Friday, 15 May 2026

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांची जिल्हा प्रशासनाला सूचना अल निनोचा नैऋत्य मोसमी वाऱ्यावर परिणाम विभागात सरासरीच्या 92 टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान


 

            नागपूर दिनांक 15: अल निनो मुळे मान्सून हंगामात 92 टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता असली तरी विभागात अतिवृष्टी व पुरामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा स्तरावर आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत.

            मान्सूनपूर्व करावयाच्या उपाय योजना संदर्भात विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी आढावा घेतला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस विभागातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जलसंपदा, ग्रामविकास, कृषी, आरोग्य विभागाचे अधिकारी  दुरदूष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

            यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटणकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पुनर्वसन सह आयुक्त विजया बनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण महीरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ बालसुब्रमणियम, डॉ. प्रविण कुमार, कर्नल रविकांत व विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

             विभागात दिनांक 10 ते 15 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होत असल्याचे हवामान विभागाने कळविले असून गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यामध्ये विदर्भातील सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविले जाणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी कोरडे कालखंड निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टीची शक्यता तसेच पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विभागात असलेल्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाकडे असलेल्या बोटीसह इतर साहित्य सज्ज ठेवण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या.


            वैनगंगा, कन्हान,पेंच नदी खोरे पुरासाठी अत्यंत संवेदनशील आहेत. चोराई प्रकल्पातून सोडलेले पाणी वैनगंगा नदीवरील प्रकल्पात पोहोचण्यासाठी 39 तासापेक्षा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्यासंबंधीची यंत्रणा सज्ज ठेवावी. आंतरराज्य प्रकल्पासंदर्भात समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशा सूचना श्रीमती बिदरी यांनी यावेळी केल्या.

            आपत्ती व्यवस्थापना संदर्भात संपर्क यंत्रणा सज्ज राहावी, तसेच नागरिकांना अतिवृष्टी व पुराच्या संदर्भातील अलर्टची माहिती मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात यावेत. तसेच नागरिकांनाही आपत्ती संदर्भात माहिती देण्यासाठी विभागात  चॅटबॉट सुरू करण्यात आले आहेत, सर्व जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत चार्ट पोट सुरू करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

            अतिवृष्टी व पुरामुळे ज्या गावातील नागरिकांचे स्थलांतरित करावे लागते या संदर्भात मागील तीन वर्षाचा आढावा घेऊन अशा संवेदनशील क्षेत्राची ओळख निश्चित करावी तसेच या क्षेत्रात राहणाऱ्या महिलांच्या आरोग्य व गर्भवती महिलांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांना तात्काळ मदत कशी उपलब्ध होईल याची नियोजन करावे, अशा गावांमध्ये पुरेसे औषध अन्नधान्य तसेच सर्पदंशावरील औषधे व साप पकडणारी यंत्रणा तयार करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पामध्ये सरासरी 43% जलसाठा उपलब्ध असून पिण्याचे पाणी औद्योगिक वापर व खरीप हंगामासाठी 31 ऑगस्ट पर्यंत पुरेसा पाणीसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून ज्या भागांमध्ये पावसाचा खंड निर्माण होण्याची शक्यता आहे अशा भागांना पाणीपुरवठा करण्यात संदर्भात नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


 

धोकादायक स्थळांवर माहिती फलक लावा

          सिंचन प्रकल्प तसेच विभागातील नद्यांवरील धोकादायक स्थळांची माहिती घेऊन अशा ठिकाणी वारंवार दुर्घटना होणार नाही. यासाठी माहिती फलक लावण्यात यावेत व अशा ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा ठिकाणी मनुष्यहानी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे यावेळी विभागीय आयुक्तांनी सुचित केले.

 केंद्रीय जल आयोगाकडून एक जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत विभागात निर्माण होणारी पूरस्थिती तसेच धोकादायक पातळी संदर्भात पूर्ण नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून दररोज पुर बुलेटिन स्थिती अहवाल आधी माहिती जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी यांना नियमित देण्यात यावी असेही अशी सूचना यावेळी करण्यात आली.

            नागपूर शहरातील नैसर्गिक आपत्ती उपाय योजना अंतर्गत नाग नदी पिवळी नदी कोरा नदी तसेच शहरातील 227 नाले यांची तपासणी करण्यात आली असून गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील पुराच्या पाण्याला अडथळा निर्माण होणार नाही. या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून शहरातील खोलगट भागात अतिवृष्टीच्या काळात ड्रोन चा वापर करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ बिपिन इटनकर यांनी सांगितले.

            विभागातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलसंपदा विभाग आरोग्य विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष द्वारे करण्यात आलेल्या मान्सून पूर्व व्यवस्थेची माहिती सादरी करण्यात आले यावेळी देण्यात आली.

########



 

No comments:

Post a Comment