Monday, 4 February 2019

पूर्वोत्तर राज्यांच्या युवा कलावंतांचा 11 फेब्रुवारीपासून कलाविष्कार


पूर्वोत्तर भारत आदान-प्रदान उपक्रमाचे आयोजन
  • 275 युवा कलावंतांचा सहभाग
  • सहा दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल
       नागपूर, दि:26 : पूर्वोत्तर भारतातील विविध राज्यांची सांस्कृतिक, भौगेालिक, सांगितिक अशी विविध अंगी ओळख व्हावी, यादृष्टीने पूर्वोत्तर भारत युवा आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गंत विविध कलांचा अविष्कार येत्या 11 फेब्रुवारीपासून काटोल रोड येथील तिडके महाविद्यालयाच्या दादासाहेब कन्नमवार सभागृहात सादर होणार असल्याची माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी दिली. 
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्वोत्तर भारत आदान-प्रदान उपक्रमाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
            केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, नेहरु युवा केंद्र, नवी दिल्ली आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वोत्तर भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा आदी राज्यांतील 250 युवक – युवती आणि 25 युवा नेता अशी एकुण 275 जणांनी चमू या कार्यक्रमातून विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करतील.
            यामध्ये पहिल्या दिवशी सहभागी युवक-युवतींची नावनोंदणी, ओळख आणि  कार्यक्रमाच्या आयोजनामधून असलेल्या त्यांच्या अपेक्षा, केंद्र शासनाच्या युवक व क्रीडा विभागाकडून थोडक्यात माहिती दिली जाईल.  त्यानंतर कार्यक्रमाचे उदघाटन होईल. पूर्वोत्तर भारतातील सहभागी युवक-युवती त्यांचे अनुभव कथन करतील, तसेच पूर्वोत्तर भारताकडून देशाच्या विकासासाठी आणि सबलीकरणासाठी योगदानावर प्रकाश टाकतील.  त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिला दिवस संपेल.
            दुसऱ्या दिवशी 12 फेब्रुवारी रोजी  सकाळी महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारीत असेल, त्यात त्यांची तत्वे, राष्ट्रभक्ती आणि देशाच्या विकासात असलेले योगदान. तसेच संकल्प से सिध्दी, महिलांच्या सबलीकरणावर आाधारीत परिसंवाद असेल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  13 फेब्रुवारी रोजी सकाळी कौशल्य विकासावर आधारित करीअरच्या संधी, वनांवर आधारित उद्योग, हस्तकला आणि क्रीडा त्यानंतर युवकांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येईल.  14 फेब्रुवारी रोजी नागपुरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देण्यात येतील.  दुपारनंतर राज्य तथा केंद्र शासनाच्या विविध मान्यवरांसोबत संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  15 फेब्रुवारी रोजी सकाळी भाषा शिक्षण एक भारत श्रेष्ठ भारताचे सादरीकरण, स्वच्छ भारत अभियान आणि युवकांचे योगदान, पर्यावरण जनजागृती आणि पर्यावरण संरक्षणात युवकांची भूमिका यावर परिसंवाद असेल. तर शेवटच्या दिवशी सकाळी युवकांच्या सहभागातून जिल्हानिहाय विकास आराखड्यांत योगदान असे सहा दिवशीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी दिली.  
*****

No comments:

Post a Comment