Thursday, 3 January 2019

नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली


            मुंबई, दि. 3 : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने एक तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्व आणि नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, न्या. धर्माधिकारी यांनी त्यांचे पिता आणि ज्येष्ठ विचारवंत दादा धर्माधिकारी यांचा वैचारिक आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा समर्थपणे सांभाळला होता. गांधीविचारांची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी त्यांची अखेरपर्यंत धडपड होती. अत्यंत कमी वयात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासोबतच न्यायदानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी दिलेले निकाल दिशादर्शक ठरले आहेत. विविध उपक्रमाच्या माध्यमातून ते दीर्घकाळ सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात सेवारत होते. राज्य सरकारला सुद्धा वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन लाभले. महिला सुरक्षा प्रश्नांवर त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अनेक उपयुक्त सुचना केल्या आणि त्या सरकारने स्वीकारल्या होत्या.
००००

No comments:

Post a Comment