मुंबई, दि. 31 : सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पातील बाधित वेणेखोल गावाच्या पुनर्वसनासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या 111 व्या मंत्रालय लोकशाही दिनात दिले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रालय लोकशाही दिनात आलेल्या अर्जांवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अर्जदारांचे म्हणणे ऐकून त्यावर संबंधितांना निर्देश दिले. आजच्या 111 व्या मंत्रालय लोकशाही दिनात मागील चार प्रलंबित प्रकरणे तसेच नवीन आलेली 20 प्रकरणे यांच्यावर सुनावणी झाली. विविध विभागीय स्तरावरील प्रकरणांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी आढावा घेऊन निर्देश दिले.
मंत्रालय लोकशाही दिनात नोव्हेंबर अखेरपर्यंत 1505 अर्ज आले होते. त्यापैकी 1501 अर्ज निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित चार प्रलंबित प्रकरणांवरही यावेळी कार्यवाही करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पामध्ये वेणेखोल हे गाव बाधित झाले होते. गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन जागेअभावी रखडल्याची तक्रार यावेळी करण्यात आली होती. या विषयावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वेणेखोलमधील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने जागा संपादित करून त्यांचे लवकरात लवकर जागा पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले.
बोरिवलीजवळील आदिवासी पाड्यात वीज जोडणी मिळत नसल्याच्या तक्रारीवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आदिवासी भागातील कुटुंबांना तातडीने वीज जोडणी देण्याचे निर्देश ऊर्जा विभागाला केले. या निर्णयावर उपस्थित अर्जदारांच्या प्रतिनिधींने समाधान व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
मुंब्रा येथील कविता नागप्पा बागडे या दिव्यांग महिलेचा स्टॉल रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आला होता. या तक्रारीवर दिव्यांग महिलेस तातडीने स्टॉल देण्याचे निर्देश महानगरपालिकेस मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी सर्वच प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपिन मलिक, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment