* कृषी सहसंचालक फलोत्पादन आयुक्तालयांचे आवाहन
नागपूर दि.04 : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत मोसंबी, संत्रा, पेरू फळपिकासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यासाठी दिनांक 14 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शासनाने फळपिक घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत संत्रा,मोसंबी, पेरू, डाळिंब, चिंकू अशा फळांचा यात समावेश करण्यात आला असून पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमुळे त्यांच्या फळपिकांचे संरक्षण होणार आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत फळपिकनिहाय विमा संरक्षण रक्कम सहकार विभागाने मंजूर केलेल्या कर्ज दराएवढी निर्धारित करण्यात येईल. ही योजना 20 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक फळपिक क्षेत्र असलेल्या महसूल मंडळांतर्गत राबविण्यात येत आहेत. कर्जदार शेतकऱ्यासाठी ही योजना सक्तीची असली तरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. त्यामुळे बिमा हप्ता संरक्षित रकमेच्या 5 टक्के दर निर्धारित करण्यात आले आहे.
मृग बहार संन 2018 योजनेंतर्गत 5 जिल्हा समूह तयार करण्यात आले आहे. या समुहांमध्ये जिल्हा तसेच विमा कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्यात टाटा ए. आय. जी. इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फळपिकास विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे.
मोसंबी, संत्रा व पेरू या फळपिकासाठी दिनांक 14 जूनपर्यत, चिकू फळपिकासाठी 30 जूनपर्यत तसेच डाळिंब पिकासाठी 14 जुलैपर्यत शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता जमा करावा लागेल. त्यानुसार विविध पिकांसाठी विमा संरक्षण कालावधी हा 15 जून ते 30 डिसेंबर पर्यत वेगवेगळा राहणार आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांकडून अर्ज व विमा हप्त्याची रक्कम ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. फळपिक विमा योजनेत अर्ज सादर करतांना शेतकऱ्यांना 7/12 उतारा, आधार कार्ड, क्षेत्रीय स्तरावरील कृषी अधिकारी याचे क्षेत्र पडताळणी प्रमाणपत्र, बँक पासबुकची फोटो ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून द्यावी लागेल. जिल्हानिहाय नियुक्त विमा कंपनी महसुल मंडळातील महावेद प्रकल्पांतर्गत स्थापित हवामान केंद्रामध्ये नोंद झालेल्या आकडेवारीचा वापर करणार आहेत. त्यामुळे या आकडेवारीच्या आधारे हवामान धोका लागू झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल.
कॉमन सर्विसेस सेंटर मार्फत, बँकामार्फत किंवा स्मार्ट फोनद्वारे ऑनलाईन विमा प्रस्ताव सादर करता येणार आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत नजीकच्या बँक शाखेत विमा हप्ता भरून घ्यावा. योजनेविषयी अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाचे आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment