन, वादन व नृत्य कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येईल.
महोत्सवामध्ये 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ वर आधारित शास्त्रीय नृत्य कार्यक्रमासह श्रीमती अनुराधा पाल यांचे स्त्री शक्ति : ताल वाद्य वृंद,श्रीमती आरती अंकलीकर यांचे शास्त्रीय गायन, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी श्रीमती पद्मश्री देवयानी यांचे भरतनाट्यम् नृत्य व कौशिकी चक्रवर्ती यांचा कौशिकी आणि सखी या कार्यक्रमाचे आयोजन आहे तर समारोपाच्या दिवशी श्रीमती संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन तर श्रीमती परवीन सुलताना यांचे शास्त्रीय गायन प्रस्तुत करतील. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment