Monday, 25 February 2019

पोलिसांच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पोलिसांचे भावविश्व, संवेदना समाजासमोर याव्यात. - गृह राज्यमंत्री दिपक केसरकर








मुंबईदि. 25 : पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच त्यांच्यातील भावविश्व व संवेदना समाजासमोर याव्यात. त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच समाजातील घटकांशी सुसंवाद घडवून समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने पोलिसांचे हे पहिलेच साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर यांनी आज येथे केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पोलिसांच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुनकरण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सुरुवातीला पोलीस मुख्यालय ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मार्गावर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस उपमहानिरिक्षक तथा संमेलनाध्यक्ष डॉ.बी.जे.शेखर, पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल, नागपूर पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर तसेच राज्यातून आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री.केसरकर म्हणाले, पोलीस ऊन, पाऊस, दिवस-रात्र अशी कशाचीही पर्वा न करता 12 ते 16 तास काम करीत असतात. पोलिसांच्या मनाचा हळवा कोपरा या संमेलनाच्या माध्यमातून समोर येईल. त्यांच्या अडीअडचणी व समस्यांना वाचा फोडण्याबरोबरच त्यांच्या कलेला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे आणि याचा फायदा पोलीस बांधवांना नक्कीच मिळेल आणि याही संमेलनाला विविध स्तरावर प्राधान्य मिळेल. एरवी नेहमी हातात शस्त्र, काठ्या घेवून समाजकंटक आंदोलकांना पांगविणारे, नेत्यांच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या खाकी वर्दीवाल्याकडून चक्क कविता, चारोळी, शौर्यगीते, साहित्यावरील चर्चा ऐकू येणार असल्याचेही गृह राज्यमंत्री म्हणाले.
महासंचालक श्री. पडसलगीकर म्हणाले, लिखाणाची सुरुवात प्रत्येक पोलीस ठाण्यात केसेस लिहिण्यातून होते पण त्याच्या केलेनुसार त्यांनी लिहीलेले लेखन या साहित्य संमलनाच्या निमित्ताने बाहेर आले आहे. हे साहित्य संमेलन महाराष्ट्र पोलिसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस आपल्या सेवा सांभाळत काही ना काही लिहितो. हेच आमचे यश आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी त्यांच्यातील भावना, इच्छा जपण्यासाठी भरविलेले हे ऐतिहासिक संमेलन आहे, यापुढेही अशा प्रकारचे संमेलन सुरु ठेवण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.राजेंद्र राठोर यांनी केले तर डॉ.पल्लवी परुळेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
००००



No comments:

Post a Comment