Tuesday, 9 April 2019

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करु नका -अश्विन मुदगल



नागपूर, दि. 9 : राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करु नका असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मिती शासनाच्या 1 जानेवारी  2015 च्या शासन निर्णयानुसार पायबंद घालण्याच्या त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रध्वज कार्यक्रमानंतर  मैदानात अथवा रस्त्यावर पडलेले असतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर निर्णय देताना प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर बंदीचा निर्णय दिला आहे. त्यामुळे येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करुन नये, असे आवाहन जिल्हाधिकारी  अश्विन मुदगल यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये यादृष्टीने कार्यक्रम संपल्यानंतर ठीक-ठिकानी राष्ट्रध्वज गोळा करुन  त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नष्ट करण्यात यावे. व तसे करताना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे व जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयात सुपूर्द करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल  यांनी जनतेला केले आहे.                                                                                                                     
                                                         ****


No comments:

Post a Comment