Thursday, 12 December 2019

संत्रा क्लस्टरच्या माध्यमातून संत्रा निर्यातीस चालना देण्यासाठी सर्वकंष प्रयत्न - रवींद्र ठाकरे

ऑरेंज क्लस्टरमध्ये निर्यातदार व शेतकऱ्यांचे चर्चासत्र
नागपूर दि. 12: कृषी निर्यात धोरणांतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी संत्रा क्लस्टरची स्थापना केलेली असून संत्रा निर्यातीस चालना देण्याच्या दृष्टीने सर्वकंष प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केला.                                                                                                                                                                               संत्रा निर्यातीस चालना देण्यासाठी ‘संत्रा क्लस्टर’बाबत अपेडा, केंद्र शासन, वनामती व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच वनामती येथे एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
संत्रा निर्यातीस चालना देण्यासाठी ‘संत्रा क्लस्टर’बाबत आयोजित कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले, नागपूरी संत्र्याला  मोठी मागणी असून सर्व ग्राहकांपर्यंत दर्जेदार माल पोहचविल्या जात नसल्याने याबाबत एकत्रित काम केल्यास निश्चितपणे विदर्भातून संत्रा निर्यात करणे शक्य आहे. नागपूर जिल्हृयातील निवड केलेल्या कळमेश्वर, काटोल, नरखेड, सावनेर व अमरावती जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या विविध निर्यात विषयक प्रश्नाबाबत यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
ऑरेंज क्लस्टर अपेडाचे सहाय्यक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे यांनी अपेडामार्फत कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा या संस्थेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व ऑरेंज क्लस्टरबाबत यापुढे होणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली.
नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम.एस. लधानिया यांनी संत्रा निर्यातक्षम उत्पादन करण्यासाठी शेतीतील नवनवीन प्रयोग कशाप्रकारे करावेत, याबाबत मार्गदर्शन केले. संशोधन केंद्रामार्फत निर्यातक्षम उत्पादनासाठी विकसित झालेले तंत्रज्ञान मराठीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक सतीश वऱ्हाडे यांनी पणन मंडळामार्फत फलोत्पादन अंतर्गत विविध फळापिकांच्या काढणीत्तोर उत्पादनासाठी उपलब्ध सुविधा व योजनांचा तपशील देऊन भविष्यातील पणन मंडळामार्फत सुविधा निर्माण करण्याच्या नियोजनाबाबत यावेळी माहिती दिली.
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे विवेक निखाडे यांनी त्यांच्या विभागामार्फत विविध कृषी उद्योगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. मुंबई व नागपूर येथून आलेल्या निर्यातदारांनी संत्रा निर्यातीच्या दृष्टीने शेतकऱ्यांकडून अपेक्षित उत्पादनाबाबत त्यांच्या अपेक्षा काय आहेत, यावर चर्चा केली. निर्यातीमध्ये फळांचा दर्जा व गुणवत्ता अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी वापरावयाच्या व्यक्तीगत अतिशीतगृह या तंत्राची माहिती साजित परवेज यांनी दिली.
यावेळी महा ऑरेंजचे श्रीधर ठाकरे, नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, प्रकल्प संचालक, आत्मा श्रीमती नलिनी भोयर व कृषी विभागातील जिल्हास्तरीय अधिकारी तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्यातील प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी, संत्रा उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.                                                                                                                                                                कार्यक्रमाचे  प्रास्ताविक वनामतीच्या अपर संचालक डॉ. अर्चना कडू तर आभार वनामतीचे उपसंचालक मिलिंद मुर्ऱ्हेकर यांनी मानले.
*******

No comments:

Post a Comment