मुंबई, दि. 6 : राज्यातील ग्रामीण गृहनिर्माणमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमधील अपुर्ण घरकुले कालमर्यादेत पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणार असल्याचे सांगून प्रत्येक तीन महिन्यात आढावा घेणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे कामकाज विषयी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, इंदिरा आवास योजना ग्रामीण गृहनिर्माण संचालक भारत शेंडगे यांची उपस्थिती होती.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यात ग्रामविकास विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजना तर आदिवासी विकास विभागामार्फत शबरी,आदिम व पारधी आवास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या अंतर्गत सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षातील कामांचा भौतिक आढावा त्यांनी घेतला, यामध्ये एकूण ९५ हजार ४८४ घरकुले पूर्ण झाली आहेत. सन २०१६-१७ या कालावधीत ४८ हजार ६४९ घरकुले पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०१७-१८ या वर्षासाठी नुकतेच उद्दिष्ट प्राप्त झाले असल्याचे सांगून प्रधानमंत्री आवास योजनेची कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राप्त उद्दिष्टांना तात्काळ मंजुरी देवून सर्व विभागांनी समन्वयाने घरकुलाची कामे दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करावेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेचा आढावा घेताना त्या म्हणाल्या, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. या योजनेंतर्गत ऑक्टोबर २०१७ अखेर ५७३ लाभार्थीना जागा खरेदीसाठी १ कोटी ५७ लाख ९८ हजार १५८ रुपये उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
००००


No comments:
Post a Comment