सोमवारपासून नामनिर्देशनपत्रे
दाखल करता येणार
मुंबई, दि. 2
: राज्यातील 264 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक
निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्यासाठी 4 फेब्रुवारी पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या
निवडणुकांसाठीचे मतदान 24 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
आहे.
मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठीचा
हा निवडणूक कार्यक्रम आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात
आलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया
संगणकप्रणालीद्वारे राबविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. रायगड
जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायती, रत्नागिरीमधील
40, सिंधुदुर्गमधील 1 अशा कोकण
विभागातील 131 ग्रामपंचायती, धुळे- 17,
अहमदनगर- 36 आणि नंदुरबारमधील 3 अशा नाशिक विभागातील एकूण 56 ग्रामपंचायती, पुणे- 22, सोलापूर-5, सातारा-40 आणि कोल्हापूरमधील 5 अशा पुणे विभागातील एकूण 72 ग्रामपंचायती, औरंगाबाद विभागांतर्गत उस्मानाबाद
जिल्ह्यातील 2 ग्रामपंचायती, अमरावती
जिल्हा व विभागातील 2 ग्रामपंचायती तर नागपूर विभागांतर्गत
गडचिरोली जिल्ह्यातील 1 ग्रामपंचायतीचा या निवडणूक जाहीर
झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे.
या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व
सादर करण्याचा दिनांक व वेळ- सोमवार दि. 4 फेब्रुवारी ते शनिवार दि. 9 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता, नामनिर्देशनपत्रांची छाननी सोमवार दि. 11 फेब्रुवारी रोजी 11 वाजता होणार असून बुधवार दि. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत.
उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यासह निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम
यादी बुधवार दि. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वा. नंतर प्रसिद्ध
करण्यात येईल. आवश्यकता असल्यास रविवार दिनांक 24 फेब्रुवारी
रोजी सकाळी 7.30 वा. पासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. मात्र, गडचिरोली
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे मतदान सकाळी 7.30 वा. पासून ते 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. मतमोजणी सोमवार दि. 25 फेब्रुवारी रोजी केली जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक
निकालाची अधिसूचना दि. 27 फेब्रुवारी प्रसिद्ध करण्यात येणार
आहे.
००००
No comments:
Post a Comment