शेतकऱ्यांना मिळतेय मोफत गोदाम, गरजेच्या वेळी कर्ज, शेतमालास चांगला भाव
मुंबई, दि. 5 : शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ सुरु करण्यात आली आहे. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम तसेच अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षी ८६ हजार १६६ क्विंटल शेतमाल बाजारसमित्यांनी तारण ठेवला असून शेतकऱ्यांना मागील फक्त 4 महिन्यात सुमारे १६ कोटी रुपयांचे तारण कर्ज देण्यात आले आहे, अशी माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
विशेषत: सुगीच्या काळात बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल दाखल होतो व त्यावेळी त्याचे भाव पडतात, अशा वेळी शेतकऱ्यांच्या मालाला तारण देणारी ही महत्वाकांक्षी अशी योजना असून यात उर्वरीत बाजार समित्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे. शेतकऱ्यांनीही कमी भावाच्या काळात या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले आहे.
या योजनेतून तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भरडधान्य आदीला लाभ दिला जातो. शेतकरी कमी भावाच्या काळात ही उत्पादने बाजार समित्यांकडे तारण ठेवू शकतात. यासाठी त्यांना बाजारसमितीमार्फत मोफत गोदाम उपलब्ध करुन दिले जाते. तसेच फक्त ६ टक्के इतक्या कमी व्याजदरात शेतकऱ्यास शेतमालाच्या त्यावेळी असलेल्या भावाच्या ७५ टक्के रकमेइतके कर्ज लगेच उपलब्ध करुन दिले जाते. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपला माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करुन वाढीव रक्कम त्याला परत मिळते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोफत गोदाम, गरजेच्या वेळी कर्ज आणि शेतमालास चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. या योजनेत आतापर्यंत १०3 बाजारसमित्यांनी सहभाग घेतला आहे. २०१३ मध्ये ही संख्या फक्त ३३ इतकी होती. राज्यातील उर्वरीत बाजार समित्यांनीही या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे. राज्यात एकूण ३०७ इतक्या बाजार समित्या आहेत.
गोदाम बांधकामासाठी निधी
ही योजना प्रभावीपणे राबविता यावी यासाठी बाजार समित्यांकडे चांगल्या क्षमतेची गोदामे उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तारण ठेवलेल्या मालाच्या बदल्यात त्यांना द्यावयाच्या कर्जासाठीचा निधीही राज्य कृषी पणन मंडळामार्फत बाजार समित्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. वार्षिक फक्त ३ टक्के इतक्या कमी व्याजदरात बाजारसमित्यांना हा निधी देण्यात येत आहे. या योजनेतून बाजार समित्यांचेही सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरीत बाजार समित्यांनीही या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे.
योजनेत अकोला जिल्ह्यातील ५, अमरावती जिल्ह्यातील १०, बुलढाणा जिल्ह्यातील ४, यवतमाळ जिल्ह्यातील १३, वाशिम जिल्ह्यातील ६, औरंगाबाद जिल्ह्यातील ५, जालना जिल्ह्यातील ७, परभणी जिल्ह्यातील २, हिंगोली जिल्ह्यातील ३, सांगली जिल्ह्यातील १, गडचिरोली जिल्ह्यातील २, गोंदीया जिल्ह्यातील २, चंद्रपूर जिल्ह्यातील ५, नागपूर जिल्ह्यातील २, भंडारा जिल्ह्यातील २, वर्धा जिल्ह्यातील ४,अहमदनगर जिल्ह्यातील ३, नाशिक जिल्ह्यातील २, पुणे जिल्ह्यातील १, सोलापूर जिल्ह्यातील १०, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३, नांदेड जिल्ह्यातील ३, बीड जिल्ह्यातील २ तर लातूर जिल्ह्यातील ६ बाजार समित्यांनी या योजनेत सहभाग घेऊन शेतकऱ्यांना लाभ देण्यास सुरुवात केली आहे.
००००
No comments:
Post a Comment