नागपूर, दि. 22 : धनगर आरक्षण संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचा अहवाल अंतिम टप्प्यात असून हा अहवाल लवकरच शासनास प्राप्त होणार आहे. धनगर आरक्षणासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधान परिषदेत सांगितले.
नियम 97 अन्वये सदस्य श्री रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना श्री. सवरा बोलत होते. धनगर आरक्षण संदर्भात टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन टप्प्यातील या संस्थेचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्याचे काम सुरू असून या संस्थेचा अहवाल लवकरच शासनास प्राप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 36 जिल्ह्यातील 108 तालुक्यातील 324 गावातील पाच हजार कुटुंबातील 20 हजार धनगर समाजातील नागरिक, धनगर समाजाचे जाणकार, लोकप्रतिनिधी, व्यवसाया निमित्त फिरस्तीवरील धनगर समाजातील नागरिक यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. तर दुस-या टप्प्यात देशातील इतर राज्यातील जमातींचा अभ्यास करण्यात आला आहे. अंतिम टप्प्यातील अहवालाचे काम सुरू असून हा अहवाल शासनास प्राप्त होईल, असे श्री. सवरा यांनी विधानपरिषदेत सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री कपिल पाटील, रामराव वडकुते, जोगेंद्र कवाडे, जयदेव गायकवाड, भाई गिरकर यांनी भाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment