· कृषि सेवा केंद्रांना मार्च 2017 अखेर 10 हजार पीओएस मशीन
· शेतमालाचे चुकारे कॅशलेस पद्धतीने द्यावे
नागपूर दि.16 -: देशातील काळा पैसा बाहेर काढून अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाने 500 व 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. निर्णयाचा पुढचा टप्पा हा देशातील जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करणे आहे. त्याची सुरूवात देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांपासून सुरू झाली. कृषी निवीष्ठा खरेदी करताना कॅशलेस पद्धत वापरल्यास शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक निश्चितच थांबणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी रोखरहीत व्यवहार करण्यासाठी कृषि निवीष्ठा विक्री केंद्रांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन पुरविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज 'रामगिरी' येथे कृषि केंद्र चालकांना पीओएस मशीनचे वाटप करून करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव प्रवणि परदेशी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, कृषि आयुक्त विकास देशमुख, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक दिपांकर बोस उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
'कॅशलेस' व्यवहार करण्यासाठी कृषि विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहाराच्या निर्णयाला सर्व विभागांनी आधार द्यावा. त्याची सुरूवात कृषी विभागाने केली आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषि क्षेत्रावर म्हणजेच शेतकऱ्यांवर अवलंबून आहे आणि या कॅशलेस व्यवहारांची सुरूवात शेतकऱ्यांपासून होतअ आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पारदर्शक व मजबूत होईल. कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कृषि निवीष्ठा खरेदी करतात. ही सर्व खरेदी पीओएस मशीनच्या माध्यमातून 'कॅशलेस' पद्धतीने झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारेही भविष्यात कॅशलेस पद्धतीने देण्याबाबत कार्यवही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, कॅशलेस व्यवहारांना शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यापासून शेतकरी दूर राहू नये. त्यासाठी कृषि केंद्रांकडेच पीओएस मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. येत्या मार्च 2017 पर्यंत राज्यात 10 हजार कृषि केंद्र धारकांना पीओएस मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही व्यवहार पद्धत भविष्यात वाढतच जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पीओएस मशीनचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री यांच्याहस्ते पीओएस मशीनद्वारे खरेदी करतानाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांना पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले. यामध्ये वर्धा येथील श्रीनिवास चांडक, मोबीन शेख, उमेश मुंदडा, ब्रिजकिशोर सारडा, जगदीश चांडक, नागपूर येथील श्यामसुंदर राठी, अजय नेने, महेंद्र गुप्ता, खंडाळे कृषी सेवा केंद्र, बुलडाणा येथील विशाल कृषी केंद्र, वैष्णवी ॲग्रो सेंटर, नितीन ॲग्रो सेंटर, अकोला येथील मोहन सोनावणे, अमरावती येथील सुनील मुंदडा, यवतमाळचे प्रदीप बनगीरवार यांचा समावेश आहे. आभार प्रदर्शन कृषि आयुक्त विकास देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाला कृषि विभागाचे अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, कृषी सेवा केंद्र चालक आदी उपस्थित होते.
000000000000
No comments:
Post a Comment